मुख्य सामग्रीवर वगळा

सुगीचे दिस..! भाग - ६

सुगीचे दिस..! भाग - ६

झुळक्या बावडीपाशी बांधलेल्या ओट्यावर येऊन आम्ही भाकरी खाण्यासाठी येऊन बसलो. मायना केलेलं भरले वांगे अन् भाकर बघून मला कधी एकदा बासनात भाकर,कोड्यास घेतो अन् खाता होतो असं झालं होतं. भुकीने पोटात कावळे ओरडत होते, त्यात भोळ्या राजूने भाकरी संगतीने तोंडाला लावायला म्हणून काल गावच्या देवऋष्या धनगराच्या पोरीच्या लग्नाला गावभरच्या पंगतीसाठी देवऋष्या धनगराने केलेली बुंदी भोळ्या राजुने आजही आता भाकरीसोबत खाण्यासाठी आणलेली होती. त्यामुळे आज एकूणच भाकरी खायला मज्जा येणार होती.

इस्माईलच्या मायने बोंबलाची खुडी अन् बाजरीची भाकर अन् लोणच्याची चिरी छोट्या बाटलीत आणली होती. तर शांता मामीने तव्यावर केलेलं जाड पिठलं भाकरी फडक्यात बांधून आणली होती. इस्माईलने अन् मी डब्याच्या एका झाकनात भाजी अन् बोंबलाची खूडी घेऊन भाकरीला हातात घेऊन खायला सुरू केलं. माय शांता मामी अन् इस्माईलची माय तिघीसुद्धा भाकरी खायला बसल्या.

भोळ्या राजूने एका केळीत पाणी भरून घेतले अन् त्याची भाकर डांगराची भाजी घेऊन तो ही आमच्या वर्तुळात भाकर खायला येऊन बसला . घास-दोन घास खाल्ले की पाणी पीत मी अन् इस्माईलने पाणी पिऊनच पोट भरवून घेतले. मायचे अन् त्यांचे भाकर खायचे होईस्तोवर आम्ही थोडं भटकायला म्हणून पाटलाच्या वावरात भटकू लागलो. 

बांधाच्या एका अंगाला चालत असताना दांडात पडलेले पहाटेची बोरं आता गरम उन्हात गरम झाल्याने शेंबडाच्या लोळीसारखी झाली होती. दोन्ही पँटीच्या खिश्यात खिशे शिघोशिग भरून घेत आम्ही बोरं खात भटकत होतो. पाटलाच्या शेताला एका अंगाला असलेली शिवनामाय निवांत वाहत होती, यंदाच्या सालाला झालेला मोप पाऊस अन् मागच्या सालाला महादेवाच्या मंदिरालोक आलेलं पुराचे पाणी त्यामुळं गावाला पुढे दोन-चार वर्ष पाण्याचं टेन्शन नव्हतं.

गाव सुखी असणार होता, शेतकऱ्यांची पिके मोप पाण्याचा साठा असल्याने चांगली पिकणार होती. त्यामुळे आमच्या सारखं मजुरीने जाऊन पोट भरणाऱ्या गरीब लोकांचं आयुष्य पुढे दोन-चार वर्ष तरी निवांत कामात तरणार होतं, असं दिसून येत होतं.

मी अन् इस्माईल नदीच्या निवांत वाहणाऱ्या पाण्याला बघत निवांत बसून होतो. नदीच्या एका अंगाला असलेल्या थडीवर गावातल्या बायका धूने धुवत बसल्या होत्या, त्यांचा गलका आम्ही बसल्या जागेपर्यंत येत होता. महादेवाच्या मंदिरात सुरू असलेला नारळी सप्ताह अन् त्यात सुरू असलेलं कीर्तन बाराच्या ठोक्याला जे सुरू झालं होतं त्याचं उत्तरार्ध आमच्या कानी पडत होता.

सारं गाव आज सपत्यात उपस्थित होतं. धोंधलगावचे ह.भ.प साकेश्र्वर महाराज आज कीर्तनाला आले होते. मागच्या सालाला आमच्या गावात ते कीर्तनाला आले अन् कावीळ झालेला त्यांचा लेऊक वैकुंठाच्या प्रवासाला निघून गेला. त्याच्या अंतिम यात्रेला मग सर्व गाव उपस्थित होता. महाराज आज आले तेव्हा महाराजांना ही आठवण झाली अन् त्यांनी सत्करात दिलेलं शाल श्रीफळ न स्वीकारता कीर्तनाला म्हणून ते घोंगडीवर उभे राहिले होते.

अख्खं गाव आज त्यांच्या कीर्तनाला उपस्थित होते. शिवना मायचं निवांत वाहणे, तिच्या आत सुरू असलेला बगळ्यांचा खेळ, पान कोंबड्यांचा खेळ मी अन् ईस्माईल बघत बसलो होतो. तितक्यात मायना आवाज दिला, आमचं लक्ष विचलित झालं अन् भानावर येत मी इस्माईलला आवाज देत चालायचा इशारा केला.

दूरवरून पाटलांच्या राजदूत गाडीचा आवाज येत होता,कदाचित पाटील चक्कर टाकायला अन् कांदे काढायचं काम कसं चालू आहे हे बघायला येत असावा. मी अन् इस्माईल माय जवळ आलो दुपारची उन्हं उतरतीला होती इस्माईलच्या मायने उतरत्या उन्हाचा चटका बघून आम्हाला दोघांना मुंडासे बांधून कामाला लागायला सांगितलं. मी मायना आणलेल्या भाकरीचे धुडके डोक्याला गुंडाळून घेतले अन् केळीतून गिल्लासभर पाणी तोंडात ओतून कामाला लागलो.

माय अन् शांता मामी, इस्माईलची माय कांदे पातीतून वेगळी करायला लागले अन् आम्ही दोघे कांदे काढू लागलो. भोळ्या राजू त्याचे बासने घेऊन हौदावर गेला अन् त्याने त्याची बासने, त्याची धुण्यातील कपडे हौदावर धुतली. ढोरं पाणी दाखवायची म्हणून त्यांना सोडवून तो कुंडीवर घेऊन आला अन् काहीतरी गाणे गुणगुणत त्यांना पाणी पाजत होता. तितक्यात पाटलांची राजदूत आवाज करत झुळक्या बावडीपाशी बांधलेल्या ओट्या येऊन थांबली.

- भारत लक्ष्मण सोनवणे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड