मुख्य सामग्रीवर वगळा

भटकंती With Gautala Wildlife Sanctuary..! 💙

भटकंती With Gautala Wildlife Sanctuary..! 💙

गेले दोन दिवस एकापाठोपाठ सुट्टया असल्यानं अन् आता आज सोमवारी पण सुट्टी असल्याने बरेच दिवस एकांताशी स्वगत करून, मनात चालू असलेल्या असंख्य घडामोडींना थोडा रिलीफ द्यावा म्हणून कित्येक दिवस निसर्ग जवळ करायचा विचार करत होतो. दोन दिवसांपूर्वी अखेर हा योग जुळून आला.

मला निसर्गात एकटं भटकायला भयंकर आवडते, नशिबानं मी राहतो ते शहर निसर्ग सौंदर्याने नटलेलं आहे. अन्; शहराच्या चहूबाजूंनी रानोमाळ भटकत राहता येईल असे कीत्येक डोंगरं-टेकड्या आहे. निसर्गानं आमच्यावर निसर्ग सौंदर्याची मुक्तहस्ताने उधळण केली आहे.

त्यामुळे हा निसर्ग सोडून बाहेर भटकायला जावं असे वाटत नाही, जरी या डोंगरातील रानवाटा ओळखीच्या झाल्या आहेत. जरी डोंगराच्या कपारीला वास्तव्य करणाऱ्या बांधवांना आम्ही ओळखीचं झालो आहे. कारण हेच की, या निसर्गाशी नेहमीच एकरूप होऊन आम्ही राहत आलो आहे. अन् त्याच्याशी एक नाळ कायम जोडली आहे.

आमची दररोजची पहाट याच गौताळा अभयारण्यात भटकत सुरू होते. अन्; सध्या नशिबानं माझी सायंकाळसुद्धा याच अभयारण्यात भटकंती करायला, फिरायला येऊन होते. इथे आले की शहरातील तो प्रत्येक नागरिक सुखावतो मग अश्या सलग सुट्टया पडल्या की, नकळत या डोंगररांगांच्या वाटा जवळ केल्या जातात.
मग आम्ही भटकत राहतो तोवर, जोवर आतला आवाज म्हणत नाही की आता जीवाला अन् शरीराला विसावा हवा आहे.
गेले दोन दिवस पहाटेच सहाला खांद्यावर पाण्याच्या बाॅटल्स असलेली बॅग अन् दोन मॅगीची पाकीटे, कॉफीचे साहित्य असलेली एक पिशवी, एक स्टीलचा मग असं भटकंतीचे साहित्य घेऊन एकटाच रानोमाळ भटकत होतो.

सूर्योदय झाला की, एखाद्या वाहत्या झऱ्याच्या, नाल्याच्या समीप बसून कॉफी होईल इतक्या काटक्या जाळून मग भरून कॉफी करून घ्यायचो. अभयारण्यात असलेल्या निरीक्षण मनोऱ्यावर जाऊन कॉफीच्या संगतीने हा सगळा हिरवाईने नटलेला निसर्ग डोळ्यात भरून घ्यायचो.

नशिबानं साथ दिली की अधूनमधून मोरांचा, विविध पक्षांचा आवाज कानी यायचा. अन् त्यांचं दर्शनही होऊन जायचं. मला भटकंतीला कुणी सोबत लागत नाही याचं कारण हेच असतं की, हा माझा मी स्वतःला दिलेला वेळ असतो.

त्यामुळे या काळात मला निसर्गाच्या जितकं समीप जाता येईल अन् जितकं मनाला शांती भेटल तितक हे सगळं मिळवण्याचा मी प्रयत्न करत असतो. यात निसर्गाला कुठली हानी पोहचणार नाही ही काळजी प्रथम क्रमांकावर घेऊन हे सगळं करत असतो.
मग दिवसभर दाट जंगलात न जाता शहराच्या चहूबाजूंनी असलेल्या सर्व टेकड्या डोंगरे मी भटकत राहतो. दहाचा पार कलला की मग कुठे पायवाटेच्या एका अंगाला मॅगी नूडल्स करून होतात अन् डोंगराच्या माथ्यावर जाऊन त्याला खात बसणं होतं. 

शरीर भटकंती करून थकलेलं असतं अश्यावेळी वाऱ्याच्या झुळकेसरशी येणारा गारवा अजून निसर्गाच्या जवळ घेऊन जातो. निवांत मेडीटेशन करत रहावं तसं डोळे बंद करून निसर्गाचा गारवा अनुभवत राहतो. नुकतंच पाऊस पडून गेला असल्यानं सर्व परिसर, अभयारण्य हिरवेगार झाले आहे. अश्या निवांतवेळी निसर्गाशी एकरूप होऊन भटकत राहण्यात सुख असतं.

मग दिवसभर असं भटकत राहतो. रानवाटेला असलेल्या पावलांचा माग काढत राहतो. निसर्गाने मुक्तहस्ताने केलेल्या उधळणीत नव्यानं आलेल्या झाडांच्या फुलांना, पानांना डोळ्यात भरून घेत राहतो. प्राणी, पक्ष्यांचा आवाज ऐकत बसून राहतो. रंगीबेरंगी दगडे जमा करत राहतो.

दूरवरून डोंगरात असलेल्या वाळलेल्या लाकडांची मोळी घेऊन जाणाऱ्या इसमांशी मनोमनच दोन गुजगोष्टी करून घेत राहतो. त्यांची दुःख समजून घेतो, मनाशीच त्यांना रिते करून मनालाच उत्तर देतो.

अस्ताला जाणाऱ्या सूर्याची चाहूल लागली की मग पुन्हा एकदा कॉफी करून अस्ताला जाणारा सूर्य कॉफीच्या एक-एक घोटासरशी माझ्या आत रिचवत राहतो. अन् मग जेव्हा मनातून आवाज येतो की, आता परतीच्या वाटेला लागायला हवं, तेव्हा निघतो घराच्या दिशेने.

दिवसभर मोबाईल ॲपवर पंधरा-वीस किमीची भटकंती झालेली असते. शहराच्या गर्दीत भटकत असलेलं मन आता थाऱ्यावर आलेलं असतं,परतीच्या प्रवासात पुन्हा गाव रहाटीचे जीवन जगणारी माणसं जवळ करतो. अन् आठ-दहा कीमीचा हा प्रवास एकटाच करत राहतो मनाने, अनवाणी भटकत राहणाऱ्या या माझ्या माणसांच्या गर्दीत.

तेव्हा प्रश्न पडून जात राहतो,
हे सगळं करून हाती काय लागलं..? 

मनाला तेव्हा उत्तर देता येत नाही. पण; उद्या पुन्हा रोजचं तेच आयुष्य सुरू होईल तेव्हा सर्व कसं फ्रेश वाटत राहतं. अन् आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला असतो, मन शांत झालेलं असतं. पुन्हा काही दिवस शहरात कामाच्या शोधार्थ हरवलेल्या माणसांच्या संगतीने मी ही मग वाटा भटकत राहतो.

एक उमगलेले असते अश्यावेळी माणूस किती मोठा झाला तरी निसर्ग त्याला जवळचा वाटतो अन् तो एकदा येऊन जातो असं अधूनमधून काही क्षणांचा विसावा घेण्यासाठी निसर्गाच्या कुशीत. काहीवेळ झाडाच्या बुंध्याशी डोकं टेकवून रिलीफ अनुभवण्यासाठी.

Unknown Photography.
Written by,
Bharat Sonawane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड