मुख्य सामग्रीवर वगळा

Industrial Revolution..!

Industrial Revolution..!

माणसं जोडायला हवी आहे, माणसांच्या सहवासात आयुष्य जगण्याची कला एकदा एकसंध आयुष्य जगणाऱ्या माणसाला लाभली की तो आयुष्यभर विचारांनी भटकत न राहता स्थिर होत असतो.

मला आठवते माझं एक्कलकोंडी अवस्थेत आयुष्य जगणं जरी मनाला समाधान देणारे होते. तरीही माणसांच्या सहवासात आले की, माझी होणारी अवस्था ही त्या लहानग्या पोरांनी भर वस्तीतून एखाद्या कुत्र्याच्या पेकाटात लाथा, दगडं हाणून त्याला भर वस्तीतून हाकलून लावावं. ते कुत्रं जसं भेदरलेल्या अवस्थेत या वस्तीतून त्या वस्तीत भाकर, कुटका भेटल या कारणाने घाबरत घाबरत भटकत रहायचं तशी होऊन जायची.

कामगार चौकात माझ्या सुरुवातीच्या काळातील दिवसांमध्ये मी ही असाच भटकत राहिलो. माझं गाव शिक्षण खूप झाल्यानं आता माझं पोट भरवू शकत नव्हतं, अन् मलाही इथली भिक्कार जिंदगी नको होती.
आयुष्यात काही बदल हवे होते, म्हणून मी ही भाकरीच्या तुकड्याच्या शोधार्थ या वस्ती जवळ केल्या.

शहरात राहणाऱ्या प्रत्येक त्या कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारास त्याचा भाकरीसाठीचा संघर्ष विचारा. सुरुवातीचे काही दिवस नावाला असलेल्या कॉट बेसीस हॉस्टेल कम एक मोठी कचरा कुंडी असावी अश्या हॉस्टेलला दिवस काढले.

पर्याय नसतो, जिथं एकवेळ जेवणाची सोय नसते तिथं काळोखाच्या राती डोक्यावर असलेलं हे छप्पर खूप आधार देणारं अन् नकळत भूक भागवणारे असते.

सुरुवातीच्या काळात पाण्यात बुडवून एक बिस्किटाच्या पुड्यावर दिवस काढणारी मित्र मी बघितली. त्यांच्या कळकटलेल्या गोधड्यामध्ये झोपलो त्यांच्या संगतीने.

औद्योगिक वसाहतीमध्ये कंत्राटी पद्धतीने काम भेटल म्हणून कंपनीच्या या नाही त्या गेटवर भटकत राहिलो. आधार कार्ड अन् बारावीचं मार्कशिट झेरॉक्स काढून काढून इतकं घासले की झेरॉक्स काढणारा पण आता आम्हाला बघून हसायला लागला.

अन् कंपनीचे सेक्युरीटीगार्ड पण आमचे थोबाड बघून म्हणू लागला की पोरा तू आदी दोनदा तुझा बायोडाटा कंपनीच्या गेटवर दिला हाय अन् तुझ्या त्या कागदाचा Hr Team  विचार करत आहे. लग्नाचा बायोडाटा घेऊन फिरायच्या वयात ही पोरं आपल्याला सिद्ध करण्यासाठी अशी भटकत राहिली.

सगळ्यांनीच आशेवर लावलेलं असायचं आम्हाला पण काही दोन-चार महिन्यांपूर्वी एका मित्राच्या याच झेरॉक्सच्या कागदावर एका बाजूने असलेल्या कोऱ्या कागदावर सेक्युरीटीगार्ड त्यांच्या रोजच्या कामाच्या नोंदी ठेवत होता,हे बघितलं. अन् आम्ही रोज आशेनं येरझऱ्या घालत होतो.

विचार केला तर तो सेक्युरीटीगार्ड बाबाही आमच्यासारखा कंत्राटी कामगारच होता. पण या विश्वात कसं आहे 'ज्याचं फावलं त्याचं देवाला दावलं' अन् याच वृत्तीवर वसाहतील्या दोन एकशे कंपन्या काम करत राहतात.

पण एक दिवस असा येईल आंदोलने होतील, कामगार संपावर जातील अन् या वसाहती धडाधड बंद पडतील. यंत्रांची घरघर थांबेल नाहीतर पैश्याच्या जोरावर कंपनीचा मालक दुसऱ्या प्रांतातील मजूर लोकं घेऊन येईल.

हे जास्त दिवस चालणार नाही, कंत्राटी कामगारांच्या आयुष्याला लागलेली घरघर या कंपन्यांना स्वस्तपणे चालू देणारच नाही. अन् एखाद दिवशी एखाद्या कंपनीत असा मोठा स्फोट होईल की, हजार दोन हजार कंत्राटी कामगारांचे मुर्दे कंपनीतून बाहेर काढावे लागतील.

मग कंपनी जळून खाक होईल, धुराचे लोट आसमंतात जागा घेईल आणि एकदिवस ही औद्योगिक वसाहत कायमची बंद होऊन जाईल. 

हजारो लोकांचा रोजगार बंद होईल, ते परत भटकत राहतील या शहरातून त्या शहरात. कुणी व्यसनाच्या आहारी जाऊन पडून राहतील त्या बंद पडलेल्या वसाहतीच्या सांगाड्यात. जिथं त्यांनी त्यांच्या आयुष्यातील उमेदीची वर्ष खर्ची केली होती अन् आता पिऊन पिऊन त्यांचा आपल्या शरीराचा सांगाडा सापळा होऊन दिसू लागला होता...

लिहेल कधीतरी...

Bharat Sonawane .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...