मुख्य सामग्रीवर वगळा

देवळाच्या वाटा..!

#देवळाच्या_वाटा...


सकाळ धरल्या पहाट होते,आवरासावरी करून पावले हनुमानाच्या आणि मग महादेवाच्या देऊळाकडं कुच करतात.
मंदिराचा क्रम चुकतोय पण मनात भाव असले की देवाला सर्व चालतंय,कोण श्रेष्ठ अन् कोण कसा हा विचार करायला त्याच्याकडे वेळ नाहीच व मलाही त्या भानगडीत पडायचं नाही.ठरल्या वेळेला अनवाणी पावलांनी मी चालत राहतो,गावाची वेस ओलांडायला काही अंतर बाकी असले की मारुतीरायाचं देऊळ लागतं.

फुलाला देवाच्या सानिध्यात रहायला आवडत की काय म्हणून नदीच्या थडीला लागुन बेसरमाच्या झाडालगत एक पांढर्या फुलांच्या रुईचे झाड आहे.दोन-चार फुलं दोन-चार पाने घेतली की देउळ गाठायला पावले लागतात,मारुतीरायाच्या चरणाशी पानफुल वाहुन,भोळ्याभाबड्या मनाच्या चार गोष्टी त्याला सांगायच्या देऊळाला चहूकडे तीन चकरा मारायच्या अन् सभामंडपात येऊन काही वेळ शांत बसून राहायचं...

यांचसाठी होतो अट्टहास रोजच्याला देऊळात जायचं..!
सभामंडपात बसल्यावर देवाच्या सानिध्यात छान वाटतं,लॉकडाऊन लागलं अन् लोकं देऊळाकडे येणं विसरली.माझ्यासारखा हौशी येत असतो अधूनमधून कधीतरी माझं ठरल्यावेळी येणं असते,देव बोलत नाय तो फक्त ऐकतो आपण सांगत राहायचं पण आपलं सांगणं आयुष्यभर संपणारे नाही म्हणुन मी देवाला काही बोलतही नाय अन् सांगतही नाही. आलं,दर्शन घेतलं की या सभामंडपात येऊन बसायचं गेले काही दिवस सभामंडप कोणी झाडलाच नाही म्हणून माझ्या पावलांच्या प्रतिकृती त्या धुळीत दिसु लागतात,जसा मारुतीरायचा भला मोठ्ठा पाय गावाच्या काळ्या टेकडीवर मी पाहत असतो...

आपलं कुणी सोबत नसताना काय बसून राहायचं एकटं-एकटं,मला हा एकटेपणा खुप भावतो म्हणूनच हे रोजचं येणं असते.
देऊळात मंडपात पक्षांची चिवचिव,माकडांची या फांदीवरून त्या फांदीवर खेळणे बागडणे चालू असते,कधीतरी वेड्या अशोक माऊली सारखी एखादी वृध्द व्यक्ती देऊळात येते.माझं आपल चालू असते वाऱ्याच्या झुळकेसोबत,मनाच्या लहरीशी,विचारांशी एकरूप होणं वाऱ्याच्या झुळके बरोबर आपोआपच डोळे बंद होतात अन् विचारांची काही काळ समाधी लागते...
हा अनुभव पूर्ण आयुष्य जगायला प्रेरक ठरत असतो...

मग नकळत तंद्री लागते अन् मारुतीरायला दुरून नमस्कार करून सभामंडपातून पावले माघारी फिरतात,महादेवाच्या देऊळाच्या मार्गाला लागतात.हे देऊळ म्हंटले की गावकुसाच्या बाहेर नदी थडीला एकांगाला,हल्ली क्वचितच कुणीतरी जातं या देऊळात.काळ बदलला काळा बरोबर माणसंही,का कुणास ठाऊक मनास नको ते प्रश्न छळ लागतात पण मग स्वतःच त्याला सावर घालत सावरत मी मार्गाने चालू लागतो जोवर होतंय तोवर यायचं मग नंतरच काय मी एकटा माझ्या मार्गाला अन् देऊळ त्याचं त्याच्या जागेवर.असंही माझ्याने देवाला काय फरक पडतो पण मला फरक पडतो...

मनाचं समाधान,मनाला शांतता,भक्ती हे कुठेतरी पिढीजात मला भेटल माझ्या गुणसूत्रात ते मला मिळाले,म्हणून ही ओढ अन् गोडी नाहीतर कसले काय...
असो अनवाणी पावले ठरल्या मार्गाने चालत राहतात,एरवी नदीच्या थडीला असलेले बेशरमाची झाडे दाट,चहूकडे पहुडलेली भासू लागतात.अधून-मधून बेलाच्या झाडांचं दर्शन होते,कधीतरी पिंपळ,साग,लिंब आहे असंख्य झाडे यांच्या पड सावलीत चालतांना पावलाला हवाहवासा थंडावा वाळूत मिळत असतो अन् स्वर्गसुखाचा अनुभव पावलोपावली अनुभवायला मिळत असतो...

मग नकळत साजेश्या पिंपळाच्या पानाला मी शोधू लागतो आणि सोबतच साने गुरुजींच्या श्यामची आई पुस्तका मधला श्याम मला आठवतो...
पिंपळाच्या साजेश्या पानाला शोधून त्याला टाक लावून छान डवणे तयार केले जाते,त्याने नदी किनाऱ्यावरून पाणी भरून आणून महादेवाच्या पिंडीवर टाकत तिचा अभिषेक माझ्या हाताने मी करतो हे सवयीचं अन् नेहमीचं आहे म्हणून यात मला कुठल कुतूहल वाटत नाही...

 भक्ती भावाने नमस्कार करणे होते,देवाला मनाच्या चार गोष्टी मी सांगू लागतो पिंडीला स्पर्शून नमस्कार केला की झालं महादेवाचं दर्शन इतकचं.नंतर पुन्हा सभा मंडपात येऊन परिसराला अनुभवणे होतं तो परिसर अन् हा परिसर फरक दिसून येतो,येथील शांतता भेटणारा एकांत दरवेळेला त्याचं करून टाकतो मग म्हणुन हे अधूनमधून येणं त्याचं आपल्याला बोलवणच भासते....

Written by,
Bharat Sonwane...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...