मुख्य सामग्रीवर वगळा

'प्रांजल'आणि 'शरणागत् प्रपत्ती'

'प्रांजल'आणि 'शरणागत् प्रपत्ती' - डॉ.रमेश सुर्यवंशी.


गेले बरेच दिवस 'प्रांजल'आणि 'शरणागत् प्रपत्ती' या दोन कादंबऱ्या वाचण्याच्या विचारात होतो पण योग काही जुळून येत नव्हता. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात या दोन्ही कादंबरींबद्दल थोडक्यात सारांश कळाला. मग या दोन्ही कादंबरी वाचण्याची उत्सुकता, आतुरता अजूनच वाढली.

दोन दिवसांपूर्वी अखेर या दोन्ही कादंबरी मिळवल्या आणि यासोबतच अजून एक कादंबरी असे एकुण तीन कादंबऱ्या तीन दिवसात वाचून संपवल्या. दोन्ही कादंबऱ्या फार अश्या मोठ्या नाहीत, एकूण १२५-१२५ पानांच्या या दोन्ही कादंबऱ्या आहेत. त्यामुळे आपण सहज वाचून संपवतो.

कादंबरीच्या आतील लेखन त्यातील घटनाक्रम हे सर्व लिखाणात कैद करणारे लेखक 'डाॅ.रमेश सुर्यवंशी सर' ओळखीचे,जवळचे असल्याने हे सगळं वेळोवेळी त्यांच्याशी झालेल्या गप्पांच्या माध्यमातून ऐकून होतोच आणि त्यामुळे एक अनामिक उत्सुकता लागून होतीच.

काल सायंकाळी या दोन्ही कादंबऱ्या वाचून संपवल्या अन् मनात वाटून गेलं की याबद्दल आपण लिहायला हवं आहे.
तर 'प्रांजल' ही १२५ पानांची कादंबरी आपल्याला लेखकांच्या आयुष्याचा जीवनपट उलगडून दाखवणारी आहे. नकळत्या वयात वडिलांचं सोडून जाणं, घरी असलेलं अठरा विश्व दारिद्य्र, आईनं केलेलं काबाडकष्ट. मामांच्या घरी राहून लेखकांनी घेतलेलं शिक्षण, मग पुढे शिक्षण क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठीचा सरांचा संघर्ष.

कित्येक वर्ष अवघ्या महाराष्ट्रात नोकरीसाठी त्यांची भटकंती, कुठेही, कोणत्याही महाविद्यालयात नोकरी मिळवायला गेलं की बॅकलॉग शिक्षक पदावर मिळणारी सरांची नोकरी, दरवर्षी तीच मुलाखत, तेच वेग-वेगळे महाविद्यालये.
अन् जाती व्यवस्थेमुळे बरबटलेली महाविद्यालयातील संस्थाअध्यक्ष,मुख्याध्यापक,तेथील स्टाप यांचा सरांना झालेला त्रास. 

या प्रवासात सरांना मिळालेली काही चांगली माणसे,पुढे चालून आपल्याच घरातील कौटुंबिक कलह अश्या अनेक विषयांना घेऊन रेखाटलेली 'प्रांजल' ही कादंबरी आजच्या व्यवस्थेशी दोन शब्द करू बघणारी आहे.
जी आपण नक्कीच वाचायला हवी आहे. 

'शरणागत् प्रपत्ती' ही सरांची दुसरी कादंबरी खूप अनोखी अन् काळजात घर करणारी आहे. यात घडलेल्या काही घटना या काळाच्या सुसंगत अन् चालू काळाशी मिळत्या-जुळत्या असल्याने कादंबरी खूप जवळची अन् वास्तवाला भिडणारी भाष्य करू बघणारी आहे हे कळून येतं.

जेव्हा जेव्हा वास्तवावर,चुकीच्या गोष्टी चुकीच्या आहे हे कुणी सामान्य माणूस समाजाला पटवून देतो तेव्हा त्याच्यासमोर काही अतीसामान्य माणसे त्यांना कसे त्रास देतात अन् त्यांचा कसा कायमचा काटा काढायचा प्रयत्न करतात.हे सांगू बघणारी हे कादंबरी आहे.
एकाच घटनेतून अनेक पदर उलगडू बघणारी,ज्यामुळे तिच्याबद्दल कितीही लिहले तरी कमी पडेल.ती आपल्याला वाचूनच समजेल अशी ही कादंबरी आहे.

विश्वास पाटील मास्तर, सूर्या अण्णा, पथव्या, दगड्या, युसुफ, सर्जा तांगडे, मल्या, हौसा, द्वारकानाथ, आमदार तुका पाटील, पिरोजी, सोमु, देशमुख, भिजवाय, धनबोले, वडगांवकर, डॉ शिवदास पाटील, देवड्या, ॲड.भोसले अश्या  अनेक पात्रांच्या समवेत घडणाऱ्या घटना या कादंबरीत लेखकांनी कैद केल्या आहेत.

थोडक्यात लेखकांच्या लेखणीतून या कादंबरीबद्दल जाणून घेऊया आणि थांबूया.

'शरणागत् प्रपत्ती' प्रस्थापित हे सर्व दडलेले आहेत, छुप्या स्वरूपात !
तुमच्यात, आमच्यात, गावागावांत, प्रत्येक कार्यालयात, शासनात आणि सर्वच समाजात मग तर आदिवासी असोत की दलित बहुजन.

आदिवासींच्या उत्थापनात अडथळा आहे तो या प्रस्थापितांचा ! 
आदिवासी आणि प्रस्थापित यांचा हा लढा आहे. वर्ग कलह आहे !

आपल्या स्वतःच्या अस्तित्वासाठी,शासनाने दोन एकर जमीन त्यांनी दिली तर आपल्या शेतात कोण राबेल ? त्यांना आवास, सवलती, शिष्यवृत्ती, कर्ज, दिली तर आपणाशी ते बांधील कशासाठी राहील.
दोन रुपये कील गहू किंवा तांदूळ मिळत असतील तर तो रोज आपल्या शेतात का म्हणून राबेल ?

एका दिवसाच्या अडीचशे-तीनशे रुपयाच्या मजुरीवर महिनाभराचे शंभर-दीडशे किलो धान्य नाही भरणार,आदिवासींची पोरं शिष्यवृत्तीच्या जोरावर शिकून सवरून आरक्षणाचा फायदा घेत वरच्या पदावर नोकरीला जातील अन् आपली पोरं ?
ना शिष्यवृत्ती, ना आरक्षण, ना नोकरी ! ना दोन रुपये किलो गहू आणि तांदूळ !

आपली पोरं आपल्या शेतात राबतील तेही भाव नसलेल्या उत्पादनासाठी ! असे एक न अनेक प्रश्न या प्रस्थापितांच्या कुच्चर ओट्यावर सदा चर्चिले जातात अन् यातून सुरू होतो या आदिवासींसाठीचा साठमारीचा खेळ.

प्रत्येकातला हा प्रस्थापित जागा होतो अन् पेटतो संघर्ष, चौफेरून सुरू होते नाकाबंदी, या आदिवासींची !
अन् ते बनतात 'शरणात, अन् त्यांना पत्करावी लागते शरणागती प्रपत्ती !
या जळजळीत सत्यावर प्रकाश टाकला आहे,'डॉ रमेश सुर्यवंशी' यांच्या 'शरणागत् प्रपत्ती' या कादंबरीतून.
नक्की वाचायला हवी अशी ही कादंबरी.

Written by,
Bharat Sonwane .

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...