मुख्य सामग्रीवर वगळा

सुगीचे दिस..! भाग - ११

सुगीचे दिस..! भाग - ११

पाटील सांगावा सांगून गेले, अन् मायने बिगी बिगी आवरून पहाटेची न्याहारी करायला म्हणून मला आवाज दिला. मी तुळसा नानीच्या टपरीवर बसून गप्पा झोडीत बसलो होतो. आजाच्याला नारळी सप्त्याची समाप्ती होणार होती. मग साऱ्या गावात रांगोळ्या काढून झाल्या होत्या, पालखी निघायची तयारी सुरू होती. सावता माळ्याच्या देवळात स्वयंपाक चालू होता. काल वावधन आल्यानं सगळ्यांची भंबेरी उडाली होती मात्र वेळीच पाऊस न पडल्याने सगळ्यांचा जीवात जीव आला होता. आता मात्र सप्त्याची सांगता कुठलेही विघ्न न येता होणार होती.

सप्त्याची सांगता असूनही आम्हाला आज घरी थांबता येणार नव्हतं, कारण पाटलांनी धाडलेला सांगावा अन् सध्या उक्त्यात सुरू असलेली कामाची रेलचेल त्यामुळं गावात आज धामधूम असूनही आम्ही निवांत होतो. मायना आवाज दिला तसा मी पहाटेच्या न्याहारीसाठी आमच्या झोपडीवजा घराकडे निघालो. मायची बीगीनेच कामाची आवराआवर सुरू होती,वमी एका थाटलीत उलीसं कोड्यास घेऊन भाकरीचा तुकडा मोडून तिच्यात बुडवून खात बसलो होतो. माय परसदारी असलेल्या चुल्हीतून राखुंडा घेऊन बासनं करत बसली होती.

तितक्यात इस्माईल आणि त्याची माय अन् शांत आक्का आमच्या घराच्या दिशेनं मला बोडक्या बाभळीच्या पल्ल्याड दिसल्या. मी ही पटकन भाकर खाऊन, मायना घासलेली बासनं घरात ठेवली अन् मायने बांधलेल्या भाकरीच्या पेंडक्याला घमिल्यात ठेऊन दाराला कडीकोंड्यात अडकवून निघालो. मायना डोक्यावर पदर घेतला अन् माय, शांता मामी इस्माईलची माय यांच्या संगतीने वाटेला लागली.

इस्माईलने सावता माळ्याच्या देवळात सुरू असलेल्या सप्त्याच्या स्वयंपाकातून दोन गिल्लासात भरून बुंदी आणली. त्यातील एक गिल्लास मला देऊन तो ही एका गिल्लासातील बुंदी खाऊ लागला. आज पहाटेच लवकर जाऊन सांजेच्या चारच्या पारापर्यंत कांदे काढायचं काम पूर्ण होण्याचा अंदाज होता. काम पूर्ण झालं की मग तिकडून येताना पाटील घरी खायला काही म्हणून काही दुभळके, डोंगळे कांदे आम्हाला निवडून देणार होता.

काही नसल्यापेक्षा बरं म्हणून आम्ही आज खुश होतो. कामाचा उरक बघून काम पटकन करून चारच्या पारगाला घरी यायचं. जमलं तर सप्त्याची सांगता पण हाती लागल, म्हणून आम्ही वाटेनं जरा पाय उचलूनच घेतले आणि पाटलांच्या वावराला जवळ करायला लागलो. पहाटच सगळ्या गावात सप्त्याची सुरू असलेली लगबग आणि आमचं कामाला जाण्याची लगबग बघून गावातल्या घरी असलेल्या बायका इस्माईलच्या मायला अन् शांता मामीला प्रश्न करू लागली.

डोक्यावरील पाटी सांभाळत तिघी एकमेकांना बघून गावातल्या बायकांच्या प्रश्नांची उत्तरे देऊ लागली . मी अन् इस्माईल बुंदी खात चालत असल्यानं गावातली पारावर बसलेली माणसं आमची फजिती होईल आम्ही चिडू म्हणून आमची मजाक उडवू लागले. आम्हाला म्हणू लागले छोट्या कामदार पोरांना रोज गावची उखीडे हिंडणारे तुम्ही आज तरी घरी राहून गावच्या कार्यात वाढूसवरू लागायला रहायचं होतं. पण; आमचं काम आमच्या गरिबीच्या अठरा विश्व दारिद्य्र असलेल्या परिस्थितीमध्ये किती महत्त्वाचं अन् उद्याचे येणारे दिवस त्यावरच आमचं घर चालणार होतं हे त्याना कळणार नव्हतं.

कारण आता उन्हाळ्याचे दिवस काही पंधरादी सरली की लागणार होती अन् एकदाका कडक उन्हाळा सुरू झाला का मग मात्र लोकांच्या शेतातील कामे आवरती होतील. अन् मग भर उन्हात रोजीरोटी न भेटल्याने खायची वानवा होणार होती. हे भविष्य पारावर गप्पा हाणत असलेल्या लोकांना दिवस नव्हतं. आम्ही हातात असलेल्या गिल्लासातील बुंदी खात तापलेल्या भुईवर फुफाट्यात पाय रोवत चालत होतो.


क्रमशः
भारत लक्ष्मण सोनवणे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...