मुख्य सामग्रीवर वगळा

शिवना मायच्या कथा..! भाग - आठ

शिवना मायच्या कथा..! भाग - आठ 

रानच्या वाटा दूर करत आम्ही गावच्या वेशीला असलेल्या खोकल्या आईच्या देऊळा जवळ येऊन ठेपलो. भोळ्या राजूच्या बकऱ्या दूरवर रानातून येताना नजरी पडत होत्या. त्यांच्या खुरांची धूर आसमंतात अस्ताला जाणाऱ्या सूर्य किरणात मिसळून तांबूस तपकिरी रंगाची धूळ दिसू लागली होती. या धुळीत आसमंत अंधारून यावं असा दिसू लागला होता.

लोकांच्या वावरात रोजानं गेलेल्या बायका डोईवर सरपणाचा भारा घेऊन टोळकीनं गाव जवळ करीत होत्या. गडी माणसं कुणी बैलगाडीत, कुणी सायकलीवर दुधाची कॅटली अटकवून गप्पा झोडीत झोडीत गाव जवळ करत होते. 

खोकल्याईचं दर्शन घेऊन मी सईद आणि अन्वर घराच्या वाटेला लागलो. घरं जवळ आली तशी सईद आणि अन्वर मुसलमान मोहल्यात असलेल्या त्यांच्या घराच्या दिशेनं निघून गेली. उद्या भेटूया म्हणून मी ही माझ्या घराच्या दिशेने आलो. भोळ्या राजूच्या बकऱ्या आता गावात शिरल्या होत्या. भोळा राजू त्या बकऱ्या ज्यांनी त्याच्याकडे राखायला म्हणून ठेवल्या होत्या, त्यांच्या दावणीला बांधून घराच्या दिशेनं जात होता.

मी ही आता घराजवळ पोहचलो होतो. दिवसभराच्या भटकंती नंतर आता खूप थकल्यासारखे झाले होते म्हणून मी घरापाशी येऊन मोहरल्या ओट्यावर बसून राहिलो. माय कधीच शेतातून आली होती.ती शेतातून आली अन् तिनं सांजेचा अंगणाला सारवून, ढवळ्या मातीचा चुल्हीला पोचारा घेऊन माय देव्हाऱ्यात दिवाबत्ती करत बसली होती.

दगडू आज्जा हळूवार बसल्याजागी खाटेवर तोंडातच पुटपुटत देवाचं नाव घेत असावा असं त्याच्या हातवारे करण्यावरून कळत होतं. गावातल्या म्हाताऱ्या बायकांचा सावत्या माळ्याच्या देवळात होत असलेला हरिपाठ संपला आणि त्याही मोठमोठ्याने गप्पा झोडीत मदरीच्या गल्लीतून त्यांच्या त्यांच्या घराला निघून गेल्या .

धोंडू नाना तेली आणि त्याची सवंगडी त्याच्या तेलाच्या दुकानावर सतरा गावच्या सतरा गप्पा करीत लोकांची धूनी काढीत होती. काही आठ दहा वर्षांची लहानगी सांजेला देवळात दिवा लावायला म्हणून हातपाय तोंड धुवून हातात तेलाची कुप्पी,काड्याची पेटी अन् अगरबत्ती असेल तर अगरबत्ती घेऊन शनिदेवाच्या देवळात दिवा लावायला जात होती.

मायची सांजेची दिवाबत्ती झाली अन् मायना चूल पेटवून रात्रीचं रांधायला घेतलं. मायचा भाकरी बडवण्याचा आवाज मी बसल्या जागे मोहरच्य खोलीपर्यंत येत होता. घरात तेवत्या दिव्याचा मंद प्रकाश अन् या प्रकाशाने सारं घर कसं खुलून दिसत होते.

