मुख्य सामग्रीवर वगळा

वाऱ्याच्या संगती आठवणी..!

वाऱ्याच्या संगती आठवणी..!

घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात
माहेरी जा सुवासाची कर बरसात
सुखी आहे पोर सांग आईच्या कानात
आई,भाऊसाठी परी मन खंतावतं..!

लहानपणीच्या काही गोड आठवणी या कवितेशी आहे अन् लहानपणी म्हणजे वयाच्या चौथ्या-पाचव्या वर्षी इतक्या उंचीवरच्या,अर्थपूर्ण कविता जेव्हा आपल्याला ऐकायला मिळतात तेव्हा नक्कीच आपलं भविष्य सुखकर असणार हे त्यावेळी वडिलांनी दिलेल्या संस्कारातून मला सांगता येतं..!

तर लहानपणीच्या या कवितेशी जुळवून आलेल्या आठवणी अन् याच इतक्या वर्षांनीसुद्धा वडिलांच्या आवाजात ऐकलेली ही कविता जशीच्या तशी आजही माझ्या कानी पडते अन् तितक्या सुंदर इतर कुणाच्या आवाजात ती मी आजवर ऐकली नाही..!

सांज सरून गेलेली असायची घराच्या चहूबाजूने काळोख दाटलेला असायचा,या काळोखात अंगणात वडिलांनी लावलेल्या त्यांच्या आवडत्या रातराणीच्या फुलांचा सुगंध सर्वदूर अंगणात,घरात दरवळत असायचा..!

अश्यावेळी वडील दिवसभर काम करून थकून यायचे,ते फ्रेश झाले की दिवसभर आम्ही वडिलांची वाट बगणारे तिघे भाऊ-बहीण कंदिलाच्या मिणमिणत्या उजेडात वडिलांच्या मांडीवर विसावा घ्यायचो.कुणी मांडीवर डोकं ठेवून झोपलेलं असायचं तर कुणी वडिलांच्या मांडीवर बसून राहायचं,तर कुणी वडीलांचा तो दिवसभर काम करून रापलेला हात आपल्या कापसासारख्या मऊसूत हातात घेऊन वडिलांच्या जवळ बसून राहायचं..!

आईचा किचनवजा असलेल्या छोट्याश्या खोलीत एका चिमणीच्या उजेडात परातीत भाकरी बडवण्याचा आवाज कानी यायचा अन् या आवाजात दिवसभर आई तिघा भावंडात कुणाला रागावली असेल तर या सांजेच्या वेळी मग वडिलांच्या मांडीवर बसवून त्या लाडक्या मुलाचे वडील लाड करायचे..!
मग लाड करवून घेतले की वडिलांकडे किंवा वडिलांची इच्छा असेल तर वडील त्यांच्या सुंदर आवाजात अश्या कविता,मराठी सुंदर अर्थपूर्ण मनाला भावतील असे गीत,अभंग,गवळणी वडील आम्हाला म्हणवून दाखवायचे..!

मला आठवते वडील जेव्हा जेव्हा "घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात" ही कविता म्हणायचे तेव्हा शेवटी आपसूकच माझ्या डोळ्यांत अश्रू दाटून यायचे..! ते का..? या प्रश्नाला त्या नकळत्या वयात माझ्याकडं उत्तर नव्हते पण पुढे जेव्हा मोठा झाल्यावर कळले की मनापासून मला काही कविता,गीत मला हवे तसे मनासारख्या आवाजात मी ऐकले की मी खूप भावूक होतो अन् ही सवय मला आजतागायत आहे,त्यावेळी मला वडील नेहमी म्हणायचे तू स्वभावाने खूप हळवा आहेस अन् भविष्यातही तसाच असशील अन् तो आजही आहे..!

बालपणी वडिलांच्या आवाजात इतके कविता,गीत,अभंग,गवळणी ऐकल्यात की त्या आजही तोंडपाठ झालेल्या आहेत.त्या कुठं ऐकल्या वडिलांचा आपल्याला  इतक्या कमी वर्ष लाभलेल्या सहवासात वडिलांनी आपल्याला त्या कवितांची ओळख करून दिली,ज्यांचा अर्थ इतका गहन आहे.कदाचित त्यामुळेच माझी ओढ साहित्याकडे असावी असे कधी कधी मला वाटते..!

घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात
माहेरी जा सुवासाची कर बरसात
सुखी आहे पोर सांग आईच्या कानात
आई,भाऊसाठी परी मन खंतावतं..!

विसरली का ग भादव्यात वर्स झालं
माहेरीच्या सुखाला ग मन आचवलं
फिरुन-फिरुन सय येई जीव वेडावतो
चंद्रकळेचा ग शेव ओलाचिंब होतो..!

काळ्या कपिलेची नंदा खोडकर फार
हुंगहुंगुनिया करी कशी ग बेजार
परसात पारिजातकाचा सडा पडे
कधी फुलं वेचायला नेशील तू गडे..!

कपिलेच्या दुधावर मऊ दाट साय
माया माझ्यावर दाट जशी तुझी माय
आले भरून डोळे पुन्हा गळा नि दाटला
माउलीच्या भेटीसाठी जीव व्याकूळला

-कृ.ब.निकुंभ

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...