मुख्य सामग्रीवर वगळा

JNV च्या आठवणी...


JNV च्या आठवणी...

भर उन्हाळ्याचे दिवस असायचे,सकाळची उन्हं सायकल चालवत असतांना पाठीशी पाठीवर पडायची अन् डोक्यातून घामाच्या धारा चेहऱ्यावर येऊ लागायच्या.
नदी,नाले,छोट्या-मोठ्या पाऊलवाटा पार करून दोन तासात सायकलच्या कॅरीयरला लावलेली दोनशे पेपर वाटून संपायला यायची.चड-उताराच्या लाल मातीच्या फुफाट्यात असलेल्या रस्त्यानं मग शेवटची नऊ-दहा पेपर टाकण्यासाठी दीड-दोन कि.मी.सायकलवर भटकंती व्हायची...

उन्हाळ्यात जवाहर नवोदय विद्यालयास सुट्टी लागली की तीच पेपरची संख्या तीन-चार पेपरवर येऊन जायची.मलाही नवोदयमध्ये जाण्यास कारण लागायचे म्हणून मी ही जायचो ते तीन चार पेपर घेऊन.
कारण का लागायचं..? येथे असं काय होतं ज्यासाठी मी इतका भटकंती करून शेवटचे पेपर नेमके या नवोदयमध्येच का टाकायचो..? किंवा पहिले पण टाकू शकत होतो मग शेवटच का..?

यालाही खूप कारणे होती,संपूर्ण पेपर टाकली की नवोदय विद्यालयात प्रवेश केला की रस्त्याने चढण लागायची.नवोदय विद्यालय आतील रस्ता संपूर्ण डांबरीकरन केलेला होता,रस्त्याच्या दोन्ही बाजूंना निळी-पिवळी फुलांची झाडे होती,गुलमोहराची झाडं होती,उन्हाळ्यात या रस्त्यांनी जातांना या सर्व झाडांची फुलं रस्त्यानं पडलेली असायची...

रस्त्याने संपूर्ण चहड असल्याने अन् उत्तरेला नवोदयच्या भिंती पलिकडे टेकडी,मोकळा परिसर असल्यामुळे चढ चढून जातांना सुद्धा गार हवा शरीराला अनुभवयाला यायची.घामाचे ओघळणारे थेंब अश्यावेळी शरीराला सहज जाणवायचे अन् एक सुखद गारवा त्यावेळी अनुभवयाला मिळायचा.इतक्यावरच थांबुन चालणार नाही काही ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या बाजुला मेहंदीची दाट झाडी होती,निलगिरीची उंच-उंच झाडं होती,यांचा सुगंध तर आजही नाकात दरवळतो....

झाडांना सतत पाणी पुरवठा म्हणून रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या बाजुला ठिबक सिंचनाच्या लांबच लांब दोन नळ्यांनी प्रत्येक झाडाच्या खोडापाशी पाणी सोडलेले होते,त्यामुळं अजूनच गारवा अनुभवयाला मिळायचा.रस्त्याच्या एका वळणाला छोटासा पुल होता,तिथं ठरवून पाच-दहा मिनिटं बसून गुलमोहराच्या झाडाची सावली अनुभवयाला अन् आजच काम संपलं हे अनुभवयाला छान वाटायचं.रोजचा होणारा हा प्रवास यात कुणीही नसलेला सोबती अन् माझ्या या छोट्याश्या विश्वात खूष असलेलो मी.वय काही नाही बारा-तेरा वर्षाचा असेल जेमतेम तेव्हा पण छान वाटायचं हे सर्व रोज अनुभवणे...

मग नवोदयच्या विद्यालय असलेल्या इमारती जवळ आलं की तिथे टाकलेल्या लाकडी खुर्चीवर बसून रजिस्टरवर आपल्या नावाची एंट्री करणं नाव,आत येण्याचे कारण,किती वाजता आत आलो हे लिहणे,सही करणे खरंतर याची रोज येणाऱ्या आमच्या सारख्यांना काहीही एक गरज नव्हती.पण जेव्हा माझा हा प्रवास कायमचा इथे येण्याचा बंद होईल तेव्हा आपलीही या नवोदयच्या विश्वात कुठेतरी रोजची केलेली एक नोंद असेल,आठवण असेल म्हणून मी हे सर्व इथे लिहायचो...

पाणी प्यावेसे वाटले तर पिवून घ्यायचं अन् मग निघायचं रस्त्याच्या बाजूला असलेल्या रेतील्या पाऊलवाटेनं सायकल चालवत,मुलींच्या हॉस्टेल पलिकडे असलेल्या शिक्षकांच्या क्वार्टरमध्ये रस्त्यानं असलेली असंख्य बदामाची,जांभळाची झाडं इकडे लागायची.पहिला पेपर टाकला की नवोदयची ही इमारत न्याहाळत चालायचं सायकलवर,रोज काय बघायचं इतकं त्या इमारतीला या प्रश्नाचं माझ्याकडेही उत्तर नव्हतं,आजही नाही...

आजही कधीतरी गेलो की मी त्या सर्व इमारती न्याहाळत असतो बारकाईने,पुन्हा वळणे घेऊन नवोदयच्या एका खालच्या कोपऱ्यात काही शिक्षकांचे पेपर सायकल एक ठिकाणी सायकल लावून पायी चालत टाकायचे.पुन्हा इथून वरती बॉईज हॉस्टेलकडे वळायचं,रस्त्यात कॅन्टीन लागायचं तिथं मिळणारी चहा,दूध आजही आठवणीत आहे...

मग निलगिरीच्या झाडांच्यामध्ये असलेलं निलगिरी हाऊसमध्ये काही शिक्षकांचे पेपर चालू सायकलवर टाकायचे मग पुन्हा अजुन वरती जावून नवोदयच्या सोबतच शहराच्या उत्तरेकडील शेवटच्या घरात पेपर टाकून परतीच्या मार्गाला लागले की निवांत सायकलवर बसून राहायचे.सायकल उताराच्या दिशेने चालत राहायची,आपण अंगाला स्पर्श करून जाणारा वारा अनुभवयाचा अन् पुन्हा वापस जाताना रजिस्टरवरती एक एन्ट्री करून गुलमोहर,मेहंदी या झाडांच्या समवेत सायकलवर बसुन नवोदयच्या बाहेर पडायचं...

क्षणिक सुखाचा आनंद असायचा हा जो रोज अनुभवयाला भेटायचा...

ठिकाण- जवाहर नवोदय विद्यालय,कन्नड.औरंगाबाद.

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...