भाकरी अन् पिठलं झालं तसं मायना मला हाक दिली अन् म्या अन् माय चुल्हीजवळ बसून चुल्हीवर आळणाऱ्या पिठल्याला ताटात घेऊन भाकरी संगतीने खात बसलो. तावदानाच्या बाहेरून येणाऱ्या हळूवार वाऱ्याच्या झुळकेसरशी पिठाच्या डब्यावर असलेला दिवा विझू की मिणमिनू करत होता.

जेवणं झाली तशी माय जेवणाची, स्वयंपाकाची बासणे घेऊन मोहरचा अंगणात चूल्हीतला राखुंडा काढून त्यानं भांडी घाशीत बसली. शांता नानीचं जेवण खावन झालं असावं म्हणून ती ही मायचा जवळ बसून गप्पा हाणू लागली होती. मी मोहरल्या खोलीच्या चौकटीवर बसून येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना न्याहाळत होतो.

दगडू आज्जा हळूवार उठून ढुंगण खरडीत खरडीत त्याच्या बाहेर असलेल्या खाटेवर येऊन निपचित अंगावर पांघरून घेऊन खुडमुंडी करून झोपून गेला. त्याची झालेली अवस्था विचार केला तर खूप वाईट झाली होती, म्हातारपणाला त्याला आलेलं दुखणे अन् यात त्याची होणारी आबळ बघितली की आता वाटायचं की दगडु आज्याचा हा भोग आता सरावा.

मी पुढच्या खेपेला गावी आलो दगडु आज्जा या जगाला सोडून गेलेला असावा, त्याच्या दुखण्यातून मुक्त झालेला असावा. इतकी बीचाऱ्याच्या जगण्याची आबळ चालू होती. तितकंच त्याच्या या दुखण्यातून तो मोकळा व्हावा असं मनोमन वाटत होतं. 
कारण त्याच्या पिढीची गावात एखाद-दोन म्हातारे सोडली तर सारीच देव माणसं कधीच हे जग सोडून गेली होती. दगडू आज्जा आजचा दिवस उद्यावर ढकलित अजूनही जगत होता. 

गावातल्या लोकांची जेवणं झाली तसे लोकं एक एक करून सावता माळ्याच्या देवळामोहरे असलेल्या पारावर गप्पा झोडायला म्हणून येऊ लागली होती. संतू नाना, तेल्याच्या मळ्यातला शिवा, धोंडू गोसव्याचा हरी, जगण्या यांच्या पारावर चांगल्याच गप्पा रंगल्या होत्या.

काही म्हातारे जेवणं करून शनिदेवाच्या देवळात भजन करत बसली होती. त्यांच्या उंच गळ्याच्या आवाजाने अभंग ऐकायला इतकं सुंदर वाटायचं की त्यांच्या संगतीने बसून हे सर्व आपण म्हणावं,ऐकावं असं वाटायचं. आठ वाजले तसतसे गावच्या सगळ्याच पारावर गप्पाचे फड रंगत असत ते रात्री एक एक वाजेपर्यंत या गप्पा चालू असत.

बायकांचे कामं आवरली तसं बायकाही ओट्यावर बसून गप्पा मारत बसल्या, कोणी दिवसभराच्या कामातून जरासा जीवाला विसावा अन् देवाच्या नामस्मरणात वेळ द्यावा म्हणून काही बायका रंगी नानीच्या ओट्यावर हरिपाठ म्हणत बसल्या होत्या.

दहावी वेळ कलली तसं दिवभर भटकल्याने, थकव्याने माझेही डोळे नकळत लागू लागले अन् मग मी अंथरूण, पांघरूण घेऊन खाटेवर अंथरूण टाकून निपचित पडून राहिलो. पाय खूप दुखू लागले होते. डोंगरात अशी भटकंती करण्याची आता सवय राहिली नसल्यानं कदाचित हे झालं असावं असं वाटत होतं. 
कारण, आता मी शहराचा झालो होतो,गाव कधीच माझ्यापासून दुरावला होता. घरात जळणारी चिमणी माल्हवून मी निवांत झोपी गेलो होतो..!

क्रमशः

Written by
Bharat Sonawane .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...