मुख्य सामग्रीवर वगळा

शिवना मायच्या कथा..! भाग -५

शिवना मायच्या कथा..! भाग -५

काही केल्या डोळे लागना झाले होते, रात भरीच भरून आली होती. अन् मी दिवसभराचा माझा फिरस्तीचा रिकामा उद्योग आठवत निपचितच विचार करत अंथरुणावर पडलो होतो. परसदारच्या अंगाला असलेल्या पिंपळाच्या झाडाचे पानं वाऱ्याच्या झोताने फडफड वाजत पानांशीच गप्पा करीत बसलं होतं. त्याचा आवाज झोपल्या जागी माझ्यापर्यंत येत होता.
तितक्यात काळोखात शिवनामायच्या थडीला असलेलं स्मशान चिरशांत, भयावह भासावं असंही डोळ्यांसमोर येऊन गेलं. स्मशानाला लागून असलेल्या नदीच्या थडीला वाळू माफीयांनी केलेल्या खोल खड्यांमध्ये कुत्रे थंडीच्या या दिवसात रातभर विसाव्याला तिथेच थांबली होती.
कुणी लोळत पडलं होतं; तर कुणी उभ्या मोठ्यानं गावच्या दिशेनं तोंड करून इवळत होतं. तो इवळण्याचा आवाज माझ्यापर्यंत सहज येत होता. सारं गाव आतापर्यंत निपचित पडला असावं असं वाटत होतं.
अधूनमधून कुंभाराच्या आळीत राहणारा दगडु आज्जा खोकल्याची उबळ आली की मोठ्यानं खोकलायचा. अगदी तासनतास तो खाटेवर खोकलत अंथरुणात अंगावर गोधडी घेऊन बसलेला असायचा. त्यानं तोंडातून फेकलेला बेडका पट्टदेशी आवाज करत जमिनीवर पडायचा. जसं आकाशातून सलगीच्या उन्हाळ्यात टपकन एखादी गार पडावी.
कुण्या दुसऱ्या गल्लीला रात्रीची लाईन असल्यामुळे गव्हाचं रान ओलीता खाली आणायचं म्हणून वावरात जायची कुणाची गरबड चालू असायची. अधून-मधून बकऱ्याचा परसदरच्या भिंतीला लागून फळफळ मुतण्याचा आवाज यायचा अन् नकळत त्याचा इसाडा वासही नाकाला भिडायचा.
घराच्या मोहरं असलेल्या संतुक आबांच्या गाईंच्या गळ्यात असलेल्या तांबी घंट्यांचा कीनकीन आवाज अन् त्यांच्याच म्हशीच्या गळ्यात असलेल्या पत्र्याच्या डब्यात केलेल्या घंटींचा आवाज एखाद्या घड्याळीच्या लोलकासारखा यायचा. अशा बारीकसारीक गोष्टी गावात चालूच असतात.
अशा वेळी मला ऐन रात्री वाहत असलेली शहरं, अंगावर येणारी औद्योगिक वसाहतीमध्ये असलेली यंत्रांची घरघर सगळं सगळं आठवतं, मग शहर नकोसं वाटायला लागतं. गाव हवंहवंस वाटू लागतं. शहराकडे जाण्याचा आपलाच अट्टहास अन् त्यामुळं आता पडणारी ही अशी असंख्य प्रश्न माझी झालेली द्विधा मनस्थिती सगळं वाईट्ट आहे.
खरं तर सगळ्यात वाईट गोष्ट माझ्यासाठी ही असते की, मी जेव्हा माझं गाव सोडत असतो, तेव्हा मी पार पोरका झालेला असतो. गावच्या माझ्या माणसांच्या सहवासात असूनही अन् मग पुढे शहरात येऊनही दोन-चार दिवस हे विचारचक्र डोक्यात फिरत राहते.
अशा या विचारात काळोख मध्यरात्र कशी सरून गेली कळलं नाही. पहाटेच्या तीनच्या सुमाराला दरवाजांच्या फटीतून येणाऱ्या गार हवेने माझे डोळे लागले ते पहाटे मायची घर झाडाच्या लगबगीपर्यंत लागलेच होते.
सूर्योदय झाला अन् डोळे चोळत चोळत उठलो. मायना अंथरूण-पांघरूण घडी घालून घडोंचीवर फेकलं. नुकतंच शेणाने सारवलेल्या घरात शेणाची बारीक कण सूर्याच्या किरणांच्या समवेत समीप होऊन खिडकीशी सलगी करू लागली होती.
मी उठून आमच्या झोपडीवजा घराच्या चौकटीवर येऊन बसून राहिलो. बोकड्यागत वाढलेले केस मानेवर, चेहऱ्यावर येत होते. त्यांना सावरत मी गावातल्या लोकांची कामाची चालू असलेली लगबग बघत बसून राहिलो होतो.
दगडू आज्जा अजूनही खाटेवर निपचित पोटपाय एक करून अंगाचा मुटकळा करून खाटेवर झोपलेला होता. एकांगाला त्यानं रात्री खोकलून खोकलून टाकलेले बेडके अन् त्यावर माशा गणगण करत होत्या. संतुक आबा म्हशी पिळीत होता, त्याचा धाकला लेवुक गोठ्याची झाडझुड करत होता.
रात्री गव्हाला पाणी भरायला म्हणून गेलेली लोकं उजाडायच्या आतच येऊन निपचित झोपली होती. गावातल्या काही लोकांची आखरं शेताला होती ती पहाटेच उठून चारापाणी करायला म्हणून शेतात गेली. अन् आता एका हातात दुधाची क्यान घेऊन तीही गाव जवळ करत होती.
रात्री स्मशानात इवळत असलेली कुत्रे सावत्या माळ्याच्या देवळाजवळ असलेल्या पिंपळ पारावर येऊन निपचित पाय पोटाशी घेऊन झोपून राहिली होती. काही कुत्र्यांची पिल्लं या पहाटेच एकमेकांशी खेळत बागडत होती. गावच्या काही माय माउली पहाटेच देऊळात काकडा करून घराच्या वाटा जवळ करीत होत्या.
काही म्हातारे ज्यांच्या आयुष्याची दोरी कधीही तुटन अशे म्हातारे काठी टेकीत टेकीत सावत्या माळ्याच्या देऊळाकडे निघाली होती. तोंडातून शब्द बाहेर निघणार नाही असं काही तरी मनातच मनाशी अन् देवाशी बोलत ती चालत होती.
पहाटेच काकड्यावरून येणाऱ्या मंडळींना गावातली काही लोकं चहासाठी बोलवीत होती. ओट्यावर बसून त्यांचं चहा पिणं होत होतं.
क्रमशः
भारत सोनवणे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड