मुख्य सामग्रीवर वगळा

पोटाला पडणारा पीळ..!

पोटाला पडणारा पीळ..!

हल्ली मनात असंख्य गोष्टींचा माजलेला कोलाहाल बघितला की, अस्वस्थ व्हायला होतं. मग नकळत कधीतरी वाटतं की माणसांच्या सहवासातून मुक्त होऊन, आपण आपल्याला पूर्णपणे निसर्गाच्या सान्निध्यात स्वतःला स्वाधीन करून द्यावं,झोकून द्यावं.

कारण आजवर निसर्गानं तगतं ठेवलं, जीवंत ठेवलं आहे. अन् त्याच्या सान्निध्यात असलं की मला माणसांचा सहवास नकोसा वाटतो.

कालची सायंकाळ क्लास सुटला अन् हॉस्टेलच्या दिशेनं निघालो. हल्ली एकटाच असतो, त्यामुळं स्वतःच्या विचारांशी प्रामाणिक राहता येऊ लागलं आहे. मनाचं मालक असावं तसं जगता येतय.

मनाचा मालक म्हणजे मला नेहमीच निसर्गाच्या सान्निध्यात एकाकी राहून, एकाकी निसर्ग अनुभवण्यास जवळचं वाटत आलं आहे. जे नॉर्मल माणसांना रुचणारं नाहीये. मग अश्यावेळी कुणी सोबत असलं की, माझं आयुष्य जगण्याचं मी आखलेले गणित चुकायला लागतं. त्यामुळं असं एकटं एकटं राहणं पसंद करतो.

निसर्ग असला की फारसं कुणी जवळ करायला आवडत नाही मला. अनेक मित्रांनी हे हेरलं आहे. त्यामुळं ते ही जाणूनबुजून दूरच राहता. कारण या जगण्यात या कैफात सुख आहे, याची अनुभूती त्यांना कित्येकदा माझ्या समवेत आली. पण; त्यांचं मन इथ फार रमलं नाही. त्यांना व्यवहारीक जग, माणसांचं पशू होऊन जगणं जवळचं वाटलं.
मग त्यांनी माझ्या या वाटेवर चालणं सोडून दिलं, जे योग्य झालं. कारण तारेवरची कसरत करणं तसं जगणं सहज, सोप्पं नाही.

सायंकाळी क्लास सुटला आभाळ गरजू लागलं, अंधारून आलं. या गरजत्या आभाळाखाली असलेल्या एका बोडख्या बाभळीखाली असलेल्या एका बँचवर किती वेळ बसून राहिलो भरकटत जाणाऱ्या ढगांकडे बघत.

माणसं निवाऱ्याला निघून गेली होती अन् आता तो बरसण्यास उत्सुक होता. सभोवताली असलेली तीन कुत्रे गरजत्या आभाळाखाली खेळत होती. त्यांनी माणसांसारखं जगणं स्वीकारलं असावं कारण त्यांच्या जगण्यात कुठं पशू होऊन जगण्याचा लवलेश दिसला नाही.

दूरवर पाऊस बरसू लागला, जसा तो जवळ येऊ लागला तसा मी माणसात आलो. ते तीन कुत्रे आसऱ्याला म्हणून एका कंपाऊंडमध्ये शिरली. मी एका अंधाऱ्या गल्लीत खूप आतवर गेलो. 
इंग्रजांच्या काळातील एक जुनाट, काळवंडलेलं हॉटेल दिसलं इथे येणं नेहमी होतं.

पण इथे आलं की मी भूतकाळाचा होतो म्हणून वर्तमानात या हॉटेलचं फारसं लक्ष नसतं. हॉटेलमध्ये आलो बॅसीनमध्ये आरशात बघत हात धुतले. रापलेल्या चेहऱ्याचा एक इसम बिडी फुंकत माझ्या जवळून निघून गेला.
डोक्यात गेला पण विचार केला त्याचीही जगण्याची स्वतंत्र रीत असावी म्हणून हसून जाऊ दिलं. क्षणीक वेळात हा विचार मनात येऊन जाणं म्हणजे मी अजून माणसात आहे याची मलाच पोचपावती मिळाली असं काहीसं होतं. अधूनमधून हे होतं जे आनंद देणारं आहे.

काळोखात टेबल सापडत एका खुर्चीवर विसावलो. लाकडी खुर्ची, तीन गिल्लास, एक मोठा पाच गल्लास भरेल एव्हढा जग अन् समोर लंडन मधल्या कुठल्या ब्रीजचे पोस्टर चीपकवलेले होते. ते बघून मी त्यात माणसं न्याहाळू लागलो.

पुन्हा एक इसम आला माझी दीड कप चहा अन् तीन बनमस्का पावची ऑर्डर घेऊन गेला. चहा उंचावत कपात वरून टाकली अन् माझ्यासमोर आदळून पाव ठेऊन पुढे असलेल्यांना दोन भज्याच्या प्लेट ठेऊन निघून गेला.

अंधारात काय खात असतील हा प्रश्न पडला पण; नंतर कळलं की औद्योगिक वसाहतीमध्ये एका मोठ्या कंपनीत काम करणारी कंत्राटी कर्मचारी इथे कंपनीचं जेवण पैश्यात परवडत नाही म्हणून इथल्या नाशत्यावर भागवता. पोटाला पिळ देऊन आठ तास काम केलं  की साडे-तीनशे रुपये रोज येतो असं भजे खाणाऱ्या इसमाकडून कळलं. 

मी चहात पाव बुडून आजचा दिवस उद्यावर ढकलत होतो. तितक्यात पाऊस गरजू लागला, पडू लागला. मी लंडनमधील तो ब्रीज बघत उद्याचं वर्तमान नसलेलं स्वप्न बघत चहा पाव माझ्या आत रिचवत राहीलो.

Written by
Bharat Sonawane

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...