मुख्य सामग्रीवर वगळा

शिवनामायच्या कथा..! भाग-तीन

शिवनामायच्या कथा..! भाग-तीन
 
मी होकारार्थी मान हलविली अन् काथीने आवळलेले दोन बांबू ओढीतओढीत झोल्याआईच्या झोपडी पहूर घेऊन आलो. ती पण तीन बांबू ओढीतओढीत माझ्यामागून आली. बांबू अंगणात टाकून मी उभा राहिलो होतो, तितक्यात तिनं मला तिच्या झोपडीतून आवाज दिला..!
 
ऊ छोटे सरकार या वजेस झोपडी मई..!
मी आपल्याला कोरा चहा करतीसू..!
 
झोपडीची चौकट माझ्या खांध्याइतकी उंच असल्यानं मी वाकून झोपडीत आलो. झोल्याआईनं चुल्हांग्नात राकील ओतून चुल्हीला जाळ लावला, एका पितळी पातील्यात तुटक्या कानाच्या तीन कपांचा अंदाज घेत चहा ठेवला.
 
मी झोपडी न्याहाळत होतो. झोल्याआईच्या एव्हढ्याश्या झोपडीत एक पिवळा बल्ब चालू होता, एका घडोंचीवर पाच-सहा गोधड्यांची वळकटी करून त्या गोधड्या व्यवस्थित रचून ठेवलेल्या होत्या. चार माठांची उथळण रचलेली होती. एका झोपडीला आधार म्हणून असलेल्या लाकडाला जर्मलची कॅटली टांगलेली होती, एक छोटासा देव्हारा होता अन् त्यात दोन-चार फुटू होते.
 
चहाला उकळी आली होती तिचा सुगंध माझ्या बसल्याजागी मला येत होता. झोल्याआई तिला सांडशीत ते पातेलं धरून त्याला जाळावर हलवीत होती, तसतस चहा उकळी घेत होता. अखेरला तो चहा गाळणीत धरून मला एका तुटक्या कानाच्या कपात चहा देऊन झोल्याआई थाटलीमध्ये चहा ओतून पित बसली. अधून मधून आमच्या गप्पा चालू होत्या.
 
एरवी सूर्य अस्ताला गेला होता. रोजंदारीवर लोकांच्या वावरात कामाला जाणाऱ्या बायका, गडी लोकं घराच्या वाटा धरून घराच्या दिशेने आपापल्या वाटा जवळ करत होते. राखूळीला म्हणून राखूळ्या पहाटेच घेऊन गेलेल्या बकऱ्या, शेरडं गावच्या वेशीतून आत आली. रानातल्या रानवाटेनं त्यांच्या खुरानं उधळलेली माती मावळतीच्या प्रकाशात आसमंतात विरून जाताना दिसू लागली होती. त्या मूत्रट मातीचा वास साऱ्या पायवाटेनं माझ्या पहूर येत होता.
 
मी आता झोल्याआईच्या अंगणात तिनं ठेवलेल्या, मोडकळीस आलेल्या बाजेवर बसून हे सगळं न्याहाळत होतो. झोल्याआईनं सांज सरायला देवाला दिवाबत्ती केली अन् एक दिवा बाहेर मोडक्या क्यानीत लावलेल्या तुळशीच्या समोर ठेऊन तिनं अस्ताला गेलेल्या सूर्याच्या दिशेनं डोक्यावर पदर घेऊन काहीतरी पुटपुटत सूर्याला नमस्कार केला.
 
काही वेळापूर्वी केलेल्या चहाची भांडी अन् तिचं कोड्यास ठेवायचं कडीचं डबड अन् दोन-चार भांडी ती अंगणात घासायला घेऊन आली. चुल्हीतून राखुंडा काढून तिनं एक बोकना तोंडात टाकला अन् तो तोंडात दाबून ती नारळाच्या काथीनं भांडी घासायला लागली. एरवी सर्वदूर काळोख दाटून आला होता.
 
 
झोल्याआईच्या अन् माझ्या गप्पा चालू होत्या. झोल्याआई मला गावात घडणाऱ्या कथा सांगत होती, तिच्या बालपणीच्या आठवणी सांगत होती. गाव-गावच्या पारावर बसून तिनं विकलेली टोपले, दूरडी अन् या तिच्या तीस सालच्या धंद्यात तिला आलेले अनुभव ती मला सांगत होती.
 
हे सांगत असताना तीला अनेकदा गहिवरून यायचं. आयुष्यभर तिनं उपसलेली कष्ट अन् अजूनही म्हातारपणाला तिला सुखाची चतकुर भाकर मिळत नव्हती. तिची उभी हयात कष्ट करण्यात निघून गेली अन् अजूनही अठरा विश्व दारिद्य्र तिच्या पाचवीला पुजलेले होते.
 
हे दुःख ऐकून घेणारं तिचं हक्काचं व्यक्ती तिला कुणी नसल्यानं ती हे सगळं माझ्यापाशी रितं करत होती. बोलून आसवं गाळून मोकळं होत होती, मी ही तिला समजेल अश्या सोप्यात भाषेत शहराच्या माझ्या कहाण्या सांगत होतो.
 
शहरात येणारे अनुभव, नोकरीचा असलेला दुष्काळ. कंत्राटी पद्धतीने काम करणारी कामगार, त्यांचं हे हलखीचं आयुष्य, रात्रंदिवस असलेली त्यांची ढोर मेहनत. माझं चालू असलेलं शिक्षण, नोकरीसाठी या ना त्या कंपनीच्या गेटवर मी करत असलेलो भटकंती अन् या प्रयत्नांना अजूनही कुठं न आलेलं यश‌.
माझं दुःख मी झोल्याआईपाशी रितं करत होतो अन् ती माझ्यापाशी‌. पण ; पर्याय नव्हता घंटाभर या आमच्या गप्पात कधी निघून गेला समजलं नाही.
 
आता निघायला हवं माय-बाप भाकरी खायला ताटकळतील म्हणून मी झोल्याआईला येतूया म्हणलं. तिनंही डोळ्यातली आसवं लुगड्याच्या पदराला टिपली. अन् मला ये जा छोटं सरकार गावची वाट जवळ केली की या म्हातारीच्या घरी. म्हणून एक बांबवाच्या कमटीपासून केलेली एक दूरडी माझ्या हातात दिली. माझ्या मायला माझ्याजवळ सांगावा धाडला की,ही दुरडी पहाटच्याला देऊळात फुलं घेऊन जायला राहून दे म्हणा आक्का..!
मी होकारार्थी मान हलवून घराची वाट धरली..!
 
 
भारत लक्ष्मण सोनवणे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...