मुख्य सामग्रीवर वगळा

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..!



आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या.

गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती.

त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळेतील चार पाच पोरं अन् फोटोतील ही दोघं मित्र मला बघत होती.

बराचवेळ नदीच्या थडीला एखादा भंगार, बाटल्या गोळा करणारा फिरावा तसं मी भटकत बसलो होतो. बराचवेळ भटकून स्मशानाच्या ओट्यावर येऊन बसलो. बारा वर्षापूर्वी बाप सोडून गेला तेव्हा जितकं निवांत या स्मशानभूमीमध्ये बसलो होतो तितकावेळ बसून राहिलो.

तरळ भरली तसं पुन्हा तिथून निघालो महादेवाच्या देवळात येऊन बसून राहिलो पिंडीच्या वर पिंडीवर पाण्याचा अभिषेक व्हावा म्हणून बांधलेल्या माठातून एका कपात पाणी काढून पोटभर पिऊन घेतलं अन् निवांत अर्धा तास बसून राहिलो. मंदिराचा जूना भाग पाडून टाकला नव्याने काम करायचं असेल म्हणून टाकला पाडून. देवाच्या मुर्त्या भर उन्हात तळत होत्या. त्यांना सावलीला आणून ठेवावं वाटलं पण मोठ्या मुर्त्या असल्यानं अन् मी आता गावचा असूनही अनोळखी असल्यानं त्या नादाला गेलो नाही.

थोड्यावेळाने या मासे धरणाऱ्या मित्रांकडे आलो, त्यांनी मला ओळखणे अन् मी त्यांना ओळखणे शक्य नव्हते. मग ओळख काढून झाली आमच्या वडिलोपार्जित शेती असलेल्या रानाच्या जवळ असलेल्या खटकळीच्या वस्तीवरील भिलहाटीतील ती मित्र होती. माझा चुलत भाऊ त्यांच्यासोबत लोकांच्या रानात कामाला जात असल्यानं त्याची ओळख सांगितली अन् त्यांना माझी ओळख पोहचली. तोवर मी त्यांच्यापाशी एका खडकावर उन्हातच बसून होतो. 

त्यांची पाण्याची बाटली बघितली, पाणी घेऊ का विचारलं. त्यांनी पाण्यात जाळे टाकत असताना मान हलवली अन् ते भिल्ल बोली भाषेत त्यांचं बोलत काम करत राहिले. पूर्वी बरच त्यांच्या सहवासात राहिलो असल्यानं मलाही भिल्ल बोली कळते अन् बोलायलाही जमते. मग मी पाणी पिऊन घेतलं अन् अधूनमधून त्यांच्याशी बोलत होतो.

भरदुपारच्या रणरणत्या उन्हात ते दोघं मित्र सुखुन गेलेल्या अन् कोरड्याठाक पडलेल्या शिवनामायच्या डोहात मासे, खेकडे पकडत बसली होती. त्यांचाशी बोलण्यातून कळलं की आज रोजंदारीवर काही काम नव्हते. मग घरी बसण्यापेक्षा रात्रीच्या भाजीसाठी मासे, खेकडे यांचं कालवण करणासाठी घेऊन जाऊ म्हणून ते आले होते.

बऱ्याच गप्पा झाल्या मी शहरातला म्हणून त्यांच्या बोलण्यात एक अवघडलेपण होतं. पण; मी जास्तीत जास्त त्यांचा होऊन बोलत बसलो होतो. माझ्यासमोर टाकलेल्या जाळ्यात एकही मासा आला नव्हता, मग त्यांनी जाळे बाजूला फेकून दिले. मग पाण्यातील दगडांच्या कपारीत बोटं घालून ती दोघं अंदाजाने मासे पकडू लागले.

त्यांचा या कामातील अनुभव इथे कामी येत होता,इतक्या वेळात त्यांना सात-आठ मांगुर मासे अन् पाच-सहा मासोळ्या हाती लागल्या होत्या. अख्ख्या डबक्यातील दगडे त्यांनी हाताने उचकुन पहिली होती अन् त्यांच्या हातातील त्या पिशवीत रात्री कालवण होईल इतके मासेही आता जमा झाले होती. तरीपण ते ओल्या जागी असलेल्या बिळात हात घालून चिखलातून खेकडे काढून त्यांची नांगी तोडून त्यांना पिशवीत टाकीत होती.

इतक्यात दोन आज्या या रणरणत्या उन्हात त्यांच्या सोळा बकऱ्या घेऊन आल्या. डोहात असलेलं गढूळ पाणी त्यांनी घमील्यात भरून एकएक बकरीला दाखवलं. बकऱ्या ते पाणी पिऊन शांत बाभळीचा पाला खात बसल्या, मी ही त्या म्हाताऱ्या आज्जींशी गावकुसाच्या गप्पा करत बसलो. त्या मला माझा आवतार बघून साहेब साहेब करत राहिल्या.
त्यांना माझ्या आज्जीचे नाव सांगितलं तरी त्या साहेब म्हणूनच मला बोलत होत्या, अखेर त्यांच्या बकऱ्या पुढे निघू लागल्या तसं त्याही माझ्यापासून दूरदूर महादेवाच्या देवळाकडे निघून गेल्या.

तितक्यात मायचा फोन आला परतीच्या प्रवासाला निघायचं होतं, मित्रांना निघतोय म्हणून कळवले. दुसऱ्या एका पिशवीतून काहीवेळापूर्वी ताज्या केळीच्या झाडाच्या तोडलेल्या केळीच्या एका फणीतून त्यांनी पाच सहा केळी हातात तोडून दिल्या अन् पुन्हा गावाला आले की खटकळी वर या माश्याचं कालवण करू म्हणून बोलावणं दिलं.

पुन्हा येईल या शब्दावर मी ही तिथून निघालो. मायला घेतलं, गावची वेस ओलांडली. नदीच्या पुलावरून स्मशानाकडे पुन्हा मायची नजर चुकवून बघून घेतलं, शेवटचा बघितलेला बाप मला तिथेच आठवतो. त्यामुळं परतीच्या वाटेला लागलं की, असं बघून घेत असतो तिकडे. पुन्हा गावची वाट बापासाठी जवळ करेल या बापाला केलेल्या वाद्यावर.

Written by,
Bharat Sonawane.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...