मुख्य सामग्रीवर वगळा

सुगीचे दिस..! भाग - ९

सुगीचे दिस..! भाग - ९

दिवसभर पाटलांच्या वावरात ऊक्त्यात कांदे काढायचे काम करून मी थकून गेलो होतो. अस्ताला गेलेल्या सूर्या बरोबर मी घरी पोहचलो अन् बाहेर ठेवलेल्या रांजनातील गार झालेल्या पाण्याने मी हातपाय धुवून परसदारी असलेल्या आमच्या चुल्हीजवळ येऊन बसलो. अंगात हुडहुडी भरून आली होती, हवेत गारवा होता.

मायना माझ्या आधीच हातपाय धुतले होते अन् देव्हाऱ्यात दिवाबत्ती करून तिने बाहेर असलेल्या तुळशी वृंदावनात अगरबत्ती खोचली. अन् चुल्हीवर कोरा चहा करायला ठेवला, धगधगत्या आगीची झळ माझ्या बसल्यापर्यंत येत होती अन् दिवसभर काम करून अवघडून गेलेले शरीर या गरमगरम शखाने उजळून निघावे तसं हरकले होते. 

चहा उकळत होती, तिचा मंद कोरा सुगंध नाकाशी दरवळत होता. आई अधूनमधून उकळ आलेल्या चहाला सांडशीत पकडुन हलवत होती अन् वाफाळलेला चहा मग अजूनच दरवळत होता. चहा उकळून पार काळाठीक्क झाला अन् मायने एका पेल्यात तो मला ओतून दिला, पिठाच्या डब्यातून तो बटर माझ्यासमोर धरले.
अनपेक्षित बटर समोर आल्याने मला आनंद झाला, मी चुल्हीच्या शखा मोहरे बसून पेल्यात ती बटर कोंबली अन् चमच्याने त्यांना खात बसलो. मायने बशीत चहा ओतला अन् नथीचा अंदाज घेत ती ही नथ सावरत चहा घेत बसली.

चहा घेऊन झाला तसं मी दहा-पाच मिनिटं चुल्हीजवळ बसून पुन्हा परसदारी असलेल्या आमच्या खाटेवर येऊन लोळत बसलो. अगरबत्तीचा दरवळ साऱ्या अंगणात घुमू लागला होता. सांजेला सुरू झालेला गावातील सावत्या माळ्याच्या देवळातील हरिपाठ आता संपला होता अन् गावची हरिपाठ म्हणणारी माझी माऊली ज्याच्या त्याच्या घराच्या वाटा जवळ कर होती.

थंडीचे दिवस सुरू असल्याने गावात जागोजागी शेकोट्या पेटल्या होत्या. गावातली तरणी पोरं चौकात शेकोटी पेटवून गावातल्या लोकांची मापे काढत बसली होती. तर गावातली म्हातारी लोकं देवळाजवळ असलेल्या पारावर शेकोटी पेटवून त्यांच्या भूतकाळातील आठवणींशी वर्तमान काळाचा अन् भविष्य काळाचा संबंध जोडून जुन्यानव्या गोष्टींचे अनुमान लावत गप्पा करत बसले होते.

आकाशात आभाळ दाटून आलं होतं, कदाचित वाऱ्याच्या सोसाट्यासह पाऊस बरसतो की काय असं झालं होतं अन् वाऱ्याच्या झोताने वातावरणात फार गारठाही निर्माण झाला होता. झाडांवर नव्याने फुटलेल्या अन् शिशिरात पानगळ झालेल्या पानांची सर्वत्र सळसळ परिसरात ऐकू येऊ लागली होती. 

पावसाचा अंदाज येतो की काय असं वाटू लागल्याने गावातील लोकांची पुन्हा एकदा वावराच्या वाटा जवळ करायला लागतात की काय या विचाराने लोकं भयभीत होऊन आकाशाकडे बघत बसले होते. कोणी ताडपत्र्या घेऊन रात्रीची भाकर खाण्या आधीच आल्या रस्त्याने पुन्हा वावराच्या वाटेला लागले होते, सोसाट्याचा वारा मी म्हणत होता. 

सावता माळ्याच्या देवळात असलेला सभामंडप वाऱ्याच्या झोताने पार उडून जातो की काय असं झालं होतं. सप्त्याची सारी मंडळी ज्याच्या त्याच्या घरी गेली होती, तितकी विनेकरी म्हातारी माणसं अन् टाळकरी माय माउली उधाणलेल्या वाऱ्याच्या झुळका बघत सावता माळ्याच्या देवळाच्या एका अंगाला असलेल्या अन् मोडकळीस आलेल्या पत्र्याच्या खोलीत देवाचा धावा करत बसली होती. वाऱ्याचा झोत वाढला की खोलीवरचे पत्र मोडल्यासारखे कडकड वाजायची अन् आता जर वावधनाने पत्र उडून गेली तर गावात दरसाल सुरू असलेल्या हरिनाम सप्ताहाचे नियोजन बिघडेल असं सगळ्यांना वाटू लागलं होतं.

वावधनामुळे साऱ्या गावाची लईन गेली होती, सारा गाव एकाकीच एखाद्या भूकंपात किंवा काहीतरी मोठ्या नैसर्गिक आपत्तीत गुडूप होऊन कायमचा लुप्त व्हावा तसा अंधारात गुडूप झाला होता. वावधन आलं तसं काही लोकं बनिम झाकायला म्हणून वावरात निघून गेली अन् काही भाकर कुटका खाऊन चिमणीच्या अंधुक अंधुक उजेडात झोपी गेले. 

वावधानाचा जोर काही केल्या ओसरत नव्हता मी ही आता आमच्या कुडाने शेकारलेल्या झोपडीत बाज टाकून निपचित सोसाट्याचा वारा शांत होण्याची वाट बघत बसलो होतो. 

क्रमशः
भारत लक्ष्मण सोनवणे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...