मुख्य सामग्रीवर वगळा

ऊसतोड अन् बीस जोडी..!

ऊसतोड अन् बीस जोडी..!

पहाटेच्या नवाची वेळ झाली होती,गावातल्या सेवालाल महाराजांच्या मंदिरा महूरं असलेल्या पिंपळाच्या झाडाला असलेल्या पारावर गावातले गावकरी मंडळी गप्पा झोडीत बसली होती.कुणी देऊळात पाया पडायला म्हणून हातात अगरबत्ती घेऊन मंदिराच्या वाटेनं बिगीबिगी चाललं होतं..!

ऊसतोडीचा हंगाम सुरू झाला होता,त्यामुळं गावात मुकरदंम लोकांची चलती होती,लोकांत त्यांचा बोलबाला होता.रोजच कुण्या गावाच्या कारखान्याचा मुकरदंम गावात ट्रक घेऊन यायचा अन् गावातल्या ज्या लोकांनी त्यांच्याकडून उचल म्हणून पैकं घेतले आहे त्यांना तोडीला म्हणून घेऊन जात असायचा..!

तोडीचा हंगाम सुरू होवून आठ-दहा दिवस सरले होते,हळू हळू गावातली तोडीला जाणारी मंडळी,उचल घेतलेली लोकं ज्या मुकरदमांकडून उचल घेतली असायची तो गावात घ्यायला आला की आपल्याला लागणारा संसार ट्रकमध्ये भरून नियमून दिलेल्या तोडीच्या गावाला,कारखान्याला निघत होता..!

पहाटे गावात मुकरदम अन् ट्रक आला की टोळीला ट्रकमध्ये त्यांचा संसार अन् त्यांना रडतपडत घरच्यांना निरोप देतांना बघितलं की डोळ्यात आसवं भरून यायची..!

दहाच्या सुमाराला असाच एक ट्रक गावाच्या पाराजवळ येऊन ठेपला.गावची लोकं ट्रकच्या ड्रायव्हरला विचारपूस करू लागली कुठून आला हायसा डाईव्हर साहेब..? कुठल्या कारखान्याचा ट्रक हायसा..?
तितक्यात ड्रायव्हर पाण्याच्या तांब्यानं वरून पाणी पित,गुळण्या करत बोलू लागला नगराच्या अगस्ती कारखान्याचा ट्रक हायसा.गावच्या लोकांची टोळी हायसा बीस जोड्यांची अन् पोराटोरांची मुकरदम आला की टोळ्यातल्या लोकांना घेऊन जायचं हायसा..!

गावकऱ्यांच्या गाव रानातल्या गप्पा चालू होत्या,इतक्यात दुरूनच  बुलेट गाडीचा आवाज येऊ लागला अन् ती गाडी वेशीतून गावात पाराकडे वळली.गाडीवर धिप्पाड देहाचा सपारी ड्रेस घातलेला,मिश्यांचा आकडा वळवलेला चाळीशीतील इसम ट्रकजवळ येऊन उभा राहीला..!

गावातल्या लोकांस्नी त्यानं राम राम घातला जुन्या तोडीला जाणाऱ्या लोकांना तो ओळखीचा होता..!
त्याला बघत पंच्याहत्तरीतले रामा आण्णा त्याला म्हंटले कुठशिक संपत्ती भाऊ..?
टोळी न्यायला आला हायसा की काय..?
मिशीला पिळ देत संपत्ती भाऊ त्याच्या बुलेटवरून उतरला अन् त्या लोकांच्या गर्दीत घुसून बोलू लागला,
हावजी आण्णा..!
गडी लोकांस्नी घेऊन जायला आलो हायसा,नगराच्या अगस्ती कारखान्याची तोड हायसा आपल्याकडे यंदाच्या सालला.तुमच्या गावना बीस जोड्या,पोराटोरांची टोळी केली हाईत,सगळ्यांस्नी मोप उचल दिली हाय यंदाच्या सालाला मग आजच्याला घेऊन जायला म्हणतूया..!

कारखाना,बाजारभाव,ऊसतोड,डोकी सेंटर,टायर,कारखान्याचा पट्टा कौशिक पडल अश्या दहा-वीस मिनिटं गप्पा झाल्या अन् संपत्ती भाऊ तोंडातल्या बारची पिचकारी फेकत गळ्यातले उपरणे सावरत रामा आण्णा अन् त्यांच्या जोडीदारांना येतूया म्हणून निघाला होता..!

संपत्ती मुकादम बुलेटला किक मारून गावच्या गल्लीतून टोळीत असलेल्या लोकांच्या घराकडे निघाला.घरातल्या बायका माणसे त्यांचा जाण्यासाठी लागणारा संसार,भांडीकुंडी,कपडेलत्ते घेऊन आवरून घर आवरित बसली होती,कुणी उचल घेतलेल्या पैक्याची गावठी दारू पिवून निवांत खाटीवर पडून होते..!

