मुख्य सामग्रीवर वगळा

स्वगत मनाचे..!

स्वगत मनाचे..!

पाऊस निर्धोक होऊन विजांच्या कडकडाटासह पन्हाळातून बरसतोय, मगाशीच काळोखात हरवून जावी तशी संपूर्ण शहराची लाईट एकदमच गेली अन् एकदमच सारं शहर अंधारून गेलं. काही वेळापूर्वी सेकंड शिफ्टची सुट्टी आज लवकरच घेऊन कंपनीतून आलो. ओले झालेले सेफ्टी शूज खिडकीच्या ग्रीलला लेसने बांधून टाकले अन् सॉक्स दरवाज्याच्या लॅचला अटकवून बेडवर पडून राहिलो.

मित्र आज त्यांची थर्ड शिफ्ट असल्यानं केव्हाच कंपनीत निघून गेली असतील. कारण बरसणारा पाऊस अन् त्याचा अंदाज घेऊन आज ड्युटी करावी लागेल, याचा अंदाज आज पहाटे उत्तरेच्या दिशेने भरून आलेल्या आभाळाला बघूनच आला होता. मी दुपारसरल्या जेव्हा कंपनीत गेलो तेव्हा अंदाज वाटत होता की, गरजत असलेली ढग बरसणार नाही. पण; उलट झालं अन् आता मगा एक तासापासून विजांच्या कडकडाटासह धो-धो पाऊस चालू आहे.

आल्यावर पन्हाळ्यातून पडणाऱ्या पावसाच्या पाण्याच्या तालावर सकाळी मित्राने चहा प्यायला गेला, तेव्हा आणलेला पेपर कितीवेळ वाचत बसलो. आता एकट्याला जेवायला काय करू.? या एका अस्सल गृहीणीसारख्या मला पडणाऱ्या प्रश्नाला मी येताना उत्तर शोधले अन् तीन अंडी काळ्या पिशवीत पेपरात बांधून घेऊन आलो.

भिजलेले कपडे बदलून घेतले, ओले झालेले केस कोरडे करून कांदा चिरून घेतला. मस्त चटणी करून पहाटेच्या तीन चपात्या समवेत जेवण करून घेतलं. दोन-तीन दिवस जरा मन निराश आहे. का.? याला कारण इथे मला जवळून ओळखणारे मित्र मैत्रिणी जाणून आहेच. पण; असो होईल सर्व सुरळीत या आशेवर हा एकट्याचा संसार सुरू आहे.

मगाशी आलो तेव्हा फ्लॅट मालकाच्या मुलीने माझ्या हातात पार्सल देत तुमच्या नावाने पार्सल आलं आहे म्हणून सांगितलं. अन् ते मला बघत हसतच माझ्या हातात दिलं. लिफाफा होता, लिफाफ्याच्या आत मी कुठल्या कॉलेजला सहा महिन्यांपूर्वी असिस्टंट प्रोफेसर पदासाठी अर्ज केला होता त्याच्या पॅनल इंटरव्ह्यूसाठी बोलावणं आल्याचं ते पत्र होतं.

पूर्वी इंटरव्ह्यूला लागलेल्या सेटिंग अन् आलेले वाईट अनुभव म्हणून मी ते लेटर बाजूला ठेवलं. अन् अस्थिर आयुष्याला घेऊन, मनाला पडलेल्या असंख्य प्रश्नांना उत्तर पन्हाळातून पडणाऱ्या पावसाच्या पाण्याकडे बघत शोधत बसलो.

तितक्यात फ्लॅट मालकाची मुलगी पुन्हा हातात काही पुस्तकं घेऊन आली, कदाचित तिनं तिच्या कॉलेज लायब्ररीमधून दिवाळीच्या सुट्ट्या लागण्याआदी माझ्यासाठी वाचायला म्हणून ती काही पुस्तकं आणली असावी. कारण आम्ही नेहमीच एकमेकांची पुस्तकं आदलीबदली करून वाचत राहतो. एकमेकांना ती शेअर करत राहतो.

तिने हातात पुस्तकं दिली पडत्या पावसात नको जाऊस म्हणून बराचवेळ तिच्याशी गप्पा मारून झाल्या. सोबत कॉफी झाली अन् तिनं सांगितलं की पुढच्यावेळी मला "महाश्वेता देवी" यांची काही पुस्तकं वाचायला मिळाली, तर देशील का.? अन् कालच मी याबद्दल इथे पोस्ट केली होती. ती तिने बघितली असावी कदाचित, काल बऱ्याच पुस्तकांची नव्यानं ओळख झाली. तेव्हा तिच्या-माझ्यासाठी काही पुस्तकं शोधून ठेवावी लागतील आता.

तूर्त तिला काही दोन-तीन पुस्तकं अन् "ऑक्टोबर जंक्शन" ही एका मैत्रिणीने दिलेली कादंबरी तिच्याशी शेअर करून तिला वाटी लावले.

हे लिहत बसलो तोवर निर्धोक बरसणारा पाऊस हळू हळू क्षमला होता. अन् आता रस्त्यांच्या दुतर्फा बाजूनं संथपणे वाहणारे पाणी मी डोळ्यांनी टिपत बसलो होतो. खिडकीच्या विंडोग्रीलला लेस बांधलेली शूज वाऱ्याच्या झोताने हळुवार झुलत होती. 

पन्हाळ्यातून वाहणारे पाणी आता हळुवार नारळाच्या फांद्यावर पडत होतं अन् त्याचा एक विशिष्ट आवाज येऊन जात होता. आज बराच पाऊस पडला, त्यामुळे उद्या पहाटे फिरायला जायचं वाचल्याने मनातून मी खुश होतो. मला फिरायला जायला किती जीवावर येतं या भावनेनं खजील होऊन पुन्हा मलाच मी हसतही होतो.

शांत बरसणाऱ्या पावसाच्या संगतीने थोडं बहोत साहिर अन् अमृता प्रीतम यांच्याबद्दल वाचत बसलो. यांच्या दोघांत मला ईमरोजची झालेली फरफट बघून वाईट वाटले. अन् शेवटी साहिर यांचा आपल्या आई जाण्याच्या काही दिवसांनी जगाचा निरोप हे सगळं दुःखद आहे.

साहिर यांचं आईवरचं प्रेम इतकं होतं की, त्यांनी आईच्या प्रेमात फूट पडेल, ती माझ्यापासुन दुरावेल म्हणून आयुष्यभर त्यांच्या आयुष्यात कित्येक मुली येऊनही लग्न केलं नाही. हे बघून त्यांचं आईप्रती असलेलं प्रेम दिसून आले.

आता इतकं सगळं वाचून झाल्यावर काय विचार करावा हे समजेना झालं म्हणून हे असं काहीतरी खरडत बसलो होतो. लॅचला अटकवून ठेवलेले सॉक्स एरवी वाळले असतील त्यांना मध्ये घेऊन, झोपून राहतो आता.

Written by,
Bharat Sonawane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...