मुख्य सामग्रीवर वगळा

वाभळेवाडीचा तलाठी आण्णा भाग- एक

भर सायंकाळची वेळ झाली, सूर्य अस्ताला जात होता. ढगांच्या आडून लपंडाव खेळणारा सूर्य कधी एकदा डोंगराच्या पल्ल्याड खालच्या अंगाला निघून जाईल अन् कधी एकदा सगळीकडे अंधार बुडुक होईल. या विचाराने एका हातात पांघरूण असलेलं गोणीचे पेंडकं, खांद्याला बंदाची लांबती पिशी अटकवून, डोक्यावर ऑफिस कामात कागदपत्र ठेवायला म्हणून असलेली सुटकेस घेऊन संतू आण्णा चालत होता.

नव्यानं शिकावू तलाठी म्हणून सरकारी नोकरीत रुजू झालेला तिशीतला संतू आण्णा मोठ्या साहेबानं ड्युटी दिलेल्या वाभळेवाडी या डोंगराआड असलेल्या, गावात नोकरीला रुजू व्हायला म्हणून आधल्या दिवशी खुदच्या गावातून दोन घटकांचा महामंडळाच्या गाडीतून प्रवास करीत निघाला होता.

वाभळेवाडी नजदीक गावालगत गाडी जात नसल्यानं, गावच्या सहा कोस दूर असलेल्या फाट्यावरून डांबरी सडकीनं तो पायातल्या वाहना सरकीत सरकीत सांजेच्या अस्ताला जाणाऱ्या सूर्याचा कल घेत झपाझप पावलं टाकीत चालत होता.

गावाकडे जाणारी डांबरी सडक मागे पडली अन् डोंगरा-खोंगरात हरवलेल्या पायवाटेनं संतू आण्णा चालू लागला. ऐरवी सूर्य अस्ताला गेला होता अन् दूरवर गावातले दिवे चमकतांना काजव्यासम लुकलुकताना दिसत होते.

झाडंझुडपे असलेली रानाची वाट मागे पडली अन् लाल मातीच्या अन् चहूकडे बोडक्या असलेल्या बाभळीच्या रानात संतू आण्णा गावाचा अंदाज घेत चालू लागला.

चहूकडे पसरलेला काळाकुट्ट अंधार, माळावर मोठ्या आवाजात इवळणारी कुत्रे, गावातल्या सावत्या माळ्याच्या मंदिरातून हरिपाठाचा येणारा आवाज अन् हरीपाठाची दर दुसरी ओळ म्हणत संतू आण्णा गावच्या येशीला आला होता.

तितक्यात पस्तिशीतला रामा कुंडुर अन् त्याचा दोस्त जगण्या बोडक्या बाभळीच्या रानातून आपल्या चड्ड्या सावरत लांब-लांब फलंगा टाकत वाटेनं टरमळे हलवीत हलवीत गप्पा हानित चालले होते.

दूरवरून येणारा संतू आण्णा त्यांच्या नजरेस पडला अन् ते वेशीच्या अंगाला असलेल्या दगडी चबुतऱ्यावर उकीडवे बसून तंबाखू चोळीत चोळीत गप्पा झोडू लागले. इतक्या वेळात संतू आण्णा त्यांच्याजवळ येऊन त्यांना वाट पुसू लागला.

तितक्यात पस्तिशीतला रामा कुंडुर हातातली तंबाखू तोंडात टाकीत, एक कडक पीक हनीत बचकभर थुंकला अन् संतू आण्णाला बोलू लागला..!

‘कोण, कुठल्या गावचं म्हणावं पाहूनं..?’

‘बराच वखत केलासा गावू जवळ कराया..!’

संतू आण्णा हातातलं पेंडक चबुतऱ्यावर ठेवत सुटकेस सावरत त्याची कहाणी सांगू लागला..!

म्या "संतू आण्णा मावळजे" मौजे "ढोर पिंपळगांव"चा हायसा नव्यानं सरकारात तलाठी म्हणून रुजू झालो हायसा. पहिल्याच वख्ताला तुमच्या गावाला नव्यानं शिकावू तलाठी म्हणून वाभळेवाडीस रुजू झालू हायसा.

हे ऐकल्यावर जगण्या त्याचं टमरेल रामा कुंडुरच्या हातात देत, संतू आण्णाने चबुतऱ्यावर ठेवलेलं पेंडकं खांद्यांवर उचलून घेत बोलू लागला. तलाठी आप्पा सरपंचास्नी सांगावा तरी धाडायचा की फाट्यावर कुणी घ्यायला आलं असता. उगाच जीवाची आबाळ केलीसा तुम्ही..!

तितक्यात संतू आण्णा बोलता झाला,

‘कसली आबाळ जगण्या दादा, नव्यानं नोकरीला रुजू झालु म्हंजी चालायचंच थोडं बहुत..!’

असं म्हणत ते तिघे गावच्या वाटेनं वेशीच्या महुरे चालू लागले.

तितक्यात रामा कुंडुर बोलू लागला,

‘तलाठी आप्पा तुमचं सबुत खरं हायसा पण तुम्ही आल्यात सरकारी जावई सरकारचे जावई तुमचा मान राखला गेला पाहिजे.’

जगण्या बोलू लागला, ‘हे कसं बोलला बघ रामा तू मायचास्नी सरकारी नोकरी म्हणजे थाट अस्तूया तलाठी आप्पा..!’

‘आपल्या गावचं पहिलं तलाठी लई बारा भोड्याचं हाय, सरकारी जावई असल्यानं हुकूम गाजीवतय बारबापं..!’

सांज केव्हाच सरली होती, सूर्य कधीच अस्ताला गेला होता; अन् आता मावळतीच्या बरोबर एका अंगाला चंद्र आपलं दर्शन वाभळेवाडीच्या लोकांस्नी देऊ लागला होता.

नदीच्या थडीला पाण्याचा जोर वाढला होता. नदीच्या वाहत्या पाण्याचा आवाज, नदी थडीला असलेल्या पिवळ्या बेंडक्यांचा आवाज रामा कुंडूर, जगण्या, तलाठी आण्णा यांच्या बसल्या लिंबाच्या पारा पहूरतक येत होता. नदीच्या अंगाला काळाकुट्ट अंधार माजला होता.

याला भरीस भर की काय म्हणून समशानातील कुत्री त्या काल गावच्या जुन्या पिढीतल्या नव्वदीच्या पाटलीनबाईंच्या जळत्या मड्या मोहरं उंचं आवाजात इवळू लागली होती. नदीच्या दुसऱ्या अंगाला झाडांवर काजवे चमकू लागली होती, व्होलगे मोठ्यानं आवाज करत ओरडू लागली होती. गावच्या जवळ असलेल्या डोंगर रानातून कोल्हे एक सुरात मोठ्यानं कोल्हेकुई हानीत बरतळल्यागत, इवळल्यागत ओरडत होती.

क्रमशः

 

- भारत लक्ष्मण सोनवणे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...