संपत्ती मुकादम एक-एक करून साऱ्यांच्या घराला जावून सांगून आला अन् पुन्हा ट्रकपाशी येऊन बार खात गावकऱ्यांना पारावर बसून बढाया झोडीत बसला..!

घटका भरच्यानं गावातल्या तोडीला जाणाऱ्या लोकांची एक-एक जोडी येऊ लागली.सोबतीनं त्यांच्या घरची त्यांची मायबाप ज्यांनी उभे आयुष्य टोळी करून तोडी केली ते त्यांना सोडायला म्हणून ट्रकपर्यंत येऊ लागले.त्यांना तोडीला होणारी अाबळ माहीत असल्याने तेही जड अंत:करणाने डोळ्यांतील आसवांना मोकळी वाट करून देत त्यांच्या लेवूक-सूनांना,लहानग्या नातवंडांना निरोप देत होते..!

तोडीचे तीन महिने आपला लेवूक-सून रातंदीस एक करतील,ढोर मेहनत करत तोडी करतील,पोरांची आबळ होईल त्यांच्या तुकडा पाण्याची सोय बसणार नाही.हे सगळं बुड्या-बापुड्या गावातल्या म्हाताऱ्यांना त्यांच्या डोळ्यासमोर येणाऱ्या चित्रातून,त्यांच्या जुन्या आठवणीतून आठवत होते..!

हळूहळू एक-एक करून समद्या बीस जोड्या अन् तरण्या पोराटोरांची एक टोळी झाली ट्रकीत त्यांचा तोडीचा संसार,दोन टाकटरात त्यांच्या बैलगाड्या,एका भाड्याच्या ट्रकीत टायरवाल्या जोड्यांची बैलं,काही एका ट्रकीत काही दुसऱ्या ट्रकीत असे करून साऱ्या बीस जोड्या अन् तरणी पोरंटोरं बसली.

ट्रकीची,टाकटरची पूजा झाली वेशी महुरं देऊळाकडे तोंड करून नारळ फोडलं,सेवालाल महाराजांच्या देऊळात प्रसाद ठेवला,तिन्ही गाड्यांच्या महोरच्या टायराजवळ अंड ठेवलं अन् एकदाची सगळीच तोडीची मंडळी ट्रकीत बसली..!

गाड्या धकायला लागल्या तसं गावातल्या म्हाताऱ्या,म्हातारे त्यांच्या लेवूक-सूनाच्या काळजीनं रडायला लागली.गावातल्या मंडळींना गहिवरून आलं तीन महिन्यांसाठी तोडीला म्हणून गावची एक टोळी चालली म्हणून अन् गावाने,गावातल्या मजुराने आपल्यावर साल दर सालप्रमाणे ठेवलेला विश्वास यामुळे गावातून कुठल्याही अडचणी शिवाय संपत्ती भाऊच्या भरोश्यावर गावातली टोळी याही सालाला निघाली होती त्यामुळं संपत्ती भाऊलासुद्धा हे सर्व भावनिक झालेलं वातावरण बघून गहिवरून आलं अन् तो जांब्रू नानाच्या गळ्यात पडून त्यांची पाठ थोपटवत काळजी नगा करू नाना म्या हायसा म्हणून सांगू लागला..!

इतक्या वख्तात गाड्या गावच्या येशीच्या बाहेर निघाल्या होत्या.संपत्ती भाऊसूद्धा उपरण्याने डोळे पुशीत स्वतःला सावरत हातानं सर्वांना खुणवत बुलेटवर बसला अन् येतुया म्हणून तो ही निघाला..!

सेवालाल महाराजांच्या मंदिरा महूरं असलेल्या पिंपळाच्या झाडाला असलेला पार आता शांत शांत भासू लागला होता, गावातल्या बुड्या-बापुड्या,म्हातारे आपल्या कुडाच्या भिंती असलेल्या घराकडे निघून गेले होते.आता कुडाच्या भिंती असलेल्या घरांचा त्यांना आधार होता की,तेच त्या मोडकळीस आलेल्या झोपडीरुपी असलेल्या घराचे आधार होते हे कळायला मार्ग नव्हता..!

गाव गावातल्या माणसांविना सूनेसूने भासू लागले होते,गावात म्हाताऱ्या माणसांशिवाय आता कुणीही नव्हतं गावाला या म्हाताऱ्या माणसांचा आधार होता,गावात घरे होते,देऊळे होती,नदी होती,संमध होतं पण आता गाव माणसांविना सूनासूना लागून राहिला होता,सूनासूना लागून राहिला होता..!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड