मुख्य सामग्रीवर वगळा

कंत्राटी कामगार..!

कंत्राटी कामगार..!

काही वेळापूर्वी फ्लॅटवर येऊन निपचित पडलो आहे. डोक्यावर असलेला फॅन कमी स्पीडमध्ये गरगर आवाज करत फिरतोय, विंडोग्रीलमधून येणारी वाऱ्याची झुळूक हवीहवीशी वाटत आहे. पण; मग शरीर सुखाची मागणी करेल म्हणून निपचित लोळत पडलो आहे. 

आज दिवसभर शहरात कारण नसतांना भटकत होतो. मित्र गावाला गेला आहे मग त्याची बाईक माझ्या जवळच आहे, शंभरचं पेट्रोल टाकून दिवसभर या कंपनीच्या गेटवरून त्या कंपनीच्या गेटवर असं भटकत राहिलो.

कारण काहीही नव्हतं बस कंपनीच्या गेटवर गेलं की, तेथील सुखलेले कंत्राटी कामगारांचे चेहरे बघितले की मला माझ्यासारखं कुणीतरी आयुष्य जगते आहे याची जाणीव होते. अन्; मग जीवाला काहीवेळ सुख भेटून जातं. या असल्या जगण्यात कसलं आलंय सुख, पण; आपल्यासोबत ही फरफट कुणीतरी अनुभवत आहे हे काळजाला आधार देऊन जातं. नाहीतर एरवी आम्हा कंत्राटी कामगारांच्या आयुष्याची फरफट सुरूच असते. 

जसं कंडोम वापरून दहा-पाच मिनिटांची हौस भागवून झाली की, त्याला पहाटे कुठल्या रस्त्यावर फेकून दिलं जातं. तसंच अगदी तसंच कंपनीत सहा महिन्यांचा करार संपला की आम्हाला फेकून दिलं जातं.

असंच परवा एका मित्राचा सहा महिन्यांचा कंपनीतील करार संपला. आता कॉट बेसिसवर राहत असलेल्या कॉटचे नऊशे रुपये त्याच्याजवळ द्यायला नाही. म्हणून; त्यानं एक वेळची मेस बंद केली अन् एक वेळ पार्ले बिस्कीट खाऊन दिवस काढायचं ठरवलं. आज भटकत असतांना तोही सोबत होता. तो जिथे म्हणेल तिथं कंपनीच्या गेटवर त्याचा पत्रावळ झालेला Resume घेऊन फिरत होतो. 

कंपनीचे सेक्युरिटी गार्ड जसं आम्ही कुठले गाव-खेड्यातले असावे असे समजून बोल लावत होता. मित्राला कामाची गरज असल्यानं मी ही ऐकून घेत होतो. अखेर खूप भटकल्यानंतर दुपारी दोन वाजता एका फार्मा कंपनीत गिरणीत जसं दळण टाकतात तसं, ती औषधी पावडर गिरणीत टाकायचं काम त्या मित्राला तीनशे तीस रुपये आठ तासांची हजेरी देऊ, सहा महिन्यांचा करार असेल या बोलीवर सहा महिन्यांचं काम लागले.

आता उद्यापासून तो कंपनीत जाणार होता, कंपनीत सेफ्टी शूज कंपलसरी असल्यानं त्याला माझा जुना शूज सध्या वापरायला दिला आहे. सुपरवायझरने उद्या पहाटे सहा वाजता त्याला कंपनीच्या गेटवर बोलावलं आहे. प्लांटमध्ये उद्या एखादं पोरगं नाही आलं तर उद्यापासून त्याला कामाला घेतील, नाहीतर काम लागेपर्यंत फर्स्ट, सेकंड, थर्ड असे तीन टाईम तो कंपनीच्या गेटवर हेलपाटे मारत राहील.

कंपनीत सहा महिन्यांची नोकरी लागल्यानं खिश्यात असलेल्या चोळामोळा झालेल्या वीसच्या चार नोटा त्यानं माझ्यासमोर खिश्यातून काढून व्यवस्थित लावल्या अन् मोजून बघितल्या ऐंशी रुपये होते. मग नोकरी लागल्याचा आनंद अन् ती माझ्यामुळे लागल्याचा आनंद म्हणून मला मिसळ पाव खाऊ घालायचे म्हणून एका हॉटेलवर घेऊन आला.

