मुख्य सामग्रीवर वगळा

गाव पोरका झाला..!

गाव पोरका झाला..!

पितृपक्ष संपला पण पितृपक्षातील उन्हं अजूनही पहाटेच्या पहारे शरिराची काहीली काहीली करून जात आहे.अश्या या भरउन्हात पहाटे दहाच्या सुमाराला गावच्या जुन्या येशीतुज जाणं होतं,येशीत मधोमध असलेल्या मुंज्याला शिवनामायचे पाणी तांब्यात आणून त्याला न्हांनुंन घेतलं,कपूरची एक वडी तिथं जाळली की त्याचा येणारा सुगंध अनुभवत,यशीत डोकं टेकवून उतरतीच्या दिशेनं पावलं चालू लागली..!

गावातले गुरखे रानाला,डोंगराला,धरण पाळेला असलेल्या हिरव्या कुरणाच्या रानात गाय,म्हशी,बकऱ्या चरायला घेऊन निघाले.डोईवर बांधलेलं उपरणे,कंबराला बांधलेली छोटी कुऱ्हाड,तारेच्या पिशीत भाकरीचं पेंडकं अन खांद्यात अडकवलेला रेडू घेऊन येशीतून रांनच्या वाटेला लागलं की त्यांना न्याहाळणं होतं,दूरवर त्यांच्या पावलांनी उधळलेली धुळ आसमंतात त्यांचं सकाळच्या प्रहरी अस्तित्व निर्माण करते...

गावच्या नव्या तरण्या सुना हौसे खातर नदीच्या तीरावर धुने धुवायला म्हणून निघायच्या,येशीतून दहाच्या सुमाराला यांचा ऐकू येणारा गलका.नदीच्या तीरावर गुळगुळीत झालेल्या दगडांवर धुणे धुण्याचा येणारा आवाज अन् ऐकायला हव्या अश्या त्यांच्या गप्पा,माहेरच्या आठवणी,शाळेच्या,मैत्रिणींच्या आठवणी,माहेराला धुने धुवायला म्हणून नदी तीरावर जायला लागते म्हणून तिथल्या वेगळ्या आठवणी,सासू सासर्यांचे कौतुक,चकाट्या अन या सर्वात अधून मधून येणारा महादेवाच्या मंदिरातील घंटेचा नाद अन् मग तिकडं आपोआपच वळणारी पावलं...

नदीच्या तीराने पांदीच्या रस्त्यानं अनवाणी पायांनी चालणं काही वेगळंच सुख देतं,पांदीच्या दोन्ही बाजूंनी असणारी घाणेरीची फुलझाडे,नदीच्या कडेला असलेली बेसरमाची वाढलेली झाडे अन् डोक्यावर असलेला गुलमोहरांच्या झाडांचा मंडप,हातात अगरबत्ती,तेलाची कुप्पी घेऊन निघालं दहा पंधरा मिनिटांत नदीची खळखळ ऐकत महादेवाच्या मंदिरात जाणं होतं.
उंच उंच वडाची झाडं,पिंपळाची झाडं,बेलाची झाडं,कौटाची झाडं पुरातन काळातील मंदिर असल्यानं उंच असलेली दगडी कमान,कमानीला दोन्ही बाजूंनी दिवा ठेवायला असलेली दिव्यांची रास,एकांगाला दीपमाळ...

मंदिराच्या गाभाऱ्यात असलेली अतिप्राचीन पिंड,तांब्याचा नागफना,पिंडीच्या लिंगावर मधोमध पडणारी पितळी घागरीतील शिवनामायच्या पाण्याची धार अन रातराणीच्या फुलांचा येणारा सुगंध,पिंडीवर वाहीलेली बेल पत्र,जास्वंदीची वाहिलेली पाने,फुले अन् या सर्व वातावरणात मनोभावे प्रार्थना करून आपलं पूजाआर्चा करणं.
पुढे शनिदेवाच्या मंदिरात शनी देवाला कुप्पीत आणलेलं तेल वाहून मनोभावे पाय पडून घंटीचा नाद ऐकत कितीवेळ मंदिराच्या प्रांगणात आपली समाधी लावून बसून राहणं...

पक्षांच्या चिवचिव करण्याचा ऐकू येणारा नाद,घंटीचा नाद,टाळ्यांचा नाद,भजनाचा आवाज,अन् हे सर्व ऐकू येत असतानासुध्दा आपलं मन एकाग्र चित्ताने देवाचे नामस्मरण करत राहणं,या नामस्मरणात आपली समाधी लागणं हेच सुख असावं कदाचित जीवनात.

अन् मग एका त्या अभंगाचा प्रत्यय येणं होतं...

समाधि श्रवण करिती निशिदिनीं । त्यांसि चक्रपाणि देईल भेटी !!१!!
समाधि श्रवणाचा धरील जो विश्वास । नाहीं नाहीं दोष पातकांचा !!२!!
समाधि विरक्ताची पतिता वाराणसी । कोटि कुळें त्याची उद्धरील !!३!!
जो कोणी बैसेल समाधिश्रवणा । तया प्रदक्षिणा पृथ्वीची हे !!४!!
स्वहित साधन सांगितलें येथें । परिसा भागवत लेखकु जाला !!५!!
नामा म्हणे हरि बोलिलों तुझिया बळें।वाहिलीं तुळसीदळें स्वामीलागीं!!६!!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...