मुख्य सामग्रीवर वगळा

वाभळेवाडीचा तलाठी आण्णा भाग- एक

भर सायंकाळची वेळ झाली, सूर्य अस्ताला जात होता. ढगांच्या आडून लपंडाव खेळणारा सूर्य कधी एकदा डोंगराच्या पल्ल्याड खालच्या अंगाला निघून जाईल अन् कधी एकदा सगळीकडे अंधार बुडुक होईल. या विचाराने एका हातात पांघरूण असलेलं गोणीचे पेंडकं, खांद्याला बंदाची लांबती पिशी अटकवून, डोक्यावर ऑफिस कामात कागदपत्र ठेवायला म्हणून असलेली सुटकेस घेऊन संतू आण्णा चालत होता.

नव्यानं शिकावू तलाठी म्हणून सरकारी नोकरीत रुजू झालेला तिशीतला संतू आण्णा मोठ्या साहेबानं ड्युटी दिलेल्या वाभळेवाडी या डोंगराआड असलेल्या, गावात नोकरीला रुजू व्हायला म्हणून आधल्या दिवशी खुदच्या गावातून दोन घटकांचा महामंडळाच्या गाडीतून प्रवास करीत निघाला होता.

वाभळेवाडी नजदीक गावालगत गाडी जात नसल्यानं, गावच्या सहा कोस दूर असलेल्या फाट्यावरून डांबरी सडकीनं तो पायातल्या वाहना सरकीत सरकीत सांजेच्या अस्ताला जाणाऱ्या सूर्याचा कल घेत झपाझप पावलं टाकीत चालत होता.

गावाकडे जाणारी डांबरी सडक मागे पडली अन् डोंगरा-खोंगरात हरवलेल्या पायवाटेनं संतू आण्णा चालू लागला. ऐरवी सूर्य अस्ताला गेला होता अन् दूरवर गावातले दिवे चमकतांना काजव्यासम लुकलुकताना दिसत होते.

झाडंझुडपे असलेली रानाची वाट मागे पडली अन् लाल मातीच्या अन् चहूकडे बोडक्या असलेल्या बाभळीच्या रानात संतू आण्णा गावाचा अंदाज घेत चालू लागला.

चहूकडे पसरलेला काळाकुट्ट अंधार, माळावर मोठ्या आवाजात इवळणारी कुत्रे, गावातल्या सावत्या माळ्याच्या मंदिरातून हरिपाठाचा येणारा आवाज अन् हरीपाठाची दर दुसरी ओळ म्हणत संतू आण्णा गावच्या येशीला आला होता.

तितक्यात पस्तिशीतला रामा कुंडुर अन् त्याचा दोस्त जगण्या बोडक्या बाभळीच्या रानातून आपल्या चड्ड्या सावरत लांब-लांब फलंगा टाकत वाटेनं टरमळे हलवीत हलवीत गप्पा हानित चालले होते.

दूरवरून येणारा संतू आण्णा त्यांच्या नजरेस पडला अन् ते वेशीच्या अंगाला असलेल्या दगडी चबुतऱ्यावर उकीडवे बसून तंबाखू चोळीत चोळीत गप्पा झोडू लागले. इतक्या वेळात संतू आण्णा त्यांच्याजवळ येऊन त्यांना वाट पुसू लागला.

तितक्यात पस्तिशीतला रामा कुंडुर हातातली तंबाखू तोंडात टाकीत, एक कडक पीक हनीत बचकभर थुंकला अन् संतू आण्णाला बोलू लागला..!

‘कोण, कुठल्या गावचं म्हणावं पाहूनं..?’

‘बराच वखत केलासा गावू जवळ कराया..!’

संतू आण्णा हातातलं पेंडक चबुतऱ्यावर ठेवत सुटकेस सावरत त्याची कहाणी सांगू लागला..!

म्या "संतू आण्णा मावळजे" मौजे "ढोर पिंपळगांव"चा हायसा नव्यानं सरकारात तलाठी म्हणून रुजू झालो हायसा. पहिल्याच वख्ताला तुमच्या गावाला नव्यानं शिकावू तलाठी म्हणून वाभळेवाडीस रुजू झालू हायसा.

हे ऐकल्यावर जगण्या त्याचं टमरेल रामा कुंडुरच्या हातात देत, संतू आण्णाने चबुतऱ्यावर ठेवलेलं पेंडकं खांद्यांवर उचलून घेत बोलू लागला. तलाठी आप्पा सरपंचास्नी सांगावा तरी धाडायचा की फाट्यावर कुणी घ्यायला आलं असता. उगाच जीवाची आबाळ केलीसा तुम्ही..!

तितक्यात संतू आण्णा बोलता झाला,

‘कसली आबाळ जगण्या दादा, नव्यानं नोकरीला रुजू झालु म्हंजी चालायचंच थोडं बहुत..!’

असं म्हणत ते तिघे गावच्या वाटेनं वेशीच्या महुरे चालू लागले.

तितक्यात रामा कुंडुर बोलू लागला,

‘तलाठी आप्पा तुमचं सबुत खरं हायसा पण तुम्ही आल्यात सरकारी जावई सरकारचे जावई तुमचा मान राखला गेला पाहिजे.’

जगण्या बोलू लागला, ‘हे कसं बोलला बघ रामा तू मायचास्नी सरकारी नोकरी म्हणजे थाट अस्तूया तलाठी आप्पा..!’

‘आपल्या गावचं पहिलं तलाठी लई बारा भोड्याचं हाय, सरकारी जावई असल्यानं हुकूम गाजीवतय बारबापं..!’

सांज केव्हाच सरली होती, सूर्य कधीच अस्ताला गेला होता; अन् आता मावळतीच्या बरोबर एका अंगाला चंद्र आपलं दर्शन वाभळेवाडीच्या लोकांस्नी देऊ लागला होता.

नदीच्या थडीला पाण्याचा जोर वाढला होता. नदीच्या वाहत्या पाण्याचा आवाज, नदी थडीला असलेल्या पिवळ्या बेंडक्यांचा आवाज रामा कुंडूर, जगण्या, तलाठी आण्णा यांच्या बसल्या लिंबाच्या पारा पहूरतक येत होता. नदीच्या अंगाला काळाकुट्ट अंधार माजला होता.

याला भरीस भर की काय म्हणून समशानातील कुत्री त्या काल गावच्या जुन्या पिढीतल्या नव्वदीच्या पाटलीनबाईंच्या जळत्या मड्या मोहरं उंचं आवाजात इवळू लागली होती. नदीच्या दुसऱ्या अंगाला झाडांवर काजवे चमकू लागली होती, व्होलगे मोठ्यानं आवाज करत ओरडू लागली होती. गावच्या जवळ असलेल्या डोंगर रानातून कोल्हे एक सुरात मोठ्यानं कोल्हेकुई हानीत बरतळल्यागत, इवळल्यागत ओरडत होती.

क्रमशः

 

- भारत लक्ष्मण सोनवणे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...