हॉटेल कसली आमची सोनाली वहिनींची मेसच ती तिचं मेसवर भागत नाही म्हणून नाश्ता, चहाची टपरी टाकली आहे तिनं. मग गेलो तिथं, मला बघून ती काहीतरी बोलणार हे पक्कं होतं,मग काय ती बोललीच.
"आलात का निजायला माझ्याजवळ" असं बोलून गेली, बालीश अन् बोलायला जरा चालू असल्यानं आमच्यात हे असं हसी मज्जाक चालू असते. तिचा बेवडा नवरा जवळ नाही हे बघून मी ही तिला हसतच बोललो, फुकटचं थोडी निजतोय पैसे देतोय अन् तीही हसायला लागली. 

अन् तिनं तयार केलेला देशीचा पॅक माझ्या पाण्याच्या ग्लासला लावत तिनं चिअर्स केलं अन् एका घोटात तो ग्लास रीचवला. ती तो पॅक एका घोटात पित असतांना ती दारू तिच्या कोरदार ओठांच्या आडून ओघळली अन् तिच्या ब्लाऊजमधील ओघळीत जाऊन विसावली.

तिच्या अंगाला देशी दारूचा दर्प येत होता. मी तिचा हा अवतार बघून कोंडवाड्यात केलेल्या मेसच्या एका पत्री खोलीत जाऊन बसलो. मित्राने दोन मिसळ, सहा पावची ऑर्डर दिली. सोनाली वहिनीचं दहा वर्षांचं पोरगं त्या दोन प्लेट अन् पेपरात गुंडाळून ठेवलेला पाव घेऊन आलं.

मगाशी गिल्लासात दारूचा पॅक करत असताना वापरलेल्या मग्यात सोनाली वहिनीने माझ्या पुढ्यात पाणी ठेवलं. अन्; ती जिलेबी काढायला म्हणून भट्टीवर बसली. दारूच्या नशेनं तिचे घारुळे डोळे लालभडक दिसत होते अन् आता भट्टीच्या धुरात ते अजूनच लालभडक दिसू लागले होते. 

मिसळ पाव खात असतांना तिच्या डोळ्यांशी एक-दोन वेळा खेळून झालं. तिला हा डोळ्यांचा खेळ माझ्यासोबत खेळायला आवडतो म्हणून तिचं हे असं मज्जाक उडवणे चालू असते. हे तिनं एकांतवेळी कित्येकदा तिचा फुकट चहा पितांना मला सांगितलं आहे. 

इथे कित्येक बारा गावचे पाणी पिलेले बाराचे पोरं येतात, तिला कोण कश्या नजरेनं बघते हेही तिनं मला सांगितलं आहे. विश्वास असल्यानं अन् मी तसला नाही हे माहीत असल्यानं, आमचं असं बालीश वागणं,बोलणं चालू असतं अधूनमधून.

मिसळ खाऊन झाली अन् मग मित्राने चोळमोळा झालेल्या नोटांचे ऐंशी रुपये सोनाली वहिनींच्या हातात दिले अन् आम्ही तिथून निघालो. इथे आलं की दिवस खराब जातो म्हणून मेसवर येणं हल्ली टाळत असतो. पण; आज मित्रामुळे पुन्हा यावं लागलं, इथे आलो की सोनाली वहिनीबद्दल तिच्या वागण्याबद्दल लिहावंच लागतं.

मग कधी पुन्हा गेलं की, तिला वाचवून दाखवलं की ती खुश होते, अन् एक चहा पाजवते. तिच्याबद्दल कुणी लिहावं असं तिला खूप वाटायचं, मग हे असं लिहून टाकतो कधीतरी.

मगाशी मित्राला त्याच्या रूमवर सोडून फ्लॅटवर आलो, आता झोपायचे आहे. पण झोप येईना झाली मागच्या आठवड्यात पुण्याला गेलो तेव्हा घेतलेलं समग्र "शेरलॉक होम्स" वाचायचं राहून गेलं आहे. जोवर डोळे लागत नाही तोवर वाचत बसेल म्हणतो.

Written by,
Bharat Sonawane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड