मुख्य सामग्रीवर वगळा

दरवळ..!

दरवळ..!
हल्ली रोजची सायंकाळ अन् कधी मनाला वाटलं तर भर दुपारही अश्या धावण्याने होत आहे. का धावतो ? कश्यासाठी ? धावून काय भेटते ? या प्रश्नांना उत्तरं नाहीये. पण; एकदा धावायला लागलो की आठ-दहा किमी फक्त धावतच राहतो. हल्ली धावण्यात एक अनामिक सूख वाटायला लागलं आहे, धावणे माझ्यासाठी एक व्यसन झालं आहे.

जेव्हा मनाचा आदेश येतो की आता धावायचं चल तेव्हा मी धावायला सुरुवात करतो. अन् ; जोवर मनाला वाटत नाही की, आता थांबायला हवं तोपर्यंत मी धावतच राहतो.
धावण्यासाठी काही ठराविक मार्ग करून घेतले आहे. मग वेळेनुसार तर कधी मनाला योग्य वाटेल त्या मार्गानं धावतो. 

काल असच पाच वाजता धावायला सुरुवात केली. गौताळा अभयारण्याचा परिसर मी राहतो त्या शहराला लागून असल्यानं नेहमी या अभयारण्याच्या हद्दीत मी धावत असतो. कधीतरी डोंगरदऱ्या असलेल्या रस्त्याला तर कधी अभयारण्याच्या आतून जाणाऱ्या डांबरी रस्त्याला.

काल पहिला साडेचार किमीचा टप्पा पार झाला अन्  अभयारण्याच्या गेटवर थांबलो. कितीही धावलो किंवा नाही धावलो तरी इथे मी नकळत थांबून घेतो. कारण इथे मला माझ्या भविष्यातील हालचाली खुणावतात, सगळं सोयीस्कर झालं तर मी ही असाच कुठे भविष्यात राहील असं वाटून जातं अन् मोजून पाच-दहा मिनिटं इथे थांबणं होतं.

काल एकाकी धावत असताना अभयारण्याच्या गेटवर आलो अन् एक ओळखीचा दरवळ मला येऊ लागला. हा दरवळ आला की मला उन्हाळ्याची चाहूल लागते. या वर्षी हा दरवळ काल पहिल्यांदा अनुभवला पण हा सुगंध हा दरवळ कसला आहे हे आजवर मला कळून येत नव्हते.
काल या प्रश्नाचे उत्तर शोधायचे म्हणून मी तिथं रिलॅक्स होऊन शांतपणे गौताळा अभयारण्य न्याहाळत बसलो.

सध्या निसर्गात पानगळ सुरू असल्याने अनेकांना निसर्गात उदास उदास वाटत असावं पण माझ्याबाबतीत उलट आहे. मला ही झाडांची होणारी पानगळ अन् शुष्क वाऱ्यात अवघ्या अभयारण्यात भरकटणारी हे पाने बघायला त्यांच्यात माझं अस्तित्त्व शोधायला आवडते. म्हणून मी कितीही वेळ हा सर्व निसर्गाचा सुखद सोहळा अनुभवू शकतो.

तर तो दरवळ माझ्यापर्यंत येत होता. आजवर माझाही गैरसमज होता की हा दरवळ रातराणीच्या फुलांचा असावा पण काल हा गैरसमज दूर झाला. तो दरवळ असतो उन्हाळ्याची चाहूल लागली की करवंदाच्या जाळीला येणाऱ्या नाजूक पांढऱ्या शुभ्र फुलांचा. जास्मिंनची फुलं भासावी इतकी सुंदर अन् नाजूक ही फुलं दिसतात. काटेरी करवंदाच्या जाळीला ही फुलं अजूनच सुंदर दिसतात.

मग काय कालचं धावणं जरासं थांबलं कितीवेळ झाडांची होणारी पानगळ,त्या फुलांचा दरवळ अनुभवत बसलो. अभयारण्याच्या गेटवर येणारी - जाणारी लोकं मला वनरक्षक समजत असावी हे त्यांच्या नजरेतून कळून येत होतं. मी ही निवांत बसून सगळा गौताळा अभयारण्य नजरेत भरून घेत होतो. असं इकडे रोजच येणं होतं पण निवांत बसणं क्वचित कारण,धावण्याचं वेडखूळ मला इथे फार वेळ थांबू देत नाही.

दूर डोंगरातून मोरांचा अनेक पक्षांचा आवाज येत होता. हळू हळू दिवसभर आग ओकणारा सूर्य डोंगराच्या माथ्यावर अस्ताला जातांना दिसत होता, त्याला बघणं एक मनाला क्षणिक शांतता मिळण्याचं कारण ठरत होतं.

अस्ताला जाणारा सूर्य अस्ताला गेला अन् पुन्हा घराच्या वाटा खूनायला लागल्या.मग धावत राहिलो रोजच्या थांब्यापर्यंत येऊस्तोवर. मोबाईलवर बघितलं तर कालचं धावणं पूर्ण ९ कि.मी झालं होतं. 
इतकं धावूनही कुठला थकवा जाणवत नव्हता की कुठलं काही. आता पुन्हा आज गौताळा अभयारण्यात धावत इथे येऊन हे कालचं आज टाईप करत बसलोय..!
Written by,
Bharat Sonawane 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...