मुख्य सामग्रीवर वगळा

सहेला रे..!

सहेला रे..!

काही आठवणींना आठवांचा दरवळ असतो, अशीच ही एक सुगंधी आठवण. आज पुन्हा प्रवासात विचार करत असताना सिग्नल लागला अन् मन आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलत आठवांच्या कुप्पीतून त्या गोड आठवणीला अलगद सामोरे घेऊन आले.

असंच एकदा पुण्यातील मोशी येथील Exhibition साठी रात्री अकरा-बाराच्या दरम्यान औरंगाबादवरून निघालो. तेव्हा मी एका छोट्या कंपनीत सिनियर प्रॉडक्शन सुपरवायझर या हुद्द्यावर काम करत होतो. प्रवास सुरू झाला आकाशात असलेल्या चंद्राच्या मंद प्रकाशाच्या साक्षीने प्रवास सुरू झाला. ड्रायव्हर, कंपनीचे हौशी मालक, मी अन् अजून काही कंपनीतील मित्र असे आम्ही प्रवास करत होतो. 

कुठल्याश्या टोलनाक्यावर गाडी थांबली अन् रात्रीच्या तीन- साडेतीन वाजेच्या वेळी एक विशीतली तरुणी रातराणीच्या फुलांचा गजरा घेऊन आमच्या होंडासिटी कारकडे आली. ती फुलं विकणारी तरुणी कदाचित स्वतःच्या जागेतील तिने लावलेली फुलं विकत नसावी. कारण काही दहा-पंधरा मिनिटांपूर्वीच तिची ही गजऱ्याची टोपली तिनं उघडली असावी असं वाटत होतं. अन् ही रेडीमेड तयार गजरे तिला विकत कुठून भेटत असावी असंही वाटून गेलं. ड्रायव्हर अन् ती तरुणी यांच्यातील संवाद मी झोपल्याजागी ऐकत होतो.

यापूर्वी याच ड्रायव्हर बरोबर बऱ्याचवेळा प्रवास केला असल्यानं, त्याला माहित होते मला रातराणीच्या फुलांचा गजरा, त्याचा दरवळ किती आवडतो. मग त्याने दोन गजरे विकत घेतले, मस्त पान स्टॉलवर पान घडी घालून द्यावं तसे तिनं ती गजरे आम्हाला बांधून दिली. अन्; मग दोन्ही एका हातात बसतील असे नाजूक गजरे ड्रायव्हरच्या पुढे असलेल्या जागेवर लाऊन ड्रायव्हर मस्त गाडी चालवू लागला. संपूर्ण गाडीमध्ये त्याचा मंद सुगंध,दरवळ वाऱ्याच्या झुळकेसरशी येऊन जात होता. अन् रातराणीचा हा सुगंध आमची होणारी पहाट त्या फुलांच्या दरवळाने अजूनच खूलून गेली होती.

असंच पुढे त्या प्रवासात सकाळच्या सहा दरम्यान आम्ही पुन्हा एकदा एका ठिकाणी चहा प्यायला थांबलो तिथं पुन्हा एका दहा-बारा वर्षांच्या मुलाने आमच्यासमोर टोपली धरली. मी काही बोलायच्या आत पुन्हा ड्रायव्हरने एक मोठा गजरा त्याच्याकडून घेतला अन्; तो ही त्या मुलाने सुरेख पॅकींग करून दिला. तो तसाच गाडीमध्ये ठेवला.

अपेक्षित वेळेच्या आदी जेव्हा आम्ही Exhibition स्थळी पोहचलो तेव्हा त्या गजऱ्याचं काय करायचं ?कारण तो खराब होऊन जाईल. असा प्रश्न मला आमच्या ड्रायव्हरने केला अन् पुढे त्यानेच या प्रश्नाचे उत्तर शोधले. 

अन्; तो रातराणीचा दरवळ असलेला सुगंधी गजरा त्याने आमच्या ओळखीत असलेल्या कंपनीच्या मार्केटींग विभागात अन् Exhibition ठिकाणी त्यांच्या कंपनीची मार्केटींग करत असणाऱ्या ट्रेनी असिस्टंट मॅनेजर असलेल्या तरुणीला केसांत पिनअप करायला दिला. तिनंही कुठला प्रश्न न करता तो गजरा अलगद स्वीकारला अन् तो तिच्या मोकळ्या केसांत पिनअप केला.

तिच्या त्या कंपनीशी आमचे पूर्वीचे बरेच व्यवहार होत असत, पुढे मी तीन वर्ष या कंपनीत काम केलं. या काळात तिच्याशी कित्येकदा कॉलवर बोलणं झालं, कित्येक तिच्यासोबत डील झाल्या. तिचा ट्रेनी असिस्टंट मॅनेजरपासून सुरू झालेला प्रवास ते कंपनीतील Management विभागात एक महत्त्वाची तिनं पटकावलेली जागा हा प्रवास मी जवळून बघितला.

जेव्हा केव्हा तिच्याशी बोलणं व्हायचं, तेव्हा कित्येकदा या रातराणीच्या गजऱ्याच्या आठवणी आमच्या बोलण्यातून येऊन जायच्या अन् मग बरेच बोलणं विषयाला घेऊन पुढे होऊन जायचं. पुढे मी ती कंपनी सोडली अन् तेथील असे बरेच संपर्कही कायमचे संपुष्टात आले, ज्यांच्याशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले होते.

कधी कधी कॉर्पोरेट विश्वात असं लिमिटेड असणं जिव्हारी लागतं अन् मग असे काही सुगंधी क्षण आठवणींच्या कप्प्यात कैद होऊन जातात कायमसाठी. त्यांच्या आठवांचा दरवळ मग कायम आठवण स्वरूपात सोबत असतो.

Written by,
Bharat Sonawane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...