मुख्य सामग्रीवर वगळा

सुगीचे दिस..! भाग - ८

सुगीचे दिस..! भाग - ८

पाटलांचे पाटीलकी तोऱ्यात बोलणं चालू होतं. पाटलांच्या मोठ्या गप्पा अन् त्यांचा तो तालेवार बाजपणा बघून आता मी अन् इस्माईलसुद्धा थोडे सावरलो होतो. पाटलांच्या गप्पा आम्ही काम करत करत ऐकत होतो. हळू हळू विषय पाटील बाईकडे सरला अन् मग बायका त्यांच्या गप्पात जश्या चुगल्या करतात,तश्या पाटील पाटील बाईंच्या चुगल्या करायला लागले, आम्ही सगळे हसायलो लागलो. भोळ्या राजू पण पाटलांच्या हो मध्ये हो मिसळत पाटलांची री ओढू लागला अन् पाटील बाईंना नावे ठेऊ लागला होता.

शांता मामी, इस्माईलची आई अन् माय हे सगळे पाटलांच्या गप्पा ऐकत काम करत होते. चारचा पार कलला तसं पाटील गावात काम निघालं म्हणून गावात निघून गेले. अन् ; आम्ही उक्त्यात काम असल्यानं कामाचा जोर उतरत्या उन्हात वाढवून घटकाभर उद्यासाठी दोन सऱ्यांचे कांदे काढून ठेवले म्हणजे उद्या पहाटे आलं की सकाळच्या पहारे ती चराचर चिरून पातीपासून वेगळी केली जातील. बरच काम उरकून घेतल्या जाईल.

पाटील चारचा पार कलला तेव्हा निघून गेले, तसं; दिवसभर पात वाहणारा भोळ्या राजू त्यांच्या संगतीने झुळक्या बावडीकडे निघून गेला अन् गोठ्यात शेणखुर करू लागला. मी अन् इस्माईल थोडं भटकून आलो अन् दोन्ही खिश्यात शिगोशिग भरून बोरं घेऊन आलो. अन् खात खात काम करू लागलो होतो. दोघांना आता भोमारा आला होता.
भोमाऱ्याने दोघांची नाके गळू लागली होती. अन् नाक पुसून मात्र आता सदऱ्याच्या बाह्या कडक झाल्या होत्या अन् तरीही आम्ही काम करत असताना बोरं खात होतो.

भोळ्या राजूने गव्हणीत असलेल्या सर्व गुरांना पाणी दाखवले अन्; गव्हाण झाडून घेत त्यांना व्यवस्थित बांधून ठेवले. आमची पण कामाची सुट्टी थोड्यावेळाने होणार होती. त्यांच्या झोपडीवजा घरासमोर राजूने तुराट्याच्या झाडूने सांच्याला खराखर झाडून घेतलं.
गाई म्हशींचे दूध काढायला म्हणून तो त्याच्या कामाला लागला, सहाचा पार कलला तसं आम्ही काम आवरते घेतले. अन् माय, शांता मामी अन् इस्माईलच्या मायने डब्ब्याच्या पिशवीत थोडी थोडी पात सांजच्या पिठल्यात टाकून गरम गरम पिठले करण्यासाठी घेतली

सांज ढळली तसं आम्ही घराच्या वाटा जवळ केल्या. शांता मामी, इस्माईलची माय अन् मायकडे कांद्याची पातीच्या जुड्या होत्या. त्यांनी त्या डोक्यावर घेतल्या होत्या अन् अंधार पडायच्या आत घर जवळ करायचं म्हणून आम्ही सगळेजन पाऊले उचलून भराभर चालत होतो. हिवाळ्याचे दिवस असल्यानं दिवस लवकरच मावळून येत होता अन् पहाटे सकाळीसुद्धा लवकर उगवत होता.

त्यामुळं उक्त्यात फार काम ओढले जात नव्हते. सूर्य अस्ताला गेला तसं आम्ही घराच्या वाटा जवळ जवळ करत गावात येऊन पोहचलो होतो. गावात सप्ताह असल्यानं गावात सडा रांगोळ्या टाकून झाल्या होत्या. भजन कीर्तन संपून सांजेचा हरिपाठ सुरू झाला होता. म्हातारी माणसं हरिपाठ करायला जात असताना हातात दोन अगरबत्त्या घेऊन चालली होती होती.

तर विणेकरी तुळसा आबा एका पायावर टेकू देऊन, उभे राहू वीणा वाजवत होते. मंडपाला चहूबाजूंनी गावातल्या बायकांनी सडा रांगोळ्या घातल्या होत्या आज सांजेला गावात असलेल्या भामासाद महाराज यांच्या पादुकांची मिरवूनक साऱ्या गावातून निघणार होती.सारा गाव सडा रांगोळ्यांनी सजुन गेला होता. 
गावात ठिकठिकाणी रांगोळी अन् फुलांच्या आरासी करून छान छान रांगोळ्या काढल्या होत्या. 

शेतात जाणारी लोकं फार महत्त्वाचं काम असेल तरच शेतात जात होती, नाहीतर हफ्ताभर सगळ्या लोकांनी शेतातील कामे पुढे ढकलली होती. अंधार झाला तसा सारा गाव विठ्ठल रखुमाईच्याभक्तीत रममाण झाला होता

क्रमशः

भारत लक्ष्मण सोनवणे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...