मुख्य सामग्रीवर वगळा

सुगीचे दिस..! भाग - १२

सुगीचे दिस..! भाग - १२

जसं जसं आम्ही पाटलांच्या वावराची वाट जवळ करत होतो तसंतसं भुईला फुफाट्यात रोवलेल्या आमच्या पावलांच्या खुणा मागे आधिक स्पष्ट दिसू लागल्या होत्या. अन् त्या आमच्या उज्वल भविष्याचं प्रतिनिधित्व करत त्या करत होत्या. मावळाचा चाळ मागे पडला अन् पहाटेची दहा वाजून गेले, काहीली काहिली करणाऱ्या उन्हाच्या झळांनी पुन्हा तुटायला सुरु केलं होतं.

माळावर काही वेळ बसून जवळच्या पाणपोईवर आम्ही पोटभर पाणी रिचवले अन् पुन्हा फुफाट्यात माखून गेलेल्या रानवाटा जवळ करून लागलो. इस्माईल अन् मी निवांत खाऊन झालेल्या बुंदीबद्दल बोलत बोलत चालत होतो. इस्माईलची माय, शांता मामी, अन् माय कांद्याच्या वाट्याबद्दल बोलत होत्या.

गप्पा मारत पाटलांच्या वावरात आम्ही केव्हा पोहचलो कळलं नाही. वावरात भोळ्या राजू आमच्या आदी पोहचला होता, आज कोणत्या हालतीत कांदे काढून झाले पाहिजे अशी ताकीद पाटलांनी त्याला भरलेली दिसत होती. आम्ही आलो तसं त्याने केळीत भरून विहिरीतून पानी आणले अन् आम्ही पाणी पिऊन कामाला लागलो. मी अन् इस्माईल कापून ठेवलेला कांदा कांद्याच्या पोळीवर नेऊन टाकू लागलो, माय अन् शांता मामी ते कांदे चराचर कापू लागले. 

भोळ्या राजू गुरांना चारापाणी करून आमच्या मदतीला आला अन् तोही डालग्यात कांदे घेऊन वाहू लागला. तो असं सोबत काम करू लागला तर चारच्या सुमाराला आमचं कांद्याचे उक्त्यातील काम संपेल असा अंदाज येत होता. कालच्या झालेल्या वावधनामुळे भोळ्या राजूची अन् पाटलाची झालेली फजिती भोळ्या राजू त्याच्या भाषेत आम्हाला रंगवून सांगत होता. आम्ही पण त्याला हसून काम करत होतो.

कांदे कापून झाली तसं दुपारचा एक वाजून गेला होता. आता फक्त कापलेल्या कांद्याची पोळीवर वाट लाऊन मोकळं व्हायचं राहीलं होतं. मग दुपारची भाकर खाऊन हे काम एका झटक्यात पूर्ण करू असं भोळ्या राजू म्हंटला अन् आम्ही भाकरी खायला म्हणून बावडीवर येऊन बसलो.

भोळ्या राजूने बावडीतून पाणी काढले अन् सगळे फडक्यातून भाकरी काढून खायला बसलो. भोळ्या राजूने गुरांना वैरण दाखवली होती ती ही वैरण खात रवंथ करत बसली होती. गुरांच्या गळ्यातील लोखंडी, पितळी घंटीची किणकिण ऐकत आम्ही जेवण करत बसलो होतो. दुपारच्या सप्त्याला जायला जमलं अन् काल्याचे कीर्तन हाती लागले तर बरं होईल असं मायच्या अन् मामी त्यांच्या गप्पा चालू होत्या.

भाकरी खात असताना दुरूनच पाटलांच्या बुलेटचा आवाज आला, आमच्या गप्पा शांत झाल्या. पाटील आले अन् पाटलांनी झालेलं काम बघून खुश होऊन मला शाब्बासकी दिली,आमच्यात बसून ते ही भाकर खायला बसले. अन् काल रात्री झालेली भोळ्या राजूची अन् त्यांची फजिती सांगू लागले. गावातील सप्त्याचा विषय निघाला, लवकर काम आटोपले तर सप्ता हाती लागेल असं पाटील बोलून त्यांच्या कामाला निघून गेले अन् आम्हीही भाकरी खाऊन जराही वेळ विसावा न घेता कामाला लागलो.

