मुख्य सामग्रीवर वगळा

शिवना मायच्या कथा. भाग - ७

शिवना मायच्या कथा. भाग - ७

तवल्यागडचा डोंगूर आम्ही अर्धानिर्धा चढला अन् मला एकाकी धाप लागल्यासारखे झाले. शहराला गेलो तसं कष्टाची कामं कमी झाली अन् श्रम करण्याची सवय मोडल्या कारणाने  माझी ही अशी अवस्था झालेली होती.

आम्ही डोंगराच्या माथ्यावर पोहोचलो तिथून पत्र्याचा, कौलाच्या झोपडीच्या आकारांच्या घरांचा सारा गाव नजरीस पडत होता. गावाच्या जवळपास रानातल्या रानवाटा डोळ्यांना स्पष्ट दिसत होत्या. ज्या वाटांवर नजर फिरली की आमची नजर आपसूकच आम्हाला गावाजवळ, गावच्या वेशीजवळ घेऊन येत होती.

भली धाप लागल्याने मी हिरव्या गवतात बोडक्या बाभळीच्या पडसावली खाली लोळत पडलो होतो. सलीम दूरवर दिसणाऱ्या धरणपाळीवर भोळ्या राजूच्या चरणाऱ्या बकऱ्यांना बोटे डोळ्याच्या समोर धरून अनवरला दाखवत होता. ते दोघेही भोळ्या राजूच्या बोलण्याची नक्कल करत एकसोबत हातवारे करत मोठ्यानं हसत होते.

सलीम भोळ्या राजूच्या बोलण्यातले नेहमीचे वाक्य मोठ्यानं बोलत होता. जेव्हा जेव्हा त्याच्या बकऱ्या सरळ वाटेला चरायचे सोडून आडवाटेला शेतकऱ्याच्या रानात घुसायची तेव्हा तो जसं बकऱ्याना उद्देशून बोलायचा तसं सलीम बोलत होता.

हुरीयो केवढी ये..!
मायची केवढी. केवढी... केवढी... हुरीयो..!
केवढी..! केवढी...!
बारबापे शिधी वाटनी चालीये हुरीयो..! हुरियो.. केवढी...!

अगदी हुबेहूब सलीम भोळ्या राजूच्या आवाजात त्याची नक्कल करत होता. अनवर मोठ्या मोठ्यानं शिळ फुंकित हसत होता, मी ही गरबड्या हसू हसू लोळत होतो.

आमचा आवाज भोळ्या राजूपर्यंत गेला की काय म्हणून, तो तवल्यागडच्या डोंगराकडे बघत एक हात डोळ्याच्या वर घेऊन कोल्ह्यागत कुही ईक..! कुही ईक..! ओरडत होता.

या ओरडण्याचा मला अंदाज आला नाही पण सलीम अन् अनवर अजून मोठ्यानं हसायला लागले. कदाचित ते तिघे रानात ढोरं, बकऱ्या चारायला गेले की त्यांचा हा काही कोडवर्ड असेल बोलण्याचा.

बरच हसून खिदळून झालं अन् आम्ही डोंगराच्या सर्वात उंचावर असलेल्या दगडावर जाऊन गाव न्याहाळत बसलो. इतक्या उंचीवरून सर्व गाव अन् कोंडूर धरण संपूर्णपणे डोळ्यात मावत होते.

गावातले लोक वावरात कामं करताना दिसत होती,देऊळाच्या मोहरं असलेल्या पारावर असलेली गावातली म्हातारी माणसं ढवळ्या रंगाच्या कपड्याने डोळ्यांना नजरी पडत होती. डोंगरात भटकत असलेली कुत्र्यांची एक टोळकी त्यांनी पायांनी खणून केलेल्या छोट्याश्या भूयाररुपी घरात गारवा अनुभवत लोळत पडली होती.

अधूनमधून डोंगराच्या एका पल्याड असलेल्या हिरव्या दाटकंच रानातून मोरांचा आरवण्याचा आवाज येत होता. डोळ्यांना डोंगराच्या कपरीला असलेल्या झऱ्यांचे चमचमते पाणी गावात जाणाऱ्या नदडीला मिळेपर्यंत दिसत होते. 
हे सर्व बघत आम्ही निपचित शांत बसून राहिलो होतो.

