मुख्य सामग्रीवर वगळा

शिवना मायच्या कथा..! भाग-सहा


शिवना मायच्या कथा भाग-सहा 

आज एकादस असल्यानं पहाटेच नेहमीप्रमाणे विठ्ठल रखुमाईच्या पालखीची फेरी गावातून निघाली होती. विठ्ठल रखुमाईच्या नामस्मरणात तल्लीन होऊन गावकरी, लहानगी पोरं पालखीच्या पुढे फेर धरून पावल्या घेत होती. 

एकादशीच्या दिवशी गावात एक जिवंतपणा असल्याची आगळी वेगळी जाणीव होत असते,जी आज होत होती. नाही तर एरवी पहाटेच्या दहाच्या सुमारास सारा गाव रानात कामाधंद्याला निघून गेलेला असतो.
अन् गावची म्हातारी माणसं गावच्या पारावर गप्पा झोडीत बसलेले असतात. गावातल्या म्हाताऱ्या आज्या घराच्या मोहरे असलेल्या ओट्यावर दळणदाना करत बसलेल्या असतात.

सकाळ दुपारच्या पाराकडे कलली की, मग गावच्या सरकारी झेडपीच्या शाळेतली लहानगी पोरं घराच्या दिशेने गावच्या मधल्या गल्लीने पळतच सुटतात. इतक्यावेळ निपचित पडलेलं गाव या लहानग्यांच्या आवाजाने अजून जिवंत होतं.

भर दुपारच्यावेळी नदी संथपणे वाहत राहते. गावात नव्यानं आलेल्या सूना डोक्यावरचा पदर सावरत धुणे घेऊन महादेवाच्या देऊळाजवळ नदी थडीला केलेल्या दगडी पुलावर धुणे धुवत बसतात. हाच काय त्यांना हक्काचा वेळ मग माहेरच्या आठवणींना उजाळा दिला जातो.

भरघोस गप्पा होता, एकमेकींना एकमेकींच्या दादल्याच्या गोष्टी सांगितल्या जातात. त्या सहज देऊळात झोपलेल्या आजोबापर्यंत ऐकू जात असतात अन् तोही कुणी बोलायला नसल्यानं या गप्पामध्ये प्रत्यक्ष सहभाग न नोंदवता हे निपचित पडल्याजागी ऐकत बसलेल्या असतो.

पालखी मदरीच्या गल्लीतून, धोंडू नाना तेलीच्या गल्लीत आली. चौकात येऊन भाविक फेर रिंगण धरून पावल्या घेत होते. हे सगळं मी बसल्या जागेवरून बघत होतो.
पुढे चौकातून सर्व मंडळी सरळ सावत्या माळ्याच्या देऊळा मोहरच्या गल्लीतून देऊळाकडे निघाली.

ज्याच्या घरापाशी पालखी आली लोकं तिचे पाय पडून चिमुट चिमुट साखर देऊन आपल्या नित्याच्या कामाला लागत होती. विठू नामाच्या गजरात पालखी गावच्या एकांगाला असलेल्या महादेवाच्या देऊळाकडे निघाली होती. अन् हळू हळू गावातली लोकं नजरे आड झाली. गावात एकाकी शांतता पसरली.  

मी ही उठून बोकड्यागत वाढलेले केस मानेवर, चेहऱ्यावर येत होते, सावरत मी घराला लागून असलेल्या लिंभाऱ्याचा एक डगळा तोडून दातून करावं तसं घराला लागून असलेल्या आमच्या पाण्याच्या कुंडीवर उक्खड बसून दात घासत बसलो.

दगडू आज्जा हळूवार उठून ढुंगण खरडीत खरडीत त्याच्या लेवकानं बांधलेल्या लाकडी वाश्याच्या घरात येऊन बसून राहिला. घरात अंधार बुडूक असल्यानं दगडू आज्जा काही दिसंना झाला होता, त्याचं पांढर धोतर अन् त्यानं घातलेली मळकटलेली बंडी मात्र त्या अंधारातही मी बसलो त्या जागेवरून दिसत होती.
अन् अधूनमधून त्याचा खोकलण्याचा आवाज येत होता इतकंच.

