मुख्य सामग्रीवर वगळा

सुगीचे दिस..! भाग - ४

सुगीचे दिस..! भाग - ४

शांता मामी, इस्माईलची माय अन् माझी माय फार पुढं गेली की आम्ही ती बुडूखं खांद्यावर घ्यायचो अन् पळत सुटायचो. पाटलांचे वावर मोघम दूर असल्यानं लच्ची आईच्या वावराजवळ आम्ही आलो की, तिच्या केळीत तिनं भरून ठेवलेलं पाणी आम्ही पोटभर पिऊन घ्यायचो.

पुन्हा पाटलाच्या वावराच्या वाटा जवळ करायचो. इतक्या लवकर पाटील कसला येतोय शेतात म्हणून माय लच्ची आईच्या केळीतून शिशी भर पाणी भरून घ्यायची. कारण इस्माईल अन् मला का तरळ भरली तर आम्ही काम न करता जीवावर येतं म्हणून भटकत बसायचो. हे शांता मामी, इस्माईलची माय अन् माझी माय जाणून असल्यानं ती असं उक्त्याच्या कामाला आम्ही सोबत येणार असलो की शीशी भरून घ्यायची.

मजल दर मजल करत रानाच्या रानवाटा भटकत, अख्ख्या पायवाटेच्या धुळीशी खेळून झालं की आम्ही एकदाचं पाटलाच्या वावरात पोहचायचो. वावरात गेलं दहा - पाच मिनिटं आम्ही पाटलाच्या वावरात असलेल्या भल्या मोठ्या चिंचेच्या झाडाच्या पडसावलीत बसून आराम करायचो. मग पाटलाच्या तिथं सालाने असलेला भोळ्या राजू आम्हाला चरवीत पाणी आणायचा अन् मग पाणी पिऊन आम्ही कामाला लागायचो.

मग कांदे काढायला म्हणून आम्ही सऱ्या वाटून घ्यायचो. मी मायच्याजवळ सरी घ्यायचो अन् इस्माईल त्याच्या मायच्या जवळची सरी घ्यायचा शांता अक्का आमच्या दोघांच्या मधात असायची म्हणजे आम्ही एकमेकांशी भांडणार नाही दंगामस्ती करणार नाही. कांदे काढायला मला चांगले जमायचं मग या कामात मायला माझी चांगली मदत व्हायची.

मी पटापट कांदे काढून माय मागे राहिली की, तिची सरी घ्यायचो अन् पटपट दोघांच्या सऱ्या लाऊन आराम करत बसायचो. मग एकदाच सगळ्यांच्या सऱ्या लागल्या की बांधाच्या अंगाला असलेल्या झाडांच्या सावलीत आम्ही बसून रहायचो अन् मग सालाने असलेला भोळ्या राजू चरवी भरून डोक्यावर घेऊन यायचा.

भोळ्या राजूची एक आगळीवेगळी कथा होती. ती कधीतरी नंतर सांगेन पण थोडक्यात सांगायचं तर तो अगदी पाच - सहा वर्षांचा असेल तेव्हा पाटलांनी त्याला किसनवाडीच्या बसस्टँडवरून आणला होता.

तो तिथं हरवून गेला होता, दोन दिवस वडापाव खाऊन जगत होता. पाटलांनी हे त्याचं एकटं असणं हेरले अन् मग त्याला त्यांच्या घरी घेऊन आले, त्याला शाळेत टाकलं पण भोळ्या राजू शाळेत न बसता दुपारच्या सुट्टीत मंगळी आईच्या डोहाला असलेल्या लिंभाऱ्याला आपली दप्तर वजा पिशवी टांगून द्यायचा अन् तिथेच मंगळी आईच्या डोहाला असलेल्या पाण्यात पोहत बसायचा.

तासंतास पोहत बसायचा, पाण्यात समाधी लाऊन कुणी पाण्यात बुडून मेल्यावर जसं पाण्यात तरंगत असते तसं निवांत पाण्यात पडून राहायचा. भोळ्या राजू राजू दिसायला भोळसट होता. डांगरासारखा ढोला अन् उंचीने ठेंगणा. बोटके नाक अन् त्याचा त्या फुगलेल्या गालात हरवलेला नाकाचा शेंडा. टपोरे ओठ अन् त्यात पुढे आलेले दात त्याचं हे रूप त्याला इतरांपेक्षा वेगळं ठरवायचं.

पुढे भोळ्या राजूची शाळा सुटली अन् पाटलाच्या इथेच तो रोजीरोटी मिळवण्यासाठी सालाने राहिला. अन् मग सालाने म्हंटले की शेतीत हाताला येईल ती कामे तो करू लागला. पाटील त्याला सकाळपासून कामाला जुंपीत दिवसभर काबाडकष्ट केले की, त्याला सकाळी रात्रीच्या भाकरीचा भुगा अन् गिल्लास भर दूध द्यायचे. दुपारच्याला कळण्याची भाकरी अन् जे असेल ते कोड्यास, सांजेलाही दूध काढून जातांना पाटील बाई जो स्वयंपाक केला असेल त्यातून त्याला एका उपरण्यात भाकर बांधून द्यायची.

मग तो ती भाकर घेऊन गावाच्या जवळ असलेल्या राणी आईच्या वावराजवळ पाटलांच्या वावरात पाटलांनी त्याला बांधून दिलेल्या दगडाच्या घरात रहायचा. पाटलाच्या शेतात वीज आली होती पण अजून भोळ्या राजूच्या दगडाच्या घरात काही वीज आली नव्हती. मग तो एका शिशीत केलेल्या चिमनीच्या उजेडात भाकर गिळून घ्यायचा अन् खाटेवर पडून राहायचा. डोळे लागत नाही तोवर उद्याच्या त्याच्या भविष्याबद्दल विचार करत रहायचा.
दिवसभर काम करून आंबून गेल्याने मग त्याचे डोळे लागायचे अन् तो झोपी जायचा.

पुन्हा सकाळी चारला उठलं की आक्खर झाडझुड करून पंधरा म्हशींचे दूध काढून, त्यांना चारापाणी करून तो दूध डेअरीला घालायला घेऊन यायचा. दोन्ही हातात दुधाच्या दोन कॅना पाहून लोकं त्याला हसायचे अन् म्हणायचे पाटलाचे जावई आले बाबा एकदा त्यांचं दूध मापून घ्या अन् पाटलांना आयते पैसे पाठवून द्या. पाटलाचे जावई आहे दूध घालायला डेअरीला असं म्हणत मोठ्यानं हसायचे.

क्रमशः 

- भारत लक्ष्मण सोनवणे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड