मुख्य सामग्रीवर वगळा

वाभळेवाडीचा तलाठी आण्णा..! भाग - २

वाभळेवाडीचा तलाठी आण्णा..! भाग - २

रातीचा नवाचा पार कलला अन् संतू अण्णा तलाठी,  रामा कुंडुर अन् त्याचा दोस्त जगण्या लक्षी आईच्या पिंपळ पारावर गावकुसाच्या गावातल्या मालदार, गरीब, डांबरट लोकांच्या आठवणी काढत गप्पा करू लागले होते. रामा कुंडुर पारावर उकीडवा बसून संतू अण्णा तलाठीला अन् जगण्याला गावातल्या एक एक हकीकती सांगत होता. जगण्याही त्याच्या या हकीकतींना हो ला हावजी अन् हातवारे करीत बोलत होता. 

संतू आण्णा तलाठी लक्षी आईच्या पिंपळ पारावर आपलं कपड्यांचं पेंडकं उश्याला घेऊन एक पायाची टांग एका गुडघ्यावर ठेऊन, या सगळ्या गप्पा गोडीने ऐकत बसले होते. अधून मधून समशानातील कुत्री त्या काल मेलेल्या गावच्या जुन्या पिढीतल्या नव्वदीच्या पाटलीनबाईंच्या जळत्या मड्या मोहरं उंचउंच आवाजात इवळायची. त्यांचा आवाज यांच्या बसल्या जागेवर येत म्हणून ती समशानाकडे बघायची.

एखादं कोल्ह मोठ्यानं कोल्हेकूई मारत इवळायला लागलं की अंगावर काटा येऊन जायचा. अन् समशानात असणाऱ्या पाटलीनबाईंच्या जळत्या मड्याची आग समशानात असलेल्या येड्या बाभळीला तिच्या कवेत घेती की काय असे त्या आगीचे लोट लक्षी आईच्या पिंपळ पारावरून दिसत असायचे.

गावच्या लोकांना हे सगळं ओळखीचं होतं पण गावात कुणी नवखं माणूस आलं की रातच्याला हे असं काही इपरीत बघितलं त्या माणसाचा जीव अर्धा अर्धा व्हायचा. तसं काही संतू अण्णा तलाठी यांच्या संगत आता व्हायला लागलं होतं, अन् संतू अण्णा तलाठी जरा बिचकतच हो ला हो करत या दोघांच्या गावकुसाच्या गप्पा ऐकत होते.

रातीचे दहा कधी सरले हे हलक्या फुलक्या गप्पात त्यांना कळलं नाही. संतू अण्णा तलाठीनं आपल्या एका पिशित आणलेलं भाकरीचं पेंडकं अन् लसणाचा ठेसा काढून ते जेवायला म्हणून बसले.

तितक्यात रामा कुंडूर बोलू लागला:
तलाठी अण्णा जेवायचं थांबा की व मी घरून कोड्यास भाकर घेऊन येतूसा. असं म्हणून रामा कुंडूर हातातलं टमरेल घेऊन धावतच दोन गल्ल्या पल्याड असलेल्या त्याच्या घरी गेला अन् टोपल्यात उरलेली तीन चतकुर भाकर अन् शेंगदाण्याचं पातळ कालवण तो एका गिल्लासात घेऊन आला.

जगण्या चड्डी सावरीत, डोक्यावरली गांधी टोपी सावरीत एका डेचकीत पाणी अन् एक लोटा घेऊन आला. लक्षी आईच्या पिंपळ पारावर मस्त एक फडकं अंथरूण त्यांनी संतू अण्णा तलाठी यांची जेवायची सोय केली. 

लोकांची रात्रीची जेवणं झाली म्हणून गावातली लोकं गप्पा झोडायला म्हणून लक्षी आईच्या पिंपळ पारावर एक एक करून येऊन बसू लागली होती. हळू हळू साऱ्या गावात गावासाठी नव्यानं शिकावू तलाठी अण्णा आल्याची बातमी साऱ्या गावात तोंडोतोंड मिरवल्या गेली.

गावची लोकं तशी चांगली होती.  त्यामुळं संतू अण्णा तलाठी यांना गावकुसाच्या सतरा गप्पात गावातल्या लोकांनी सहज सामावून घेतलं, गप्पा चालू झाल्या. संतू अण्णा गरिबीतून वर आलेला, शून्यातून विश्व निर्माण करू बघणारा सरकारी नोकर होता. त्यामुळं गावातल्या या गरीब लोकांवर तो आधिकच खुश होता, जेवता जेवता भरघोस गप्पा चालू होत्या व गावाचा नवा शिकावू तलाठी बघायला गावातली मंडळी येत होती. 

त्या निमित्ताने आज लक्षी आईच्या पिंपळ पारावर बाजार भरावा तशी गर्दी झाली होती. इतक्या लहान वयात हे पोर तलाठी झालं, त्याची नेमणूक आपल्या गावाला झाली. यामुळं गावातल्या म्हाताऱ्या माणसांनासुद्धा संतू अण्णा तलाठी यांचं अप्रूप वाटत होतं.

संतू अण्णाचं जेवून झालं अन् ते हात धुवायला पाराच्या खाली गेले तर जगण्या त्यांच्या हातावर पाणी टाकू लागला. हे बघून पारवरली सारी मंडळी त्याला हसू लागली की आता जगण्याची विहिरीचं अडकून पडलेलं सरकारी काम उद्याच होत्तया.

गप्पा टप्पा झाल्या अन् गावातली लोकं त्यांच्या घराला निघून गेली. अर्धा अधिक गाव बरसदीचे दिस असल्यानं कधीच पहुडला होता हे लिंबाच्या पारावर गप्पा झोडीत बसलेल्या रामा कुंडूर, जगण्या अन् नव्यानं शिकावू तलाठी म्हणून आलेल्या संतू आण्णा तलाठी यांना कळलेच नाही.

संतू आण्णा पारावरच आपली कागदपत्राची,आफिस कामाची कागदं असलेली सुटकेस उश्याला घेऊन अन् कपड्याच्या पिशीची वळकटी करून चालून-चालून पिंडय्रा अन् खालपर्यंत पाय दुखायला लागल्यामुळे ती तळपायाच्या खाली घेऊन रामा कुंडूर अन् जगण्याच्या गप्पा ऐकत आता मात्र निवांत पहुडला होता. तिशीचा आसपास असलेला संतू आण्णा तलाठी गावच्या गप्पामध्ये रमून गेला होता..!

लेखक: भारत लक्ष्मण सोनवणे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड