मुख्य सामग्रीवर वगळा

सुगीचे दिस..! भाग - ४

सुगीचे दिस..! भाग - ४

शांता मामी, इस्माईलची माय अन् माझी माय फार पुढं गेली की आम्ही ती बुडूखं खांद्यावर घ्यायचो अन् पळत सुटायचो. पाटलांचे वावर मोघम दूर असल्यानं लच्ची आईच्या वावराजवळ आम्ही आलो की, तिच्या केळीत तिनं भरून ठेवलेलं पाणी आम्ही पोटभर पिऊन घ्यायचो.

पुन्हा पाटलाच्या वावराच्या वाटा जवळ करायचो. इतक्या लवकर पाटील कसला येतोय शेतात म्हणून माय लच्ची आईच्या केळीतून शिशी भर पाणी भरून घ्यायची. कारण इस्माईल अन् मला का तरळ भरली तर आम्ही काम न करता जीवावर येतं म्हणून भटकत बसायचो. हे शांता मामी, इस्माईलची माय अन् माझी माय जाणून असल्यानं ती असं उक्त्याच्या कामाला आम्ही सोबत येणार असलो की शीशी भरून घ्यायची.

मजल दर मजल करत रानाच्या रानवाटा भटकत, अख्ख्या पायवाटेच्या धुळीशी खेळून झालं की आम्ही एकदाचं पाटलाच्या वावरात पोहचायचो. वावरात गेलं दहा - पाच मिनिटं आम्ही पाटलाच्या वावरात असलेल्या भल्या मोठ्या चिंचेच्या झाडाच्या पडसावलीत बसून आराम करायचो. मग पाटलाच्या तिथं सालाने असलेला भोळ्या राजू आम्हाला चरवीत पाणी आणायचा अन् मग पाणी पिऊन आम्ही कामाला लागायचो.

मग कांदे काढायला म्हणून आम्ही सऱ्या वाटून घ्यायचो. मी मायच्याजवळ सरी घ्यायचो अन् इस्माईल त्याच्या मायच्या जवळची सरी घ्यायचा शांता अक्का आमच्या दोघांच्या मधात असायची म्हणजे आम्ही एकमेकांशी भांडणार नाही दंगामस्ती करणार नाही. कांदे काढायला मला चांगले जमायचं मग या कामात मायला माझी चांगली मदत व्हायची.

मी पटापट कांदे काढून माय मागे राहिली की, तिची सरी घ्यायचो अन् पटपट दोघांच्या सऱ्या लाऊन आराम करत बसायचो. मग एकदाच सगळ्यांच्या सऱ्या लागल्या की बांधाच्या अंगाला असलेल्या झाडांच्या सावलीत आम्ही बसून रहायचो अन् मग सालाने असलेला भोळ्या राजू चरवी भरून डोक्यावर घेऊन यायचा.

भोळ्या राजूची एक आगळीवेगळी कथा होती. ती कधीतरी नंतर सांगेन पण थोडक्यात सांगायचं तर तो अगदी पाच - सहा वर्षांचा असेल तेव्हा पाटलांनी त्याला किसनवाडीच्या बसस्टँडवरून आणला होता.

तो तिथं हरवून गेला होता, दोन दिवस वडापाव खाऊन जगत होता. पाटलांनी हे त्याचं एकटं असणं हेरले अन् मग त्याला त्यांच्या घरी घेऊन आले, त्याला शाळेत टाकलं पण भोळ्या राजू शाळेत न बसता दुपारच्या सुट्टीत मंगळी आईच्या डोहाला असलेल्या लिंभाऱ्याला आपली दप्तर वजा पिशवी टांगून द्यायचा अन् तिथेच मंगळी आईच्या डोहाला असलेल्या पाण्यात पोहत बसायचा.

तासंतास पोहत बसायचा, पाण्यात समाधी लाऊन कुणी पाण्यात बुडून मेल्यावर जसं पाण्यात तरंगत असते तसं निवांत पाण्यात पडून राहायचा. भोळ्या राजू राजू दिसायला भोळसट होता. डांगरासारखा ढोला अन् उंचीने ठेंगणा. बोटके नाक अन् त्याचा त्या फुगलेल्या गालात हरवलेला नाकाचा शेंडा. टपोरे ओठ अन् त्यात पुढे आलेले दात त्याचं हे रूप त्याला इतरांपेक्षा वेगळं ठरवायचं.

पुढे भोळ्या राजूची शाळा सुटली अन् पाटलाच्या इथेच तो रोजीरोटी मिळवण्यासाठी सालाने राहिला. अन् मग सालाने म्हंटले की शेतीत हाताला येईल ती कामे तो करू लागला. पाटील त्याला सकाळपासून कामाला जुंपीत दिवसभर काबाडकष्ट केले की, त्याला सकाळी रात्रीच्या भाकरीचा भुगा अन् गिल्लास भर दूध द्यायचे. दुपारच्याला कळण्याची भाकरी अन् जे असेल ते कोड्यास, सांजेलाही दूध काढून जातांना पाटील बाई जो स्वयंपाक केला असेल त्यातून त्याला एका उपरण्यात भाकर बांधून द्यायची.

मग तो ती भाकर घेऊन गावाच्या जवळ असलेल्या राणी आईच्या वावराजवळ पाटलांच्या वावरात पाटलांनी त्याला बांधून दिलेल्या दगडाच्या घरात रहायचा. पाटलाच्या शेतात वीज आली होती पण अजून भोळ्या राजूच्या दगडाच्या घरात काही वीज आली नव्हती. मग तो एका शिशीत केलेल्या चिमनीच्या उजेडात भाकर गिळून घ्यायचा अन् खाटेवर पडून राहायचा. डोळे लागत नाही तोवर उद्याच्या त्याच्या भविष्याबद्दल विचार करत रहायचा.
दिवसभर काम करून आंबून गेल्याने मग त्याचे डोळे लागायचे अन् तो झोपी जायचा.

पुन्हा सकाळी चारला उठलं की आक्खर झाडझुड करून पंधरा म्हशींचे दूध काढून, त्यांना चारापाणी करून तो दूध डेअरीला घालायला घेऊन यायचा. दोन्ही हातात दुधाच्या दोन कॅना पाहून लोकं त्याला हसायचे अन् म्हणायचे पाटलाचे जावई आले बाबा एकदा त्यांचं दूध मापून घ्या अन् पाटलांना आयते पैसे पाठवून द्या. पाटलाचे जावई आहे दूध घालायला डेअरीला असं म्हणत मोठ्यानं हसायचे.

क्रमशः 

- भारत लक्ष्मण सोनवणे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...