मुख्य सामग्रीवर वगळा

सुगीचे दिस..! भाग - ६

सुगीचे दिस..! भाग - ६

झुळक्या बावडीपाशी बांधलेल्या ओट्यावर येऊन आम्ही भाकरी खाण्यासाठी येऊन बसलो. मायना केलेलं भरले वांगे अन् भाकर बघून मला कधी एकदा बासनात भाकर,कोड्यास घेतो अन् खाता होतो असं झालं होतं. भुकीने पोटात कावळे ओरडत होते, त्यात भोळ्या राजूने भाकरी संगतीने तोंडाला लावायला म्हणून काल गावच्या देवऋष्या धनगराच्या पोरीच्या लग्नाला गावभरच्या पंगतीसाठी देवऋष्या धनगराने केलेली बुंदी भोळ्या राजुने आजही आता भाकरीसोबत खाण्यासाठी आणलेली होती. त्यामुळे आज एकूणच भाकरी खायला मज्जा येणार होती.

इस्माईलच्या मायने बोंबलाची खुडी अन् बाजरीची भाकर अन् लोणच्याची चिरी छोट्या बाटलीत आणली होती. तर शांता मामीने तव्यावर केलेलं जाड पिठलं भाकरी फडक्यात बांधून आणली होती. इस्माईलने अन् मी डब्याच्या एका झाकनात भाजी अन् बोंबलाची खूडी घेऊन भाकरीला हातात घेऊन खायला सुरू केलं. माय शांता मामी अन् इस्माईलची माय तिघीसुद्धा भाकरी खायला बसल्या.

भोळ्या राजूने एका केळीत पाणी भरून घेतले अन् त्याची भाकर डांगराची भाजी घेऊन तो ही आमच्या वर्तुळात भाकर खायला येऊन बसला . घास-दोन घास खाल्ले की पाणी पीत मी अन् इस्माईलने पाणी पिऊनच पोट भरवून घेतले. मायचे अन् त्यांचे भाकर खायचे होईस्तोवर आम्ही थोडं भटकायला म्हणून पाटलाच्या वावरात भटकू लागलो. 

बांधाच्या एका अंगाला चालत असताना दांडात पडलेले पहाटेची बोरं आता गरम उन्हात गरम झाल्याने शेंबडाच्या लोळीसारखी झाली होती. दोन्ही पँटीच्या खिश्यात खिशे शिघोशिग भरून घेत आम्ही बोरं खात भटकत होतो. पाटलाच्या शेताला एका अंगाला असलेली शिवनामाय निवांत वाहत होती, यंदाच्या सालाला झालेला मोप पाऊस अन् मागच्या सालाला महादेवाच्या मंदिरालोक आलेलं पुराचे पाणी त्यामुळं गावाला पुढे दोन-चार वर्ष पाण्याचं टेन्शन नव्हतं.

गाव सुखी असणार होता, शेतकऱ्यांची पिके मोप पाण्याचा साठा असल्याने चांगली पिकणार होती. त्यामुळे आमच्या सारखं मजुरीने जाऊन पोट भरणाऱ्या गरीब लोकांचं आयुष्य पुढे दोन-चार वर्ष तरी निवांत कामात तरणार होतं, असं दिसून येत होतं.

मी अन् इस्माईल नदीच्या निवांत वाहणाऱ्या पाण्याला बघत निवांत बसून होतो. नदीच्या एका अंगाला असलेल्या थडीवर गावातल्या बायका धूने धुवत बसल्या होत्या, त्यांचा गलका आम्ही बसल्या जागेपर्यंत येत होता. महादेवाच्या मंदिरात सुरू असलेला नारळी सप्ताह अन् त्यात सुरू असलेलं कीर्तन बाराच्या ठोक्याला जे सुरू झालं होतं त्याचं उत्तरार्ध आमच्या कानी पडत होता.

सारं गाव आज सपत्यात उपस्थित होतं. धोंधलगावचे ह.भ.प साकेश्र्वर महाराज आज कीर्तनाला आले होते. मागच्या सालाला आमच्या गावात ते कीर्तनाला आले अन् कावीळ झालेला त्यांचा लेऊक वैकुंठाच्या प्रवासाला निघून गेला. त्याच्या अंतिम यात्रेला मग सर्व गाव उपस्थित होता. महाराज आज आले तेव्हा महाराजांना ही आठवण झाली अन् त्यांनी सत्करात दिलेलं शाल श्रीफळ न स्वीकारता कीर्तनाला म्हणून ते घोंगडीवर उभे राहिले होते.

अख्खं गाव आज त्यांच्या कीर्तनाला उपस्थित होते. शिवना मायचं निवांत वाहणे, तिच्या आत सुरू असलेला बगळ्यांचा खेळ, पान कोंबड्यांचा खेळ मी अन् ईस्माईल बघत बसलो होतो. तितक्यात मायना आवाज दिला, आमचं लक्ष विचलित झालं अन् भानावर येत मी इस्माईलला आवाज देत चालायचा इशारा केला.

दूरवरून पाटलांच्या राजदूत गाडीचा आवाज येत होता,कदाचित पाटील चक्कर टाकायला अन् कांदे काढायचं काम कसं चालू आहे हे बघायला येत असावा. मी अन् इस्माईल माय जवळ आलो दुपारची उन्हं उतरतीला होती इस्माईलच्या मायने उतरत्या उन्हाचा चटका बघून आम्हाला दोघांना मुंडासे बांधून कामाला लागायला सांगितलं. मी मायना आणलेल्या भाकरीचे धुडके डोक्याला गुंडाळून घेतले अन् केळीतून गिल्लासभर पाणी तोंडात ओतून कामाला लागलो.

माय अन् शांता मामी, इस्माईलची माय कांदे पातीतून वेगळी करायला लागले अन् आम्ही दोघे कांदे काढू लागलो. भोळ्या राजू त्याचे बासने घेऊन हौदावर गेला अन् त्याने त्याची बासने, त्याची धुण्यातील कपडे हौदावर धुतली. ढोरं पाणी दाखवायची म्हणून त्यांना सोडवून तो कुंडीवर घेऊन आला अन् काहीतरी गाणे गुणगुणत त्यांना पाणी पाजत होता. तितक्यात पाटलांची राजदूत आवाज करत झुळक्या बावडीपाशी बांधलेल्या ओट्या येऊन थांबली.

- भारत लक्ष्मण सोनवणे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...