मुख्य सामग्रीवर वगळा

सुगीचे दिस..! भाग - ११

सुगीचे दिस..! भाग - ११

पाटील सांगावा सांगून गेले, अन् मायने बिगी बिगी आवरून पहाटेची न्याहारी करायला म्हणून मला आवाज दिला. मी तुळसा नानीच्या टपरीवर बसून गप्पा झोडीत बसलो होतो. आजाच्याला नारळी सप्त्याची समाप्ती होणार होती. मग साऱ्या गावात रांगोळ्या काढून झाल्या होत्या, पालखी निघायची तयारी सुरू होती. सावता माळ्याच्या देवळात स्वयंपाक चालू होता. काल वावधन आल्यानं सगळ्यांची भंबेरी उडाली होती मात्र वेळीच पाऊस न पडल्याने सगळ्यांचा जीवात जीव आला होता. आता मात्र सप्त्याची सांगता कुठलेही विघ्न न येता होणार होती.

सप्त्याची सांगता असूनही आम्हाला आज घरी थांबता येणार नव्हतं, कारण पाटलांनी धाडलेला सांगावा अन् सध्या उक्त्यात सुरू असलेली कामाची रेलचेल त्यामुळं गावात आज धामधूम असूनही आम्ही निवांत होतो. मायना आवाज दिला तसा मी पहाटेच्या न्याहारीसाठी आमच्या झोपडीवजा घराकडे निघालो. मायची बीगीनेच कामाची आवराआवर सुरू होती,वमी एका थाटलीत उलीसं कोड्यास घेऊन भाकरीचा तुकडा मोडून तिच्यात बुडवून खात बसलो होतो. माय परसदारी असलेल्या चुल्हीतून राखुंडा घेऊन बासनं करत बसली होती.

तितक्यात इस्माईल आणि त्याची माय अन् शांत आक्का आमच्या घराच्या दिशेनं मला बोडक्या बाभळीच्या पल्ल्याड दिसल्या. मी ही पटकन भाकर खाऊन, मायना घासलेली बासनं घरात ठेवली अन् मायने बांधलेल्या भाकरीच्या पेंडक्याला घमिल्यात ठेऊन दाराला कडीकोंड्यात अडकवून निघालो. मायना डोक्यावर पदर घेतला अन् माय, शांता मामी इस्माईलची माय यांच्या संगतीने वाटेला लागली.

इस्माईलने सावता माळ्याच्या देवळात सुरू असलेल्या सप्त्याच्या स्वयंपाकातून दोन गिल्लासात भरून बुंदी आणली. त्यातील एक गिल्लास मला देऊन तो ही एका गिल्लासातील बुंदी खाऊ लागला. आज पहाटेच लवकर जाऊन सांजेच्या चारच्या पारापर्यंत कांदे काढायचं काम पूर्ण होण्याचा अंदाज होता. काम पूर्ण झालं की मग तिकडून येताना पाटील घरी खायला काही म्हणून काही दुभळके, डोंगळे कांदे आम्हाला निवडून देणार होता.

काही नसल्यापेक्षा बरं म्हणून आम्ही आज खुश होतो. कामाचा उरक बघून काम पटकन करून चारच्या पारगाला घरी यायचं. जमलं तर सप्त्याची सांगता पण हाती लागल, म्हणून आम्ही वाटेनं जरा पाय उचलूनच घेतले आणि पाटलांच्या वावराला जवळ करायला लागलो. पहाटच सगळ्या गावात सप्त्याची सुरू असलेली लगबग आणि आमचं कामाला जाण्याची लगबग बघून गावातल्या घरी असलेल्या बायका इस्माईलच्या मायला अन् शांता मामीला प्रश्न करू लागली.

डोक्यावरील पाटी सांभाळत तिघी एकमेकांना बघून गावातल्या बायकांच्या प्रश्नांची उत्तरे देऊ लागली . मी अन् इस्माईल बुंदी खात चालत असल्यानं गावातली पारावर बसलेली माणसं आमची फजिती होईल आम्ही चिडू म्हणून आमची मजाक उडवू लागले. आम्हाला म्हणू लागले छोट्या कामदार पोरांना रोज गावची उखीडे हिंडणारे तुम्ही आज तरी घरी राहून गावच्या कार्यात वाढूसवरू लागायला रहायचं होतं. पण; आमचं काम आमच्या गरिबीच्या अठरा विश्व दारिद्य्र असलेल्या परिस्थितीमध्ये किती महत्त्वाचं अन् उद्याचे येणारे दिवस त्यावरच आमचं घर चालणार होतं हे त्याना कळणार नव्हतं.

कारण आता उन्हाळ्याचे दिवस काही पंधरादी सरली की लागणार होती अन् एकदाका कडक उन्हाळा सुरू झाला का मग मात्र लोकांच्या शेतातील कामे आवरती होतील. अन् मग भर उन्हात रोजीरोटी न भेटल्याने खायची वानवा होणार होती. हे भविष्य पारावर गप्पा हाणत असलेल्या लोकांना दिवस नव्हतं. आम्ही हातात असलेल्या गिल्लासातील बुंदी खात तापलेल्या भुईवर फुफाट्यात पाय रोवत चालत होतो.


क्रमशः
भारत लक्ष्मण सोनवणे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...