मुख्य सामग्रीवर वगळा

माझा साहित्य प्रवास....


आषाढी एकादशीची वारी पूर्णत्वास आली की,वारकरी मायबाप विठ्ठल रखुमाईचे आशीर्वाद घेऊन घराच्या ओढीने पुन्हा एकदा परतीच्या मार्गाला लागतात...


वारकरी मायमाऊली घरी येते व तिच्या नित्याच्या कामात व्यस्त होऊन जाते. दिवसभर काबाडकष्ट आणि सांजेच्या प्रहरी शिवना काठावर असलेल्या सावता माळ्याच्या देऊळात माऊलीच्या भक्तीरसात गुंग होऊन सर्व माऊली भक्तांनी केलेला हरिपाठ,भजन दिवसभराचा थकवा आणि संसारातील तडजोडी यांना विसरायला लावणारा असतो...

इतके सर्व करूनही माझा वारकरी या दिवसात काहीतरी चिंतेत असलेला मला भासतो... कारण त्याला वारीतील एक-एक क्षण आठवत असतो अन् या निमित्ताने त्याला मायबाप विठ्ठल रखुमाईची आठवण येत असते...

एरवी निसर्ग हिरवीशाल अंगावर घेऊन त्याच्या सौंदर्याची मुक्तपणे उधळण करत असतो. पावसाने नदी,नाले पूर्णपणे भरलेली असतात,श्रावणाची जसजशी चाहुल लागते तसतशी झाडांना नव्याने पालवी फुटू लागते, सुगंधित फुलांची आरास निसर्गात सर्वदूर पसरू लागते...

या काळात घरात भर दुपारी शांतता असते अन् नकळत मलाही जाणीव होते की,माझ्या साहित्य क्षेत्रातील वाटचालीस सुरुवात याच दिवसांमध्ये लहानपणी आजोबांनी केलेल्या संस्कारातून झालेली असावी...

श्रावणाची चाहुल लागते आणि आषाढी वारीवरून जेव्हा आजोबा परतत असायचे,त्यावेळी येत असतांना आजोबा वारकरी संप्रदायातील,विविध विषयांतील बरीच पुस्तके पंढरपुरातील जत्रेतून घेऊन येत असत...

दुपारच्या वेळी घरातील सर्व कामे आवरले सर्व शेताला गेले की आजोबा ती मोठ्ठाली पुस्तके त्यांच्या पडसात असलेल्या खोलीत वाचत बसलेले असायची. मी लहान असल्यामुळे वाचन वगैरे मला येत नसले तरी त्यातील चित्र मी बघत असायचो,चित्र बघत बघत शांत बसलेलो असल्यामुळे बाबा ती पुस्तके बघण्यास मला सहज देत असायची, चित्रे बघून बघून एक क्षण यायचा की मी तिथेच झोपी जायचो...

हे सर्व होत असतांना बाबांचे नियमित वाचन आणि माझी ठरलेली पुस्तकांची रोजची भेट,यांमुळे पुस्तकात मन कधी रमायला लागले समजले नाही आणि नकळत बालवयात पुस्तकांप्रती प्रेम आणि वाचनाची आवड निर्माण झाली...

पुढे जेव्हा तालुक्याच्या गावाला राहायला आलो तीच आवड वडिलांना असल्यामुळे श्रावण महिन्यात महिनाभर वडील घरात करत असलेले ज्ञानेश्वरी पारायणे करत असत. वडिलांची विविध विषयांवरील वाचलेली थोडीफार पुस्तके,त्यामुळे कुठेतरी आजोबांनी बाबाला आणि बाबांकडून हे सर्वच पिढीजात भेटत होते नकळत त्यामुळेही आवड निर्माण होऊ लागली होती...

घरात बाबांनी आणलेला टेपरेकॉर्डर आणि त्यामुळे बालवयात मनावर परिणाम करून गेलेल्या आठवणी आजही तश्याच ताज्या आहे...
पहाटेच्या वेळी ऐकलेली विविध भक्तिगीते,सांजवेळी ऐकलेलं ताटी उघडा ज्ञानेश्वरा,मुंगी उडाली आकाशी,साने गुरुजींची खरा तो एकची धर्म,ग्रेसांची बालवयात मनावर खोलवर रुतून बसलेली कविता
पाऊस कधीचा पडतो..!

हे सर्व नकळत साहित्य क्षेत्रातीची ओढ लावन्यास आणि त्याची आवड माझ्या आत निर्माण करण्यास कारणी ठरत होते, मुळात मी स्वतःला साहित्यिक म्हणू की नको हाच एक प्रश्न आहे. कारण साहित्यिक हा खूप उंचीचा शब्द आहे,पद आहे आणि माझा प्रवास तिथवर झाला की नाही हे मला अजूनही उलगडले नाहीये....

आजही नकळत रात्रीच्या वेळी घरातील सर्व कामे आवरले की आईची असलेली गाणे,भारुड,पोवाडा,कविता,विविध ललित लेख ऐकण्याची इच्छा नकळत पुन्हा एकदा या विशेष आवडीकडे घेऊन जात असते...

अलीकडे बरेच पोवाडे ऐकले,पोवाडा म्हंटले की फारतर आपल्याला फक्त शिवाजी महाराज आणि अफजल खानाचा पोवाडा आठवतो. तो का नाही आठवावा शौर्याची,इतिहासाची साक्ष देणारा तो पोवाडा आहेच पण अलीकडे बरेच पोवाडे ऐकले आणि नकळत इतिहासातील बरीचशी माहिती समोर आली जी घेण्यापासून मी वंचित होतो...

कधीतरी मग आईच्या सोबतीने विविध कविता ऐकल्या की,मग नकळत इंद्रजित भालेराव यांच्या माध्यमातून महाराष्ट्राला भेटलेली बहीणाबाईंच्या ओव्यांची परंपरा नव्याने स्पष्ट होते. विविध कवितांचे प्रकार कानी पडतात अनेक नवोदित लेखक,कवी,कवयित्री विचारवंत यांची नव्याने ओळख होते मग आपसूकच हात लिहता होऊ बघतो...

विविध कथा,लेख मी लिहू लागतो अन् कुठेतरी हे समाधान खूप काही देऊन जाते...

मग आठवून जाते

तुझा गाव अन् सांज झाली असावी

भ्रमंती अशी भाग्यशाली असावी...

उगा जन्मते का घरंदाज कविता

पिढीजात दुःखे मिळाली असावी...


लेखन:भारत.ल.सोनवणे.

ता.कन्नड,जि.औरंगाबाद...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