मुख्य सामग्रीवर वगळा

कंत्राटी कामगारांचं ओसाड वर्तमान ..!

कंत्राटी कामगारांचं ओसाड वर्तमान..!


भर दुपारची वेळ भर उन्हात दीड वाजता सेकंड शिफ्टसाठी जाण्याची तयारी करतोय. इतक्या कडक उन्हात पातळ, पतली भाजी खायला नको वाटते अन् कोरडी भाजी असली की जसं जोमाने दीड-दोन पोळ्या नरड्याच्या आत कोंबल्या जातात तसे काही करून जेवण आवरते घेऊन, मळकटलेल्या चादरीच्या कॉटवर पडून राहीलो आहे.

कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांच्या आयुष्याचं गणित खूप सोप्पं असतं. कारण त्यांच्या आयुष्यात फार काही बदल होत नसतात. घड्याळीच्या काट्यावर फर्स्ट, सेकंड, थर्ड करत त्यांचं आयुष्य चालू असतं.

सगळं व्यवस्थित चालू असलं की कसं बाईचं पाळी चक्र दर महिन्याला फिरत राहते अन् काही घडवून यायचं, आणायचं असलं की नऊ महिने नऊ दिवस एक जीव पोटात वाढवला जातो. तसंच काहीसं सगळं जुळून आलं की नऊ महिने कंत्राटी पद्धतीने ही कामगार माणसं एका कंपनीत काम करत राहतात.

मग जसं बाई मोकळी होते, तसं पुन्हा मोकळं व्हायचं. दोन महिने परत याच्या खाली त्याच्या खाली करत काम मिळवायचं. दोन महिने झाले की पुन्हा नऊ महिने, सहा महिने हे चक्र चालू असतं. जोवर हातपाय काम करत असतात किंवा तसं सुपरवायझरला वाटत असतं तोवर. एकदा हे वाटणं बंद झालं की वेश्यावस्तीत जशी एका उतरत्या वयात आलेल्या बाईची अवस्था होते तशी इथल्या कामगाराची अवस्था होते.

फरक इतकाच ती भटकत राहते गिऱ्हाईकांच्या सोयीनुसार अन् तो भटकत राहतो बंद पडलेल्या औद्योगिक वसाहतीत भोक पडलेलं गोणपाट घेऊन मळकटलेले कपडे घालून, वाढलेले दाढीचे खुंट, अन् मानेवर आलेल्या केसांना घेऊन भंगार जमा करत. बंद पडलेली औद्योगिक वसाहत तितकीच बेसूर भासत असते जितकं त्याचं जगणं असतं. 

एकीकडे यंत्रांची घरघर चालू असते, वेळेवर वसाहतीत भोंगे वाजत राहतात, स्फोट होत राहतात कित्येकजण जगण्यासाठी त्या आगीत पोळत राहतात अन् कित्येकजण हळूहळू रोज या भोंग्याच्या आवाजावर हळूहळू मरत राहतात. 

भकास,बकाल आयुष्य काय असावं तर हे असं. इतकं भयाण असावं का..? असं अनेकजण मला विचारून जातात. एखाददोन महिने हे यंत्रांच्या बटणावर चालणारं यंत्रवत आयुष्य जगून बघितलं की प्रचिती आपोआपच येते.

एकदा असं सहज इंटरवह्यूमध्ये बोलून गेलो होतो जे खरं होतं की शेतकऱ्यांच्या वाट्याला आलेल्या संघर्षापेक्षा कंत्राटी कामगारांच्या वाट्याला आलेला संघर्ष किंचित जास्तच असतो. समोरचा व्यक्ती हसून मोकळा झाला. भर दुपारच्या उन्हात एसीचा गारवा अनुभवणाऱ्या त्या साहेबांना शेतकऱ्याच्या नुकसानीची झळ अन् कंत्राटी कामगारांची आयुष्यभर चालणारी फर्स्ट, सेकंड, थर्ड शिफ्टची वारी त्याला कळली असती तर तो इतका कुत्सितपणे हसला नसता अन् आमची हकालपट्टी करून पैसे घेऊन पदावर माणसं भरून घेतली नसती.

असो पर्याय नाहीये आम्ही भटकत राहूत पायाने रांगोळी गिरवत राहूत औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या डांबरी वाटा ढवळ्या करत राहू..!

हे सगळं कसं मोकाट वाटणारं लिखाण भासत असावं पण; या जगण्याला सीमा नाहीये, तितकंच मोकाट हे आयुष्य आहे. फुकट नाही आयुष्याच्या शेवट हातावर मोजण्या इतपत लोकं सुस्थितीत जगतात कंत्राटी पद्धतीने काम करणारे कामगार.

असो आयुष्य आहे, मग काम आलं अन् काम आलं म्हणजे औद्योगिक वसाहत आली, दीड किलोचा सेफ्टी शूज आला. महिन्याच्या अखेरीस पगार झाला की दोन जोडी सॉक्स न घेऊ शकणारे कंत्राटी कामगार मी बघितले आहे. पर्याय नाहीये, जितकं दिसतं तितकं सर्व स्मार्ट नाहीये हे सगळं. चकपक दिसते, पंचतारांकित औद्योगिक वसाहत दिसते.

मर्सिडीज,फॉर्चूनर,होंडा सिटी,अमक्या धमक्या पॉश गाड्या कंपनीच्या आत दिसतात, कंपनीच्या गेट बाहेर गेटर आलेल्या टायराच्या सायकली, ऑईलसील फुटलेल्या, पन्नासचं पेट्रोल टाकीत असलेल्या टूव्हीलर बघितल्या की हे चकाचक औद्योगिक वसाहतीचं जग कितपत खरं खोटं हे कळून येतं.

बरच काही लिहायला आहे पण फर्स्ट, सेकंड, थर्ड करायचं म्हंटले की उसंत नाहीये अन् उसंत, वेळ असल तरीही आपलीच कैफीयत मांडायला हा काही डोंबाऱ्याचा खेळ नाही. 
लिहल कधीतरी तूर्तच थांबतो..

Written by
Bharat Sonawane .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड