मुख्य सामग्रीवर वगळा

शिवना मायच्या कथा. भाग - ७

शिवना मायच्या कथा. भाग - ७

तवल्यागडचा डोंगूर आम्ही अर्धानिर्धा चढला अन् मला एकाकी धाप लागल्यासारखे झाले. शहराला गेलो तसं कष्टाची कामं कमी झाली अन् श्रम करण्याची सवय मोडल्या कारणाने  माझी ही अशी अवस्था झालेली होती.

आम्ही डोंगराच्या माथ्यावर पोहोचलो तिथून पत्र्याचा, कौलाच्या झोपडीच्या आकारांच्या घरांचा सारा गाव नजरीस पडत होता. गावाच्या जवळपास रानातल्या रानवाटा डोळ्यांना स्पष्ट दिसत होत्या. ज्या वाटांवर नजर फिरली की आमची नजर आपसूकच आम्हाला गावाजवळ, गावच्या वेशीजवळ घेऊन येत होती.

भली धाप लागल्याने मी हिरव्या गवतात बोडक्या बाभळीच्या पडसावली खाली लोळत पडलो होतो. सलीम दूरवर दिसणाऱ्या धरणपाळीवर भोळ्या राजूच्या चरणाऱ्या बकऱ्यांना बोटे डोळ्याच्या समोर धरून अनवरला दाखवत होता. ते दोघेही भोळ्या राजूच्या बोलण्याची नक्कल करत एकसोबत हातवारे करत मोठ्यानं हसत होते.

सलीम भोळ्या राजूच्या बोलण्यातले नेहमीचे वाक्य मोठ्यानं बोलत होता. जेव्हा जेव्हा त्याच्या बकऱ्या सरळ वाटेला चरायचे सोडून आडवाटेला शेतकऱ्याच्या रानात घुसायची तेव्हा तो जसं बकऱ्याना उद्देशून बोलायचा तसं सलीम बोलत होता.

हुरीयो केवढी ये..!
मायची केवढी. केवढी... केवढी... हुरीयो..!
केवढी..! केवढी...!
बारबापे शिधी वाटनी चालीये हुरीयो..! हुरियो.. केवढी...!

अगदी हुबेहूब सलीम भोळ्या राजूच्या आवाजात त्याची नक्कल करत होता. अनवर मोठ्या मोठ्यानं शिळ फुंकित हसत होता, मी ही गरबड्या हसू हसू लोळत होतो.

आमचा आवाज भोळ्या राजूपर्यंत गेला की काय म्हणून, तो तवल्यागडच्या डोंगराकडे बघत एक हात डोळ्याच्या वर घेऊन कोल्ह्यागत कुही ईक..! कुही ईक..! ओरडत होता.

या ओरडण्याचा मला अंदाज आला नाही पण सलीम अन् अनवर अजून मोठ्यानं हसायला लागले. कदाचित ते तिघे रानात ढोरं, बकऱ्या चारायला गेले की त्यांचा हा काही कोडवर्ड असेल बोलण्याचा.

बरच हसून खिदळून झालं अन् आम्ही डोंगराच्या सर्वात उंचावर असलेल्या दगडावर जाऊन गाव न्याहाळत बसलो. इतक्या उंचीवरून सर्व गाव अन् कोंडूर धरण संपूर्णपणे डोळ्यात मावत होते.

गावातले लोक वावरात कामं करताना दिसत होती,देऊळाच्या मोहरं असलेल्या पारावर असलेली गावातली म्हातारी माणसं ढवळ्या रंगाच्या कपड्याने डोळ्यांना नजरी पडत होती. डोंगरात भटकत असलेली कुत्र्यांची एक टोळकी त्यांनी पायांनी खणून केलेल्या छोट्याश्या भूयाररुपी घरात गारवा अनुभवत लोळत पडली होती.

अधूनमधून डोंगराच्या एका पल्याड असलेल्या हिरव्या दाटकंच रानातून मोरांचा आरवण्याचा आवाज येत होता. डोळ्यांना डोंगराच्या कपरीला असलेल्या झऱ्यांचे चमचमते पाणी गावात जाणाऱ्या नदडीला मिळेपर्यंत दिसत होते. 
हे सर्व बघत आम्ही निपचित शांत बसून राहिलो होतो.

