मुख्य सामग्रीवर वगळा

मृत्यू अन् त्याच्या संगतीच्या कथा..!

मृत्यू अन् त्याच्या संगतीचा कथा..!


अंतिमसंस्कारचे सर्व विधी उरकून घराकडे वळलो पंधरा दिवस या काळात सरून गेले होते,आयुष्यात आयुष्याला घेऊन आता भूतकाळ अन् वर्तमानकाळ यांच्यासोबत प्रत्येक वाक्याला जोडून बघत होतो.येणारा काळ खूप कसोटीचा अन् आयुष्यातून एकतर मी उठून जाईल,नाहीतर मी त्या अवस्थेत तगून राहील अन् मरणाला कारण न होता जगत राहील असं काही मनात चालू होतं.
आयुष्याला घेऊन इतका विचार त्या दिवसापूर्वी किंवा त्या एका घटकेत केला तितका कदाचित आजवरही केला नसेल..!

घरी आलो घर ओळखीचे पण दिशा अनोळखी वाटू लागल्या होत्या,डाळिंबाच्या झाडाची पानगळ सुरू असल्यानं साऱ्याच अंगणात वाळलेल्या पानांचा सडा पडलेला होता.धूनी-भांडी करत असलेल्या ठिकाणची माती पोपडे धरू बघत होती,जसं तिलाही आता इथला सहवास नकोसा झाला होता.
कोणाचं जाणं आयुष्यात इतकं रितेपण घेऊन येईल हे स्विकारण्याची ती पहिलीच वेळ होती अन् ते मनाला न झेपणारे होते..!

सर्वच कसं शांत-शांत भासत होते,दुपारचं रणरणते ऊन हवेहवेसे वाटू लागले होते,आयुष्यात इतकी शांतता यावी की पक्षांनीसुद्धा आपल्या जवळपास फिरकू नये.कधीतरी विटांना मातीत रचलेल्या वॉलकंपाऊंडची माती दोन्ही विटेच्या फटीतून रिते होवून खाली वाळलेल्या पानांवर पडायची तेव्हा येणाऱ्या आवाजाला ऐकून असं वाटायचं की भविष्याला घेऊन बघितलेली सर्वच स्वप्ने इतक्याच सहज रिते होवून,आयुष्याच्या वाटांवर अंधार होईल,अंधार झाला आहे..!

माणसं जगायला हवी आहे अन् माणसं मरायलाही हवी आहे पण जन्म मरणाचा हा सोहळा जेव्हा खूप जवळून अनुभवायला येतोना तेव्हा मरण फार अवघड नाही.आपल्या माणसांना आपण सोडून जाणे ही भावना ज्यांना आपण गेलो त्यांच्यासाठी खूप वाईट्ट असते.जेव्हा केव्हा आपल्या खूप जवळचं कुणी आपल्या आयुष्यातून अनामिक वेळी उठून जातेना तेव्हा लागून असणारी हुरहूर अन् आपलं ते स्वीकारत आयुष्याकडे बघणे होतेना तेव्हा आपण आयुष्याला घेऊन खूप समंजस झालेलो असतो..!

तेव्हा गरिबांचे दुःख आपल्या डोळ्यांना सहज दिसायला लागते.फुटपाथवर रात्रीच्या प्रहरी झोपणारे दिसले की आपण त्या व्यक्तींमध्ये आपल्याला सोडून गेलेल्या माणसांचा चेहरा शोधू लागतो.मग नकळत मनात हा ही विचार येऊन जातो की त्या वाटसरूच्या अंगावर एखादी शाल टाकून पुढं जावं,हा विचार येणं म्हणजे आपल्या माणसांच्या जीवाला शांतता भासणे होय..!

या पंधरा दिवसांच्या काळात अन् नंतर महिनाभर मला फक्त निळसर असलेल्या आकाशात बघायला आवडायचं,जेव्हा जेव्हा निळसर आकाशात पांढरे शुभ्र ढग दाटून यायचे तेव्हा त्यांच्या पुंजक्यात आपल्या सोडून गेलेल्या माणसांचे अस्तित्व मला नजरीस पडायचं.तासंतास न कंटाळता ते निरभ्र आकाश डोळ्यातून आसवे गाळत बघत राहणं अन् आपल्या जवळच्या व्यक्तीला त्यात बघत राहणं हे जवळचं वाटायचं.रात्रीचा काळोख अन् आपल्या माणसाची अनुपस्थिती रात्री 
हुंदके देत आतल्या आत तुटायला लावायची...!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

  1. शब्द शब्द वास्तवतेचे भान असलेला!ही लेखणी अविरत लिहिती राहो भरत!

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...