मुख्य सामग्रीवर वगळा

शिवना मायच्या कथा..! भाग -५

शिवना मायच्या कथा..! भाग -५

काही केल्या डोळे लागना झाले होते, रात भरीच भरून आली होती. अन् मी दिवसभराचा माझा फिरस्तीचा रिकामा उद्योग आठवत निपचितच विचार करत अंथरुणावर पडलो होतो. परसदारच्या अंगाला असलेल्या पिंपळाच्या झाडाचे पानं वाऱ्याच्या झोताने फडफड वाजत पानांशीच गप्पा करीत बसलं होतं. त्याचा आवाज झोपल्या जागी माझ्यापर्यंत येत होता.
तितक्यात काळोखात शिवनामायच्या थडीला असलेलं स्मशान चिरशांत, भयावह भासावं असंही डोळ्यांसमोर येऊन गेलं. स्मशानाला लागून असलेल्या नदीच्या थडीला वाळू माफीयांनी केलेल्या खोल खड्यांमध्ये कुत्रे थंडीच्या या दिवसात रातभर विसाव्याला तिथेच थांबली होती.
कुणी लोळत पडलं होतं; तर कुणी उभ्या मोठ्यानं गावच्या दिशेनं तोंड करून इवळत होतं. तो इवळण्याचा आवाज माझ्यापर्यंत सहज येत होता. सारं गाव आतापर्यंत निपचित पडला असावं असं वाटत होतं.
अधूनमधून कुंभाराच्या आळीत राहणारा दगडु आज्जा खोकल्याची उबळ आली की मोठ्यानं खोकलायचा. अगदी तासनतास तो खाटेवर खोकलत अंथरुणात अंगावर गोधडी घेऊन बसलेला असायचा. त्यानं तोंडातून फेकलेला बेडका पट्टदेशी आवाज करत जमिनीवर पडायचा. जसं आकाशातून सलगीच्या उन्हाळ्यात टपकन एखादी गार पडावी.
कुण्या दुसऱ्या गल्लीला रात्रीची लाईन असल्यामुळे गव्हाचं रान ओलीता खाली आणायचं म्हणून वावरात जायची कुणाची गरबड चालू असायची. अधून-मधून बकऱ्याचा परसदरच्या भिंतीला लागून फळफळ मुतण्याचा आवाज यायचा अन् नकळत त्याचा इसाडा वासही नाकाला भिडायचा.
घराच्या मोहरं असलेल्या संतुक आबांच्या गाईंच्या गळ्यात असलेल्या तांबी घंट्यांचा कीनकीन आवाज अन् त्यांच्याच म्हशीच्या गळ्यात असलेल्या पत्र्याच्या डब्यात केलेल्या घंटींचा आवाज एखाद्या घड्याळीच्या लोलकासारखा यायचा. अशा बारीकसारीक गोष्टी गावात चालूच असतात.
अशा वेळी मला ऐन रात्री वाहत असलेली शहरं, अंगावर येणारी औद्योगिक वसाहतीमध्ये असलेली यंत्रांची घरघर सगळं सगळं आठवतं, मग शहर नकोसं वाटायला लागतं. गाव हवंहवंस वाटू लागतं. शहराकडे जाण्याचा आपलाच अट्टहास अन् त्यामुळं आता पडणारी ही अशी असंख्य प्रश्न माझी झालेली द्विधा मनस्थिती सगळं वाईट्ट आहे.
खरं तर सगळ्यात वाईट गोष्ट माझ्यासाठी ही असते की, मी जेव्हा माझं गाव सोडत असतो, तेव्हा मी पार पोरका झालेला असतो. गावच्या माझ्या माणसांच्या सहवासात असूनही अन् मग पुढे शहरात येऊनही दोन-चार दिवस हे विचारचक्र डोक्यात फिरत राहते.
अशा या विचारात काळोख मध्यरात्र कशी सरून गेली कळलं नाही. पहाटेच्या तीनच्या सुमाराला दरवाजांच्या फटीतून येणाऱ्या गार हवेने माझे डोळे लागले ते पहाटे मायची घर झाडाच्या लगबगीपर्यंत लागलेच होते.
सूर्योदय झाला अन् डोळे चोळत चोळत उठलो. मायना अंथरूण-पांघरूण घडी घालून घडोंचीवर फेकलं. नुकतंच शेणाने सारवलेल्या घरात शेणाची बारीक कण सूर्याच्या किरणांच्या समवेत समीप होऊन खिडकीशी सलगी करू लागली होती.
मी उठून आमच्या झोपडीवजा घराच्या चौकटीवर येऊन बसून राहिलो. बोकड्यागत वाढलेले केस मानेवर, चेहऱ्यावर येत होते. त्यांना सावरत मी गावातल्या लोकांची कामाची चालू असलेली लगबग बघत बसून राहिलो होतो.
दगडू आज्जा अजूनही खाटेवर निपचित पोटपाय एक करून अंगाचा मुटकळा करून खाटेवर झोपलेला होता. एकांगाला त्यानं रात्री खोकलून खोकलून टाकलेले बेडके अन् त्यावर माशा गणगण करत होत्या. संतुक आबा म्हशी पिळीत होता, त्याचा धाकला लेवुक गोठ्याची झाडझुड करत होता.
रात्री गव्हाला पाणी भरायला म्हणून गेलेली लोकं उजाडायच्या आतच येऊन निपचित झोपली होती. गावातल्या काही लोकांची आखरं शेताला होती ती पहाटेच उठून चारापाणी करायला म्हणून शेतात गेली. अन् आता एका हातात दुधाची क्यान घेऊन तीही गाव जवळ करत होती.
रात्री स्मशानात इवळत असलेली कुत्रे सावत्या माळ्याच्या देवळाजवळ असलेल्या पिंपळ पारावर येऊन निपचित पाय पोटाशी घेऊन झोपून राहिली होती. काही कुत्र्यांची पिल्लं या पहाटेच एकमेकांशी खेळत बागडत होती. गावच्या काही माय माउली पहाटेच देऊळात काकडा करून घराच्या वाटा जवळ करीत होत्या.
काही म्हातारे ज्यांच्या आयुष्याची दोरी कधीही तुटन अशे म्हातारे काठी टेकीत टेकीत सावत्या माळ्याच्या देऊळाकडे निघाली होती. तोंडातून शब्द बाहेर निघणार नाही असं काही तरी मनातच मनाशी अन् देवाशी बोलत ती चालत होती.
पहाटेच काकड्यावरून येणाऱ्या मंडळींना गावातली काही लोकं चहासाठी बोलवीत होती. ओट्यावर बसून त्यांचं चहा पिणं होत होतं.
क्रमशः
भारत सोनवणे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...