आता अंगाला आलेल्या घामाचा वाऱ्यामुळे गारवा अनुभवायला मिळत होता. या वाऱ्याच्या झुळके बरोबर अजूनच छान वाटत होतं.
अन्वर आमच्या लहानपणीच्या उनाड आठवणी सांगत होता, आजही ते तिघे किती मज्जा करतात हे ही सांगत होता. मी माझ्या शहरातलं अन् गावातलं बकवास आयुष्य त्यांचा न जुळणारा ताळमेळ जुळवू बघत होतो.

आयुष्याला घेऊन मला नेमकं काय हवं आहे..? या प्रश्नाची वजाबाकी,बेरीज करत बसलो होतो. येणारी उत्तरे आणि होणारी जाणीव रडायला यावं इतकी वाईट्ट होती पण पर्याय नव्हता.

कारण माय, बापूने इतकी ढोर मेहनत घेऊन रात्रीचा दिवस करून आपल्याला, शिक्षणाला खूप सारा पैका खर्च करून शहराची वाट आपल्याला शिक्षणासाठी, नोकरीसाठी जवळ करायला लावली होती. अलीकडे गावाला आलं की बापूंच्या बोलण्यातून हे जाणवायचं की, लवकरच त्यांना मला माझ्या पायावर उभं झालेलं बघायचं होतं.

कारण त्यांनीही त्यांच्या उमेदीच्या काळात खूप कष्ट केले, त्रास सोसलेला होता. आता माझ्या आडून त्यांना सुखाचे दिवस बघता येईल असं त्यांना वाटत होतं, मी ही याच विचारांना डोक्यात घेऊन कालीज करून रातच्या शिफ्टला कंपनीत कामाला जात होतो. दोन पैसे यायचे त्यात माझं शहराला राहणं, खाणं भागून जायचे पण अजून माय बापूच्या डोक्यावरचे ओझे मी वाहू शकेल इतपत पैका कमावणारा मी झालो नव्हतो.

याच विचारात घंटाभर कसा निघून गेला कळला नाही अन् समीर, अनवरला मी बघतो तर ती दोघं लिंबाच्या झाडावर जाऊन बसून राहिली होती. भिंगोट्याची भिंगरी करून तिला फिरवत होती तिचा हेलिकॉप्टरसारखा येणारा भूनभुन आवाज ऐकून मी त्यांच्याजवळ गेलो अन् सलीमकडून मी ती भिंगरी घेऊन लिंभाऱ्याच्या झाडावर बसून तिला भिरकावीत राहिलो. 

डोंगरातील करवंद, आवळे, बिब्बे खाऊन दिवस कसा उतरणीला आला कळला नाही. दिवसभर डोंगरात केलेल्या भटकंतीमुळे परतीच्या वाटेला पाय पोटरीतून वर ओढू लागले होते. चालायची इच्छा होत नव्हती, पण अस्ताला जाणारा सूर्य जसा डोंगराच्या आड जाऊ लागला तश्या आम्ही घराच्या वाटा जवळ केल्या. घराच्या दिशेने गावाकडे निघालो.

पहाटेच बैलगाडीतून शेताला गेलेली लोकं अर्ध्यानिर्ध्या वाटेत दिसू लागली होती‌. पायी चालणारी लोकं कलत्या सूर्याचा अंदाच घेऊन पावलं उचलीत वाटा छाटीत छाटीत गाव जवळ करीत होती. भोळ्या राजूच्या बकऱ्याही गावच्या दिशेनं येऊ लागल्या होत्या, साऱ्या आसमंतात वाटेनं चालणाऱ्या बकऱ्याच्या खुराची धूळ मागे उडत होती.

आम्हीही तवल्यागडचा डोंगर उतरून पायथ्याशी असलेल्या गावाकडच्या वाटेनं लागलो होतो. गावात सावत्या माळ्याच्या देऊळामध्ये होत असलेला हरिपाठ आता कानी पडत होता. सईद आणि अन्वर तो घोकित रस्त्यानं चालत होती

क्रमशः 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड