मुख्य सामग्रीवर वगळा

सहेला रे..!

सहेला रे..!

काही आठवणींना आठवांचा दरवळ असतो, अशीच ही एक सुगंधी आठवण. आज पुन्हा प्रवासात विचार करत असताना सिग्नल लागला अन् मन आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलत आठवांच्या कुप्पीतून त्या गोड आठवणीला अलगद सामोरे घेऊन आले.

असंच एकदा पुण्यातील मोशी येथील Exhibition साठी रात्री अकरा-बाराच्या दरम्यान औरंगाबादवरून निघालो. तेव्हा मी एका छोट्या कंपनीत सिनियर प्रॉडक्शन सुपरवायझर या हुद्द्यावर काम करत होतो. प्रवास सुरू झाला आकाशात असलेल्या चंद्राच्या मंद प्रकाशाच्या साक्षीने प्रवास सुरू झाला. ड्रायव्हर, कंपनीचे हौशी मालक, मी अन् अजून काही कंपनीतील मित्र असे आम्ही प्रवास करत होतो. 

कुठल्याश्या टोलनाक्यावर गाडी थांबली अन् रात्रीच्या तीन- साडेतीन वाजेच्या वेळी एक विशीतली तरुणी रातराणीच्या फुलांचा गजरा घेऊन आमच्या होंडासिटी कारकडे आली. ती फुलं विकणारी तरुणी कदाचित स्वतःच्या जागेतील तिने लावलेली फुलं विकत नसावी. कारण काही दहा-पंधरा मिनिटांपूर्वीच तिची ही गजऱ्याची टोपली तिनं उघडली असावी असं वाटत होतं. अन् ही रेडीमेड तयार गजरे तिला विकत कुठून भेटत असावी असंही वाटून गेलं. ड्रायव्हर अन् ती तरुणी यांच्यातील संवाद मी झोपल्याजागी ऐकत होतो.

यापूर्वी याच ड्रायव्हर बरोबर बऱ्याचवेळा प्रवास केला असल्यानं, त्याला माहित होते मला रातराणीच्या फुलांचा गजरा, त्याचा दरवळ किती आवडतो. मग त्याने दोन गजरे विकत घेतले, मस्त पान स्टॉलवर पान घडी घालून द्यावं तसे तिनं ती गजरे आम्हाला बांधून दिली. अन्; मग दोन्ही एका हातात बसतील असे नाजूक गजरे ड्रायव्हरच्या पुढे असलेल्या जागेवर लाऊन ड्रायव्हर मस्त गाडी चालवू लागला. संपूर्ण गाडीमध्ये त्याचा मंद सुगंध,दरवळ वाऱ्याच्या झुळकेसरशी येऊन जात होता. अन् रातराणीचा हा सुगंध आमची होणारी पहाट त्या फुलांच्या दरवळाने अजूनच खूलून गेली होती.

असंच पुढे त्या प्रवासात सकाळच्या सहा दरम्यान आम्ही पुन्हा एकदा एका ठिकाणी चहा प्यायला थांबलो तिथं पुन्हा एका दहा-बारा वर्षांच्या मुलाने आमच्यासमोर टोपली धरली. मी काही बोलायच्या आत पुन्हा ड्रायव्हरने एक मोठा गजरा त्याच्याकडून घेतला अन्; तो ही त्या मुलाने सुरेख पॅकींग करून दिला. तो तसाच गाडीमध्ये ठेवला.

अपेक्षित वेळेच्या आदी जेव्हा आम्ही Exhibition स्थळी पोहचलो तेव्हा त्या गजऱ्याचं काय करायचं ?कारण तो खराब होऊन जाईल. असा प्रश्न मला आमच्या ड्रायव्हरने केला अन् पुढे त्यानेच या प्रश्नाचे उत्तर शोधले. 

अन्; तो रातराणीचा दरवळ असलेला सुगंधी गजरा त्याने आमच्या ओळखीत असलेल्या कंपनीच्या मार्केटींग विभागात अन् Exhibition ठिकाणी त्यांच्या कंपनीची मार्केटींग करत असणाऱ्या ट्रेनी असिस्टंट मॅनेजर असलेल्या तरुणीला केसांत पिनअप करायला दिला. तिनंही कुठला प्रश्न न करता तो गजरा अलगद स्वीकारला अन् तो तिच्या मोकळ्या केसांत पिनअप केला.

तिच्या त्या कंपनीशी आमचे पूर्वीचे बरेच व्यवहार होत असत, पुढे मी तीन वर्ष या कंपनीत काम केलं. या काळात तिच्याशी कित्येकदा कॉलवर बोलणं झालं, कित्येक तिच्यासोबत डील झाल्या. तिचा ट्रेनी असिस्टंट मॅनेजरपासून सुरू झालेला प्रवास ते कंपनीतील Management विभागात एक महत्त्वाची तिनं पटकावलेली जागा हा प्रवास मी जवळून बघितला.

जेव्हा केव्हा तिच्याशी बोलणं व्हायचं, तेव्हा कित्येकदा या रातराणीच्या गजऱ्याच्या आठवणी आमच्या बोलण्यातून येऊन जायच्या अन् मग बरेच बोलणं विषयाला घेऊन पुढे होऊन जायचं. पुढे मी ती कंपनी सोडली अन् तेथील असे बरेच संपर्कही कायमचे संपुष्टात आले, ज्यांच्याशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले होते.

कधी कधी कॉर्पोरेट विश्वात असं लिमिटेड असणं जिव्हारी लागतं अन् मग असे काही सुगंधी क्षण आठवणींच्या कप्प्यात कैद होऊन जातात कायमसाठी. त्यांच्या आठवांचा दरवळ मग कायम आठवण स्वरूपात सोबत असतो.

Written by,
Bharat Sonawane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...