मुख्य सामग्रीवर वगळा

सुगीचे दिस भाग -१

सुगीचे दिस भाग -१

सूर्य अस्ताला गेला तसे गाव, रानात दिवस मावळतीला आला. अंधार पडायच्या आत शेतातून घराकडे जायची ओढ लागली. ढोरांना हौदावर पाणी पाजून, वैरण टाकून, गोठ्यात बांधली. गायीचे दूध वासराला पाजून,काही सांच्या चहाला म्हणून केटलीत काढून घेतलं. हातपाय धुवून वावरातले कापडंबदलून तो विष्णू म्हातार बाबा घराच्या दिशेनं निघाला होता.
अंगात इरलेला सदरा, चार ठीकाणी ठीगळं दिलेल धोतर घालून तो उरे दिवस पुरे करत होता. वाहनाला चिंदकाने बांधुन एकएक दिवस काढत होता, त्याला नको होत सुटर अंगाला की नाही वाजली त्याला कधी थंडी. हा पण हल्ली दिसायला कमी झालं होतं विष्णू म्हातार बाबाला की काय म्हणुन लेकानं शहरातल्या सरकारी दावखण्यातून त्याला एक चष्मा आणला होता.
विष्णू म्हातार बाबा त्याला जीवापाड जपत होते, गळ्यात तुळशी माळ अन् आता उतारवयात त्या तुळशी माळेच्या सोबत ही या चष्म्याची सुतळी होती. विष्णू म्हातार बाबा त्याचा तो निघला होता सावकाश केटलीला हातात घेऊन, मी न्याहाळत राहिलो दूरपर्यंत जास्तोवर त्याला. मी पण निघणारच होतो आता इतक्यात पण; आता कुठं बोर पिकली होती, मग गेलो बोरं खायला. अजून म्हणा तशी बोरं पिकली नव्हती पण खालीच कच्ची पची, हातात बोरटीचा काटा घालून घेतला.
दिवस मावळतीला आल्यानं थंडी सुटली होती, दिवसभर मक्काची कंस भरून, वाहून माझेही पाय पार जड पडले होते, अंग दुखत होते. कसेतरी निघालो घरच्या वाटेला विष्णू म्हातारं चालत होत बिगीबीगी न्याहाळत वस्त्यावरील लोकांची ती बडबड, दुरूनच येणारा तो बोंबलाच्या खुडीचा वास. आम्ही दोघे चालत होतो एरवी मी घरी पोचलो, विष्णू म्हातारं बाबा वाटेनं घरला जाता जाताच रस्त्यावर चपला काढून देवळाची पाय पडून घराच्या रस्त्यान निघायचं.
मी घरला आलो अन् मायना चुलीवर पाणी तापून ठेवलच होत, ते घेऊन मी मोरीत गेलो हातपाय धुतले,तुटक्या आरश्यात बघत बघत वाढलेले केस फनीने मागे घेऊन विंचरले आणि मलाच हसू लागलो. मायन आवाज दिला, मी आलो चुलीजवळ बसलो चुलीचा लालभडक शख अंगाला लागत असल्यानं चेहरा प्रसन्न झाला होता.
मग मायने गिल्लासभर चहा दिला, माझ्यासाठी पिठाच्या डब्ब्यात लपऊन ठेवलेले बटर मला दिले. मी चहा बटर खाऊन घेतले. चिमणी पुढं बसून शिंगाडे मास्तराने दिलेला काहीतरी अभ्यास फाटलेल्या वहीत खरडत बसलो. ते झालं अन् काहीतरी पाठीवर, शिकत हुतो बाप गेला अन् शाळा नावलच राहिली. मला काम करायला लागलं पोटासाठी पोटाची भूक कुठ शाळा शिकू देतीया, पण; आता बसतो काहीवेळ पाटी घेऊन.
ढनाढना आग लागलेल्या चुल्हीवर माय थपथप भाकरी थापवत होती पहिली भाकर भाजायला म्हणून विस्तवाला लागली अन् दुसरी भाकर जेव्हा आई तव्यावर गिरवू लागली तेव्हा मायने मला शिक्यात असलेलं अन् नुकतेच गरम करून ठेवलेले दूध घेऊन भाकर खायला बोलावते, आवाज मारते. शिल्प्यातून साखरेचा डब्बा अन् दूध घेऊन मी चुल्हीसमोर बसतो अन् ताटात भाकर मोडून दूध घेऊन त्या साखर टाकून, कांद्याची पात घालून केलेलं बेसन तोंडी लावत पोटभर जेऊन घेतो.
सोबतीला मायही दोन भाकरी झाल्या की भाकर खायला बसते अन् मग आमच्या कामधंद्याच्या, उद्याच्याला कुठे कामाला जायचं या गप्पा सुरू होत्या. मायीच्या बोलण्यात कळलं की उद्या पहाटे शांता मामी, इस्माईलची माय अन् इस्माईल,मी अन् माय अशी सगळे शिवनामायच्या पल्ल्याड असलेल्या पाटलाच्या वावरात कांदे काढायला उकते ठरून घेतलं हाय.
अन् त्यात मायने माझा बी वाटा केला हाय म्हणून आता आठ दिस कामाची चिंता नव्हती दोन पैकं जास्तीचे हाताला लागणार होतेपण या आठ दिवसात जिवाचं रानही तितकं करायला लागणार होतं. वर भरीस भर की आठ दिसाची शाळा बुडणार होती पण सध्या पैका महत्त्वाचा होता म्हणून म्या माय संगतीने आठ दिस उक्त्यात जायचं ठरवलं अन् माझ्या न बोलण्यानं काही होणारही नव्हतं मायने माझा वाटा केला होता मग जाणं आलं होतच.
क्रमशः
भारत लक्ष्मण सोनवणे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...