मुख्य सामग्रीवर वगळा

सिमांतनी भाग ५

सिमांतनी-भाग - ५


सिमांतनी- भाग ५.

कोजागिरी होवुन आठ दिवस सरले होते,अश्याच एका अंधाऱ्या रात्री सिमांतनीच्या पोटात एकाकी कळा येऊ लागल्या सिमांतनी अंथरुणाला रेटा देत त्या कळा सहू लागली होती...

अंधारी रात्र अन् गोठवलेली थंडी यामुळे तिची अजूनच जास्तीची अबळ होत होती,इतक्या सर्व थंडीतही तिला धरधरुन घाम फुटला होता,सर्व अंग घामाने घामेजलेलं झालं होतं.तिची ही अवस्था बघून तिच्या पायथ्याशी झोपलेली तिची सासुबाई जागी झाली अन् तिच्या बाळंतपणाचे शेवटचे दिवस तिच्या नजरेसमोरून तरळुन गेले...

तिला हे कळुन चुकले होते की होणारा त्रास हा तिचा अन् बाळाच्या जीवाशी खेळणारा ठरु शकेल,म्हणुन तिला ज्या काही उपाययोजना करता येईल त्या तिनं केल्या.या उडालेल्या धांदलीत सिमांतनीचा दादला उठला त्याला हे सर्व नवं असल्यानं सिमांतनीकडे पाहून त्याला अपराधी वाटु लागलं,तो स्वत:ला कोसत होता,जीवाचा त्रागा करत होता काळोखाची असलेली मध्यरात्र सरता सरेनाशी झाली होती,होणाऱ्या प्रसववेदना मिनिटागणिक वाढु लागल्या होत्या...

ही सर्व धांदल ऐकून ओसरीत झोपलेला सिमांतनीचा सासरा कचाकच शिव्या देत मधल्या घरात आला अन् डोळ्यासमोर असलेली अवस्था बघून खोकलतच त्यांच्या बायकोला शिव्या देत,लेकाला म्हणू लागला मर्दा जा लवकर मांगवाड्यातून सुईनीला घेऊन ये..!

काळ जवळ आला हाय,एकतर तू बाप होणार नायतर अवघड होणार तुझी कसोटी हायसा जा..!

सिमांतनीचा दादला हे ऐकताच घराच्या बाहेर पडला एकीकडे,सिमांतनीचा एक जीव येत होता एक जात होता,तिच्या दादल्याला मात्र काय करावं सूचना झालं होतं.अनवाणी पायांनी तो मांगवाड्याच्या वाटेना मांगवाडा घाठण्याचा प्रयत्न करत होता,अंधारी रात्र असल्याने काळोखात समोर काहीही दिसेना झालं होतं…

वाटेतून अंदाज काढीत तो धावत होता,प्रत्येक पावलागणिक त्याला सुईनीचं घर दूर भासत होतं अन् यात घात झाला एका धोंड्याला त्याचा पाय धडकला,ठोकर बसली अन् डोक्यात पार आत पर्यंत ती कळ त्याला झोंबली,नखाचे टकुर निघून बाजूला झालं होतं पण आता आपलं दुखणं बघणं त्याला योग्य वाटत नव्हतं कसाबसा लगडत धावत तो मांगवाड्यात सुईनीच्या घराला पोहचला.कावडावर हातानं ठोकत त्यानं सुईनीला आवाज दिला कावड उघडलं तसं सुईनीनं त्याचा चेहरा बघून अवस्था ओळखली अन् ती तिचं गाठुड घेऊन त्याच्या संगत सैरावैरा पळू लागली...

अखेरला दोघेही घरला पोहचले,सुईनीनं सिमांतनीच्या दादल्याला अन् त्याच्या म्हाताऱ्याला परसदारच्या खोलीत थांबायला लावलं अन् कावड लावून घेतलं आत सिमांतनीच्या वाढणाऱ्या प्रसववेदना,वाढणाऱ्या कळा अन् तिला होणार त्रास बघून तिच्या सासुबाईचं अर्ध आवसांन गळून पडलं होतं पण तिला धीर द्यायला म्हणून ते हे सर्व रेटत तिला धीर देत होती,सुईन तीच्या योग्यतेप्रमाणे प्रयत्न करत होती...

बाहेर सिमांतनीच्या दादल्याला एक-एक क्षण एक-एक काळासारखा झाला होता,तो गुडघ्यात मान घालून आपली आसवे ढाळत बसला होता.सिमांतनीचा सासरा बिड्या फुकित काळजीनं परसदारच्या खोली महोरल्या अंगणात येरझऱ्या घालत होता...

या सर्व दांगुड्यात गल्लीतले सारे लोकं जागी झाली अन् सिमांतनीच्या कुडाच्या घरासमोर तिची या त्रासातून सुटका होण्याची वाट बघू लागली होती,अंगणात शेकोटी पेटली होती,थंडी मी म्हणत होती.गल्लीतल्या बायका आप-आपले बाळंतपणाचे दिवस आठवून एकमेकांना सांगत होत्या...

