मुख्य सामग्रीवर वगळा

शिवना मायच्या कथा..! भाग -५

शिवना मायच्या कथा..! भाग -५

काही केल्या डोळे लागना झाले होते, रात भरीच भरून आली होती. अन् मी दिवसभराचा माझा फिरस्तीचा रिकामा उद्योग आठवत निपचितच विचार करत अंथरुणावर पडलो होतो. परसदारच्या अंगाला असलेल्या पिंपळाच्या झाडाचे पानं वाऱ्याच्या झोताने फडफड वाजत पानांशीच गप्पा करीत बसलं होतं. त्याचा आवाज झोपल्या जागी माझ्यापर्यंत येत होता.
तितक्यात काळोखात शिवनामायच्या थडीला असलेलं स्मशान चिरशांत, भयावह भासावं असंही डोळ्यांसमोर येऊन गेलं. स्मशानाला लागून असलेल्या नदीच्या थडीला वाळू माफीयांनी केलेल्या खोल खड्यांमध्ये कुत्रे थंडीच्या या दिवसात रातभर विसाव्याला तिथेच थांबली होती.
कुणी लोळत पडलं होतं; तर कुणी उभ्या मोठ्यानं गावच्या दिशेनं तोंड करून इवळत होतं. तो इवळण्याचा आवाज माझ्यापर्यंत सहज येत होता. सारं गाव आतापर्यंत निपचित पडला असावं असं वाटत होतं.
अधूनमधून कुंभाराच्या आळीत राहणारा दगडु आज्जा खोकल्याची उबळ आली की मोठ्यानं खोकलायचा. अगदी तासनतास तो खाटेवर खोकलत अंथरुणात अंगावर गोधडी घेऊन बसलेला असायचा. त्यानं तोंडातून फेकलेला बेडका पट्टदेशी आवाज करत जमिनीवर पडायचा. जसं आकाशातून सलगीच्या उन्हाळ्यात टपकन एखादी गार पडावी.
कुण्या दुसऱ्या गल्लीला रात्रीची लाईन असल्यामुळे गव्हाचं रान ओलीता खाली आणायचं म्हणून वावरात जायची कुणाची गरबड चालू असायची. अधून-मधून बकऱ्याचा परसदरच्या भिंतीला लागून फळफळ मुतण्याचा आवाज यायचा अन् नकळत त्याचा इसाडा वासही नाकाला भिडायचा.
घराच्या मोहरं असलेल्या संतुक आबांच्या गाईंच्या गळ्यात असलेल्या तांबी घंट्यांचा कीनकीन आवाज अन् त्यांच्याच म्हशीच्या गळ्यात असलेल्या पत्र्याच्या डब्यात केलेल्या घंटींचा आवाज एखाद्या घड्याळीच्या लोलकासारखा यायचा. अशा बारीकसारीक गोष्टी गावात चालूच असतात.
अशा वेळी मला ऐन रात्री वाहत असलेली शहरं, अंगावर येणारी औद्योगिक वसाहतीमध्ये असलेली यंत्रांची घरघर सगळं सगळं आठवतं, मग शहर नकोसं वाटायला लागतं. गाव हवंहवंस वाटू लागतं. शहराकडे जाण्याचा आपलाच अट्टहास अन् त्यामुळं आता पडणारी ही अशी असंख्य प्रश्न माझी झालेली द्विधा मनस्थिती सगळं वाईट्ट आहे.
खरं तर सगळ्यात वाईट गोष्ट माझ्यासाठी ही असते की, मी जेव्हा माझं गाव सोडत असतो, तेव्हा मी पार पोरका झालेला असतो. गावच्या माझ्या माणसांच्या सहवासात असूनही अन् मग पुढे शहरात येऊनही दोन-चार दिवस हे विचारचक्र डोक्यात फिरत राहते.
अशा या विचारात काळोख मध्यरात्र कशी सरून गेली कळलं नाही. पहाटेच्या तीनच्या सुमाराला दरवाजांच्या फटीतून येणाऱ्या गार हवेने माझे डोळे लागले ते पहाटे मायची घर झाडाच्या लगबगीपर्यंत लागलेच होते.
सूर्योदय झाला अन् डोळे चोळत चोळत उठलो. मायना अंथरूण-पांघरूण घडी घालून घडोंचीवर फेकलं. नुकतंच शेणाने सारवलेल्या घरात शेणाची बारीक कण सूर्याच्या किरणांच्या समवेत समीप होऊन खिडकीशी सलगी करू लागली होती.
मी उठून आमच्या झोपडीवजा घराच्या चौकटीवर येऊन बसून राहिलो. बोकड्यागत वाढलेले केस मानेवर, चेहऱ्यावर येत होते. त्यांना सावरत मी गावातल्या लोकांची कामाची चालू असलेली लगबग बघत बसून राहिलो होतो.
दगडू आज्जा अजूनही खाटेवर निपचित पोटपाय एक करून अंगाचा मुटकळा करून खाटेवर झोपलेला होता. एकांगाला त्यानं रात्री खोकलून खोकलून टाकलेले बेडके अन् त्यावर माशा गणगण करत होत्या. संतुक आबा म्हशी पिळीत होता, त्याचा धाकला लेवुक गोठ्याची झाडझुड करत होता.
रात्री गव्हाला पाणी भरायला म्हणून गेलेली लोकं उजाडायच्या आतच येऊन निपचित झोपली होती. गावातल्या काही लोकांची आखरं शेताला होती ती पहाटेच उठून चारापाणी करायला म्हणून शेतात गेली. अन् आता एका हातात दुधाची क्यान घेऊन तीही गाव जवळ करत होती.
रात्री स्मशानात इवळत असलेली कुत्रे सावत्या माळ्याच्या देवळाजवळ असलेल्या पिंपळ पारावर येऊन निपचित पाय पोटाशी घेऊन झोपून राहिली होती. काही कुत्र्यांची पिल्लं या पहाटेच एकमेकांशी खेळत बागडत होती. गावच्या काही माय माउली पहाटेच देऊळात काकडा करून घराच्या वाटा जवळ करीत होत्या.
काही म्हातारे ज्यांच्या आयुष्याची दोरी कधीही तुटन अशे म्हातारे काठी टेकीत टेकीत सावत्या माळ्याच्या देऊळाकडे निघाली होती. तोंडातून शब्द बाहेर निघणार नाही असं काही तरी मनातच मनाशी अन् देवाशी बोलत ती चालत होती.
पहाटेच काकड्यावरून येणाऱ्या मंडळींना गावातली काही लोकं चहासाठी बोलवीत होती. ओट्यावर बसून त्यांचं चहा पिणं होत होतं.
क्रमशः
भारत सोनवणे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...