मुख्य सामग्रीवर वगळा

गावकुसाच्या आठवणी

गावकुसाच्या आठवणी..!

पहाटेची कोवळी उन्हं अंगावर घेत असतांना चार वर्षांपूर्वीचा तो दिवस आठवतो.तेव्हा मी एका फार्मा कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून काम करत होतो,साधारण दोन महिने झाले होते कंपनी जॉईन करून.नेहमीप्रमाणे सकाळच्या फर्स्ट शिफ्टसाठी मी कामाला गेलो,काम सुरू झाले.साडेअकराच्या सुमारास जेवायला जायचं म्हणून मी प्रॉडक्शन्स डिपार्टमेंटमधून आमच्या प्रॉडक्शन मॅनेजर,सुपरवायझर,माझ्यासारखी तिघे कॅजूअल वर्कर यांच्या सोबतीने जेवायला निघालो..!

फार्मा कंपनी म्हंटले की तिथे बऱ्याच डिपार्टमेंटमध्ये एसी कम्पल्सरी असतो किंवा कमीतकमी बाहेरच्या तापमानात आणि डिपार्टमेंटमध्ये असलेलं तापमान यात खूप फरक असतो,आतील तापमान हे बाहेरच्या तापमानापेक्षा  खूप कमी असते.तर ते उन्हाळ्याचे दिवस होते,आम्ही जेवणाची सुट्टी केली सर्व उपकरणे बंद करून आम्ही सहा जण बाहेर "प्राईमयरी एरिया अँड ड्रेस चॅंजिंग रुम"मध्ये आलो,कंपनीचा विशेष युनिफॉर्म मी बदलवला आणि फ्रेश होवून ब्लॉकच्या मेन गेटवर आलो..!

कुठल्याही फार्मा कंपनीत गेले की तिथे शिस्त खूप महत्त्वाची असते,नियमांचे पालन करणे खूप महत्त्वाचे असते.मेन गेटवर आलं की तो विशेष गेट असतो जो उघड-बंद केला की आपल्या संपूर्ण शरीरावर वरून हवेचा मारा केला जातो जेणेकरून आपल्या कपड्यांवर,शुजवर थोड्या प्रमाणात असलेली धूळ,डोळ्यांना न दिसणारे जिवाणू त्यामुळे बाहेर फेकले जातात..!

तर मी तो गेट उघडून बाहेर आलो अन् एकदमच आतील थंड तापमानातून मी बाहेरच्या उन्हाळ्याच्या खूप उष्ण तापमानात आल्यानं मला चक्कर आल्यासारखे झाले अन् मी त्या ओट्यावर चक्कर येऊन पडलो.पुढे काही क्षणांत कंपनीची Ambulance आलेली अन् मला कंपनीतल्या छोट्याश्या दवाखान्यात घेऊन गेली.काही प्रथमोपचार करून मला गोळ्या देऊन कँटीनमध्ये जेवणास घेऊन गेले आणि जेवण करून त्या दिवशी मला सुट्टी देऊन त्या दिवशी आराम करण्यास सांगितले..!

आज हे सर्व आठवण्याचे कारण हेच की अलीकडे दिवसेंदिवस वाढणारा तापमानाचा पारा.असं नाही की मी खूप नाजूक आहे शेतात या उन्हाळ्याच्या दिवसात दिवसदिवस लोकांच्या इथे रोजाने मक्का सोंगण्याचे काम मी केलं आहे,शेतात असलेली मेहनतीचे कामे मी केली आहे.परंतु येथील तापमान असो किंवा निसर्गातील हवा याचा कुठेतरी फरक पडतो इतकेच.पण हा अनुभव छान होता म्हणजे फार्मा कंपनीत एका सामान्य कामगाराची किती काळजी घेतली जाते हे तेव्हा किंवा त्याच्या आधीच मला कळलेले होते.त्यामुळेच फार्मा क्षेत्र आजवर माझं आवडतं क्षेत्र आहे काम करण्यासाठी..!

तर दिवसेंदिवस उन्हाचा वाढता पारा गावाला गेलं की दुपारच्याभरी गावात चक्कर टाकली की गाव शांत निपचित पडलेला असतो धरणीमातेशी,कुणी म्हातारे फेटा घालणारे आजोबा फेट्याची उशी करून देऊळाच्या सभामंडपात निपचित शांत झोपलेले असतात.जोडीला त्यांचा पिढीचे त्यांचे मित्र पडल्या पडल्या गप्पा हानीत असता..!

गावातली लग्नकार्य यावर्षी जोमात असल्यानं शेजारच्या माळ्याच्या मंगलकार्यात एक दिवस खाडा न होता भर उन्हात दुपारची लग्नं लागून राहिली आहे.वऱ्हाडाच्या पंगतीच पंगती जेवण करून उठून जात आहेत,गावात नवरदेवाच्या मिरवणुकीचा डीजे अन् त्याच्या तालावर त्याची दारू पिऊन थिरकणारी मित्र त्यांच्यातलाच कुणी रुसवा आल्यानं गावच्या वेशीला लागून असलेला नधडीत बेश्रमाच्या जाळीत गुतून पार उताना पडला आहे..!

गल्लीत जसजसा डीजे येतोय तसतसं गल्लीत माड्या असलेल्या घरातल्या तरुण पोरी अन् नुकतच लग्न झालेल्या सूना नवरदेवाचे गुनगान गात आहे.तमक्याच्या पोरीनी नशीब खोललं इतक्या मोठ्या घरात नांदायला चालली आहे म्हणून गावातल्या सतरा गप्पा आवरता आवरत नाहीये.काही जगाच्या विरहित काम करणाऱ्या बायकांचे पापड,कुरडया करण्याचे अन्  वऱ्हाडातील बेवड्या पोरांना नाव ठेवण्याचे कार्यक्रम सोबतच चालू आहे..!

गावातली तरुण पोरं आपल्या लग्नाला कुणी यावं म्हणून बळजबरी बायकांच्या पंगतीत वाढत हिंडत आहे,इकडं माणसांना प्यायला पाणी नाही.जमरू आण्णाला या सगळ्यांशी काही घेणंदेणं नाही.पहिल्या पंगतीला जेवण करून तो त्याच्या खपुड्या घेऊन त्यांना रानात चरायला घेऊन निघाला आहे..!

गावची राजकारणी मंडळीतील एकजण नवरीच्या बापाला सांगत आहे,दाजी लग्नाचा बार भारी उडीवला अन् आहेर न करता टावेल टोपी घेऊन तो त्याच्या फॉरव्हीलरमध्ये आमदार साहेबांची मीटिंग आहे असं खोटं सांगून गावच्या फाट्यावर असलेल्या बारवर प्यायला निघाला आहे चार लोकांना घेऊन.तितक्यात एक कार्यकर्ता आला अन् म्हणतो कसा साहेब एक फोटू होवू द्या..!

गावच्या लोकांच्या जगण्याच्या अनेक तऱ्हा आहे भाऊ गाव धड घोड्यावर चालू देत नाही अन् पाईही चालू देत नाही..!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...