आता अंगाला आलेल्या घामाचा वाऱ्यामुळे गारवा अनुभवायला मिळत होता. या वाऱ्याच्या झुळके बरोबर अजूनच छान वाटत होतं.
अन्वर आमच्या लहानपणीच्या उनाड आठवणी सांगत होता, आजही ते तिघे किती मज्जा करतात हे ही सांगत होता. मी माझ्या शहरातलं अन् गावातलं बकवास आयुष्य त्यांचा न जुळणारा ताळमेळ जुळवू बघत होतो.

आयुष्याला घेऊन मला नेमकं काय हवं आहे..? या प्रश्नाची वजाबाकी,बेरीज करत बसलो होतो. येणारी उत्तरे आणि होणारी जाणीव रडायला यावं इतकी वाईट्ट होती पण पर्याय नव्हता.

कारण माय, बापूने इतकी ढोर मेहनत घेऊन रात्रीचा दिवस करून आपल्याला, शिक्षणाला खूप सारा पैका खर्च करून शहराची वाट आपल्याला शिक्षणासाठी, नोकरीसाठी जवळ करायला लावली होती. अलीकडे गावाला आलं की बापूंच्या बोलण्यातून हे जाणवायचं की, लवकरच त्यांना मला माझ्या पायावर उभं झालेलं बघायचं होतं.

कारण त्यांनीही त्यांच्या उमेदीच्या काळात खूप कष्ट केले, त्रास सोसलेला होता. आता माझ्या आडून त्यांना सुखाचे दिवस बघता येईल असं त्यांना वाटत होतं, मी ही याच विचारांना डोक्यात घेऊन कालीज करून रातच्या शिफ्टला कंपनीत कामाला जात होतो. दोन पैसे यायचे त्यात माझं शहराला राहणं, खाणं भागून जायचे पण अजून माय बापूच्या डोक्यावरचे ओझे मी वाहू शकेल इतपत पैका कमावणारा मी झालो नव्हतो.

याच विचारात घंटाभर कसा निघून गेला कळला नाही अन् समीर, अनवरला मी बघतो तर ती दोघं लिंबाच्या झाडावर जाऊन बसून राहिली होती. भिंगोट्याची भिंगरी करून तिला फिरवत होती तिचा हेलिकॉप्टरसारखा येणारा भूनभुन आवाज ऐकून मी त्यांच्याजवळ गेलो अन् सलीमकडून मी ती भिंगरी घेऊन लिंभाऱ्याच्या झाडावर बसून तिला भिरकावीत राहिलो. 

डोंगरातील करवंद, आवळे, बिब्बे खाऊन दिवस कसा उतरणीला आला कळला नाही. दिवसभर डोंगरात केलेल्या भटकंतीमुळे परतीच्या वाटेला पाय पोटरीतून वर ओढू लागले होते. चालायची इच्छा होत नव्हती, पण अस्ताला जाणारा सूर्य जसा डोंगराच्या आड जाऊ लागला तश्या आम्ही घराच्या वाटा जवळ केल्या. घराच्या दिशेने गावाकडे निघालो.

पहाटेच बैलगाडीतून शेताला गेलेली लोकं अर्ध्यानिर्ध्या वाटेत दिसू लागली होती‌. पायी चालणारी लोकं कलत्या सूर्याचा अंदाच घेऊन पावलं उचलीत वाटा छाटीत छाटीत गाव जवळ करीत होती. भोळ्या राजूच्या बकऱ्याही गावच्या दिशेनं येऊ लागल्या होत्या, साऱ्या आसमंतात वाटेनं चालणाऱ्या बकऱ्याच्या खुराची धूळ मागे उडत होती.

आम्हीही तवल्यागडचा डोंगर उतरून पायथ्याशी असलेल्या गावाकडच्या वाटेनं लागलो होतो. गावात सावत्या माळ्याच्या देऊळामध्ये होत असलेला हरिपाठ आता कानी पडत होता. सईद आणि अन्वर तो घोकित रस्त्यानं चालत होती

क्रमशः 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...