मुख्य सामग्रीवर वगळा

प्रिय..! एक ओळ तुझ्यासाठी..!

Book Review..!
प्रिय..! एक ओळ तुझ्यासाठी..!



आठ-दहा दिवसांपूर्वी मराठवाड्यातील प्रसिद्ध कवयित्री. "माधवी देवळाणकर" यांचा "प्रिय..! एक ओळ तुझ्यासाठी" हा काव्यसंग्रह अभिप्रायार्थ भेट मिळाला.
खरंतर मॅडमना हा काव्यसंग्रह मला भेटून देण्याची इच्छा होती अन् मलाही तो त्यांच्या हातानेच हवा होता..!

परंतु,मॅडम अनेकदा औरंगाबाद येऊनही काही कारणास्तव माझी त्यांच्याशी भेट होवू शकली नाही अन् मग अनायसे मॅडमला हा त्यांचा काव्यसंग्रह मला पोस्टाने पाठवावा लागला अन् अखेरीस तो मला मिळाला..!

खूप सुंदर,मनातील अलवार भाव भावनांना शब्दांची जोड देऊन त्या शब्दांची गुंफण करून काव्य संग्रहातील प्रत्येक ती प्रिय एक ओळ,एक एक रचना करत हा काव्यसंग्रह आकाररूपास अाला आहे..!
प्रत्येकाला वाचावासा वाटेल असा हा त्यांचा काव्यसंग्रह..!

आठ-दहा दिवसांपूर्वी काव्यसंग्रह मिळाला पण माझ्या इतर कामाच्या व्यस्थतेमुळे तो वाचायची इच्छा असूनही वाचल्या जात नव्हता.परंतु अखेरीस काल सायंकाळी वाचायला घेतला अन् एका बैठकीत वाचून संपवला.
९६ पानांचा का काव्यसंग्रह त्यातील कवितांप्रमानेच नाजूक अन् छोटासा आहे,बोलकेसे मुखपृष्ठ संग्रहाची शोभा वाढवते.औरंगाबाद येथील "गोदा प्रकाशन" यांनी हा काव्यसंग्रह प्रकाशित केला आहे.प्रसिद्ध साहित्यिक "डॉ.कैलास अंभुरे सर" यांची खूप अभ्यासपूर्ण प्रस्तावना या काव्यसंग्रहाला मिळाली आहे ..!

काव्य संग्रहातील काही रचना खूप गहन अन् अर्थपूर्ण अश्या विचार करायला लावणाऱ्या आहे.काही रचना या हळुवार आपल्या मनास रुंजी घालू बघणाऱ्या अश्या आहेत.की प्रेम ही भावना किती सुंदर आहे अन् ती किती समर्पकपणे कवियित्रीने आपल्या प्रत्येक रचनेत कैद केली आहे..!

सारे सारे संपले जरी
तरी तुझेच नाव
अंतिम श्वासापर्यंत ओठी
एक चुकार क्षणी
जर भेटलोच कधी
तर एक स्मित येऊ दे
ह्या आपल्या वेड्या ओळखीसाठी
म्हणून प्रिय...
ही एक ओळ तुझ्यासाठी...

काव्यसंग्रहाचे एक विशेष मला खूप जवळचे वाटले अन् यातूनच कवियित्री आपण साकारत असलेल्या प्रत्येक रचनेवर,ज्यांच्यासाठी हा काव्यसंग्रह अर्पण करते आहे त्यांच्यावर किती जीवापाड प्रेम करते हे दिसून येते.
संग्रहातील प्रत्येक रचनेचा शेवट हा काव्यसंग्रहाचे शीर्षक असलेल्या "एक ओळ तुझ्यासाठी" या ओळीने होते अन् ही फक्त एक ओळ नसून संपूर्ण एक काव्यसंग्रह आहे..!

काव्यसंग्रहाचे विशेष कौतुक यासाठीही मला वाटते की कवयित्री "माधवी देवळाणकर" यांचा हा पहिलावहिला काव्यसंग्रह.
"कैलास अंभुरे सर" प्रस्तावनेत ज्याप्रमाणे म्हणतात की व्यवहारी जगात पहिलं असणं...पहिलं येणं जसं महत्त्वाचं तसंच जगातील पहिलं प्रेम... पहिल्या प्रीतीची अनुभूती... पहिला विरह... पहिली मैत्री... इत्यादी स्वजीवनातील पहीलेपणाच्या स्मृतींचा दरवळ मनाच्या गाभाऱ्यात खोलवर रुजून बसलेला असतो.

त्या अलवार,आल्हादायक स्मृतीचेतना 'स्व' ला प्रसन्न करतात. तर कधी दुखय्रा खपल्या अस्वस्थ करत.स्वस्थअस्वस्थता,ऊन-सावल्या,सुख-दुःखात्म स्मृती भावतरंग हा कवीयित्री माधवींच्या "प्रिय... एक ओळ तुझ्यासाठी" चा गाभा आहे..!

कवियित्री त्यांचे मनोगत व्यक्त करतांना शेवटच्या तीन ओळींत लिहतात की,
"प्रिय... एक ओळ तुझ्यासाठी"  काव्यसंग्रह आर्त भावनांची लेखणीला घातलेली व्याकुळ साद आहे.तिचे हितगुज चोखंदळ वाचकांना कितीपत रुचते हा निर्णय मी रसिकांवर सोडून थांबते..!
आर्त भावनांची लेखणीला घातलेली व्याकुळ साद काव्यसंग्रहाच्या शेवटच्या रचनेपर्यंत आपल्याला रूचलेली असते अन् हा काव्यसंग्रह पसंतीस उतरलेला असतो.खूप सुंदर,खूप आवडलेला काव्यसंग्रह..!

खूप प्रेमासह खूप शुभेच्छा,असेच लेखन तुमच्या माध्यमातून मराठी साहित्यात होत राहो..!

लेखक-भारत सोनवणे.
संपर्क-९३०७९१८३९३.
औरंगाबाद.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...