काही तासभराने बाळाचा रडण्याचा आवाज बाहेर आला अन् सिमांतनीच्या दादल्याच्या डोळ्यातील धारा खंडल्या.तो वर मान काढून कावरी-बावरी नजर करत इकडं तिकडं बघू लागला.सिमांतनीची यातून सुटका झाली हा विचार करून अंगणात जमलेल्या बायका सुखावल्या,अंगणातील माणसं सिमांतनीच्या दादल्याच्या गळ्यात पडू लागली अन म्हणून लागली 
लका आम्हाला नातू झालासा तू बाप झाला हायसा..!

पण या आनंदामागे बाळाच्या ओरडण्यामागे सिमांतनीचा आवाज मात्र तिच्या दादल्याच्या कानावर पडेना झाला होता.अंगण पुन्हा एकदा शांत झालं,इतकं शांत की गावात घोंघावणारा वारा आता स्पष्ट ऐकायला येऊ लागला होता,बाळ जन्माला आलं पण बाळंतणीचं काय झालं ती बेसुध हाय का..?
हे मात्र कळंना झालं होतं...

दहा-पाच मिनिटानं कावड उघडलं,सुईनबाई अन् सिमांतनीची सासुबाई हातात बाळ घेऊन बाहेर आली,सुईनीनं लुगड्याच्या पधरानं आपलं रडु लपवत तिथुन काढता पाय घेतला अन् काही विपरीत घडल्याचं गल्लीतल्या लोकांना कळुन चुकलं...

सीमांतनीचा दादला त्याच्या आईजवळ जावून लेकाला बघत बोलला..!
मायव सीमांतनीचा आवाज का येईना झालं हायसा,ती झोपली हायका..? अन् तू थंडी वाऱ्याच तुझ्या नातवाला घेऊन का बाहेर आली हायसा..?
सीमांतनीच्या सासूबाईंन तिच्या नातवाला तिच्या नवर्याकडे दिलं,सीमांतनीचा सासरा त्याच्या नातवाला बघून बोळक्या झालेल्या गालातुन गालातल्या गालात हसून त्याच्याकडे बघू लागला.

अन् इतक्यात होत्याचं नव्हतं झालं,सीमांतनीच्या सासूबाईनं मोठ्यानं तोंड झोडत स्वतःला शिव्या द्यायला सुरुवात केली..!
म्या कैदाशिनीनं माझ्या लेकाच्या संसाराचं वाटुळं केलं,माझ्या सुनबाईला म्हसणात नेऊन घातलं...!

हे ऐकून सिमांतनीचा नवरा रडतच कावड उघडुन आतल्या खोलीत गेला,सिमांतनी बाजीवर निपचित पडून होती.ती तिच्या लेकाला अन् तिच्या दादल्याला सोडून कायमची निघुन गेली होती..!
सिमांतनीचा दादला तिच्या गळ्यात पडुन मोठ्यानं हमसुन हमसुन रडत होता,त्याला हळदीत नटलेल्या सिमांतनीपासुन मरणासन्न अवस्थेत पडलेली सिमांतनी डोळ्यांना दिसत होती.

सिमांतनीचा सासरा डोळ्याला पाणी येत नसतांनाही सुनेच्या जाण्याच्या दुःखात नातवाला सांभाळत रडु लागला होता,गल्लीतल्या साऱ्या बायकांच्या डोळ्यातून आसवांच्या धारा वाहू लागल्या होत्या गावावर शोककळा पसरली होती,गावची सून गावानं गमावली होती हे खूप दुःखद होतं..!

अंधारी रात्र सरून पहाटेचं तांबडं फुटलं,सूर्योदय झाला.सिमांतनीच्या माहेराला खबरबात गेली,तेही आले अन् सिमांतनीला अखेरचा निरोप देण्यात आला..!

दुःखाचं मूळ सिमांतनीच्या सासू सासर्याला कळून चुकलं होतं.आपल्या लेकाचं कमी वयात केलेलं लग्न अन् सूनेला न झेपणाऱ्या वयात आलेलं बाळंतपण तिला नाही झेपलं अन् सिमांतनीनं आपल्याला पिढीचा वारस,वंशाला दिवा देऊन आपला प्राण त्यागला.

पुढे सिमांतनीचा दादला विदुर म्हणून गावाभर भटकत राहिला अन्  मायविना पोरकं झालेलं पोर माय शिवाय,मायच्या प्रेमाशिवाय आपलं जीवन जगत राहिलं..!

(लेखन,कथा भारत सोनवणे नावाने कॉपी राईट ©® असल्या कारणाने नावासहित शेअर करा..!)

समाप्त..!

Written by,
Bharat Sonwane .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड