मुख्य सामग्रीवर वगळा

गाव अन् गावच्या आठवणी

गाव अन् गावच्या आठवणी..!


सकाळचा दहाचा सूर्य तळपत होता,तालुक्याचा पोस्टमन रानाच्या पायवाटेना बोडक्या टेकडीवर दहा-बारा घर असलेल्या ठाकर लोकांच्या वस्तीच्या दिशेनं सायकल लोटीत-लोटित येत होता.
लाल कापड,डोक्यावर लाल टोपी घातलेला तो अन् सायकलीला लाल पिशवी असलेली ती सायकल बहुदा पंक्चर झाली असावी...

मी टेकडीवर असलेल्या पाण्याच्या टाकीवर बसून होतो,टेकडी गावच्या उंचावर असल्याने पाण्याच्या टाकीवरून सारा गाव नजरी पडायचा.उन्हं असल्यानं अंगाची लाहीलाही होत होती पण अधून-मधून येणारी वाऱ्याची झुळूक काही काळ सुखाचा स्पर्श अंगाला करून जात असायची.

दहा बारा घरांची ठाकरवस्ती असलेल्या वस्तीमध्ये चार-पाच तरुण पोरं शहराला औषधीच्या कंपनीत कंत्राटी पद्धतीने काम करायची.दहा पाच खेट्या केल्यानंतर सरपंच्याचा ओळखीने यांना लावून दिलं होतं.कधी महिना-पंद्रादिला त्यांचं पत्र यायचं त्यांची ख्यालीखुशाली कळायची,आईबापसांला महिन्याकाठी शे-दोनशे रूपडे पोरं पाठवायची म्हणून त्यांच्या घरची लोकं तालुक्याचा पोस्टमनची वाट देवागत बघत राहायची...

म्या काय चार बुक शिकलो नसल्यानं मी काय करू शकत नव्हतो,मग दहा बारा शेरड्या घेऊन मी दिसभर त्यांना या बोडक्या टेकडीवर घेऊन चारीत हिंडायचो,चार बुक शिकलं असते तर म्यापण शहराला गेलू अस्तू...
लहानपणी शेरड्या घेऊन रानाला जायला आवडू लागलं,गावच्या लोकांच्या आठ दहा शेरड्या,माझ्या दोन घेऊन मी या बोडक्या टेकडीवर घेऊन यायचो.घरी खायला दूध होवून जायचं अन् महिन्याकाठी हजार पाचशे रूपडे मग कश्याला शहराला जायचं,शाळा शिकलू नाय अन्  शेरड्या वळत राहिलो...

आता काय ना धड वाचता येईना झाले,शहराला ओळख मोप आहे पण फायदा काय आपलंच नांणं खोटं..! अशी गत झालीय माझी.
मलाही वाटतं चार-दोन पत्र लिहावी,गावच्या दोस्तांची विचारपूस करावी पण कसं लिहणार अडाणी जो राहिलो.मग काय आपली शेरडं अन् आपण पहाटच्याला निघालं की दिसभर सारे रान कोळपायचे सांच्याला आपलं घर भले अन् आपुन भले...

तालुक्याचा पोस्टमन बाबा एरवी सायकल लोटीत लोटीत टेकडीवर आला होता.मी पण टाकीवरून खाली आलो,पत्राचा गठ्ठा काडून त्यानं मला काही दहा-बारा नावं पुसली कोणी वस्तीला रहात होतं,कुणी गावात सारी पत्र लावून पोस्टमन बाबा मला म्हणाला पाणी दे तो का व थोडंसं..?
मी पिशितली शिशी काढून त्याच्यासमोर धरली,शिशीला चहकडून पोतडे गुंडाळले असल्यानं शिशीतले पाणी गार होतं.गटगट पाणी पिवून पोस्टमन बाबा शिशी देत मला म्हंटला कितवी पहूर शिकलासा..?
मी खाली मान घालत हाताची दोन बोटं दाखवत म्हंटल दुसरी पहूर...

पोस्टमन बाबा म्हंटला
मग एक,दोन येत अस्तीला..?
येत्या की शंभर तक येता पुढं नाय..!
पुढं का नाय येत रं लका..?
पुढं काय करायची पोस्टमन बाबा माझी दहा-बारा शेरड मोजत्या आली बहुत झालं..!

पोस्टमन बाबा हसला अन् शिवजी आप्पाच्या कुडाच्या झोपडीकडे निघून गेला...
सायकल पंक्चर होती,बाबा ती लोटीत होता मी दूरवर जास्तोवर त्याला बघत राहिलो,तो चालत होता,चालत होता..!
आता त्याचा लाल सदरा,लाल टोपी,लाल पिशी लाल टिपक्यागत दिसत होती...

Written by,
Bharat Sonwane

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...