मी गावातल्या येणाऱ्या जाणाऱ्याना न्याहाळत घंटाभर दात घासत बसलो. इसनाला आलेलं पाणी बादलीत घेऊन, कुंडीतून इसनाला थंड पाणी घेऊन न्हाणी घरात अंघोळीला येऊन बसलो. कव्हरभर माझा हा अंघोळीचा खेळ चालू होता. तो आवरून मी तुळशी वृंदावनात आरसा म्हणून खोचलेल्या फुटक्या काचेत माझा चेहरा न्याहाळत भांगपट्टी करू लागलो .

बोकड्यागत वाढलेले केसांच्या मधून कंगवा फिरावा तसं पाणी निथळत चेहऱ्यावर येत होतं. मी त्याला पालथ्या हाताने पुसत एकदाचा भांग पाडून, डोळ्याच्या दोन्ही भुवईच्या मधोमध अष्टगंध लाऊन मी परसदरच्या चौकटीत गार हवेचा झोका अनुभवत बसून राहिलो.

आता कुठे प्रसन्न वाटू लागलं होतं. काल केलेल्या दिवसभर भटकंतीमुळे रात्री झोपेत पाय ओढू लागले होते, जे आता बरे झाले होते. काहीवेळ काय करावं हा विचार करत बसल्यावर मी न्याहारी करायची म्हणून घरात आलो. शिंकेला लावलेली टोपली दुरूनच नजरेस पडत होती, अधूनमधून येणाऱ्या वाऱ्याच्या झोताने ती हलत होती.

मी घरात आलो शिंक्यापर्यंत हात पुरत नाही म्हणून पिठाचा डब्बा घेऊन मी त्यावर उभा राहिलो अन् बऱ्याच कसरतीने मी भाकरीचे टोपले काढून. खुंटीला टांगलेल्या कडीच्या डब्ब्यात असलेलं कोड्यास एका थाटलीत ओतलं अन् एक सवती भाकर चुरून खात बसलो.

भाकर खाऊन झाली अन् आता पुन्हा काय करावं या विचाराने मी परेशान झालो. दोन-चार दिवसच आहे घेऊ फिरून मग पुन्हा शहराच्या वाटा जवळ कराव्या लागतील. मग काय तेच कालीज, तीच कंपनी त्यामुळं आहे तोवर भटकून घेऊ म्हणून मी माझं आवरून. कोड्यास, भाकरी व्यवस्थित ठेऊन घराला असलेल्या दोन फाकाच्या दरवाज्याला कडीत अडकवून उटळे लावले अन् उटळे तुळशी वृंदावनाच्या खाली घालून मी भटकायला म्हणून डोंगराच्या पायथ्याशी घेऊन जाणाऱ्या वाटेनं निघालो.

गावातली लोकं विचारपूस करत होती, त्यांच्या रोजच्या गप्पांना मी आता कंटाळलो होतो. म्हणून गावच्या बाहेर असलेल्या एक दोघं मित्रांना घेऊन आम्ही डोंगराच्या वाटेनं लागलो. आम्ही वाटेनं कसलं सुधीनं चालतो कोणाच्या बांधावर बोराचं झाड दिसलं तर बोरच तोड, कुठं मक्का दिसली तर तीच तोड उसाचा फड दिसला तर दोन-चार उसाचे टिपरे घेऊन आम्ही खात खात निघालो होतो.


सोबत असलेला सलीम अन् अनवर माझे बालपणीचे सवंगडी होते पण ते सातवी करून पुढे शिकले नाही. आता घरची ढोरं घेऊन ते असे डोंगराच्या पायथ्याला ढोरं चारत असे म्हणून त्यांना या रानाच्या वाटा माहित झालेल्या होत्या, म्हणून अजूनच मज्जा येत होती. ती पुढे मी मागे कधी संगतीने आम्ही चालत होतो. छोटे मोठे ओढे लागले की पोटभर पाणी पिऊन घेत होतो अन् चालत होतो, चालत होतो...!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...