भोळ्या राजू पुन्हा एकदा गुरांना चारापाणी दाखवून आमच्यासोबत कामाला लागला. तो आम्ही वाहून आणेलेल्या कांद्याला पोळीवर टाकून व्यवस्थित पोळी रचून घेत होता. आम्ही सगळे कांदे वाहून आणत होतो, तीन वाजले भोळ्या राजूने पाण्याची केळी भरून आणली. आम्ही पुन्हा पोटभर पाणी कामाला बिलगलो. एका तासात सगळे कांदे वाहून झाले होते.

पाटलांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही प्रत्येकी दहा-दहा किलो बारके, दुबळके कांदे खायला म्हणून घरी घेऊन जाणार होतो. मग माय, इस्माईलची माय अन् शांता मामी ही घरून आणलेल्या गोण्यात कांदे निवडायला लागली. आम्ही पावसाचा दिसत असलेला अंदाज पाहून भोळ्या राजूला मदत म्हणून कांद्याला पाथीने अन् ताडपत्रीने झाकू लागलो.

चारचा पार कलला अन् आम्ही निघायला म्हणून तयार झालो. भोळ्या राजूने सगळ्यांना दहा-दहा किलो मोजून कांदे दिले होते. मायना एका गोनीत आमचे वीस किलो कांदे भरले अन् ती गोनी घेऊन माय रस्त्यानं चालू लागली. पाटलांच्या वावरापासून ही गोणी आमच्या झोपडीपर्यंत घेऊन जाणं अवघड असं काम होतं. पण; पर्याय नव्हता,कांदे घेऊन जावे लागणार होते.
रस्त्यानं दोन ठिकाणी धावीन लागत होती तिच्यावर गोणी घेऊन चालण्यात फार त्रास होणार होता अन् एव्हढे ओझे घेऊन मायची मान पण अवघडून आली होती. तेच गणित इस्माईलच्या मायचे पण झाले होते पण पर्याय नव्हता पोटाला खायला कांदा पण लागणार होता.

खडका खुडकाच्या वाटा जवळ करत आम्ही कसेतरी कांदे घेऊन चालत होतो. अखेर धावन आली तिथं आम्ही एक शक्कल लढवली अन् डोक्यावर असलेल्या गोण्या घरंगळत तश्याच खाली सोडून दिल्या बऱ्याच दूर धावन संपेपर्यंत त्या तश्याच लुंडकत गेल्या. मग आम्ही हळूहळू खाली उतरलो नदीच्या अंगाला असलेलं पाणी पिऊन पुन्हा मायच्या डोक्यावर कांद्याची गोणी देऊन आम्ही चालू लागलो.

फुफाट्याच्या वाटा जवळ करत आम्ही गावाजवळ पोहचलो होतो, मात्र गावात सगळं आवरले असावं असे दिसून येत होतं. काल्याचे कीर्तन संपून सांजेला पंगती बसल्या होत्या. आईचा अन् मामींचा हे सगळं बघून हिरमोड झाला होता पण; कामामुळे आम्हाला पर्याय नव्हता. गावातली सगळी लोकं आमच्याकडे मूर्ख आहोत आम्ही अश्या भावनेनं बघत होते.  

झोपडी पहूर आलो अन् मायने डोक्यावर आणलेली कांद्याची गोणी अंगणात टाकली. मी कडीकोंडा खोलून मायला तांब्याभर पाणी आणून दिले, तिनं एका दमात ते पिऊन घेतलं. मी अंगणातील कांद्याची गोणी झोपडीत नेऊन ठेवली, मी ही हातपाय धुवून अस्ताला जाणाऱ्या सूर्याला मायच्या संगतीने बघत बसलो होतो. आजच्याने आमचे यंदाच्या सालाचे सुगीचे दिस संपले होते. 

समाप्त..!
भारत लक्ष्मण सोनवणे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...