मुख्य सामग्रीवर वगळा

"जय भीम" या नाऱ्याशी जोडलेली गावची एक आठवण..!

"जय भीम" या नाऱ्याशी जोडलेली गावची एक आठवण..!


भर दुपारची उन्हं,दुपारची ठरलेली कामे आवरली अन् एका कामानिमित्त आज माझं गाव (आमची शेती-वाडी असलेलं माझं गाव) जवळ केले. गावातली कामे आटोपून परतीच्या वेळेला रिक्षा स्टँडवर येऊन बसलो..!

नेहमीच स्वतःची गाडी सोबत असल्यानं,अलीकडे वर्षानुवर्ष इथे कधी फारसे थांबणे होत नाही.आज नेमकी सोबत गाडी नसल्यानं वाट बघत बसलो कितीवेळ रिक्षा लागण्याची..!

रिक्षा कधी लागते हा विचार करत जवळच्या एका लोखंडी बाकावर वाट बघत बसलो होतो.भर दुपारची उन्हं असल्यामुळे रिक्षा अन् काही ठराविक प्रवासी सोडले तर कुणीही नव्हते रिक्षा स्टँडवर..!

रस्त्यानं येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्यांना मी न्याहाळत होतो.रिक्षा स्टँडवर तासंतास रिक्षाला कधी सीट मिळेल अन् कधी एकदाचे मी इथून निघेल असे मला झाले होते.हा सर्व विचार करत असतांना बालपणीचे दिवस डोळ्यांसमोरून तरळून गेले..!

लहानपणी शेतातून आलं की या रिक्षा स्टँडवर येण्यासाठी आम्ही पायीच शेतातून निघावे.आईच्या कड्यावर छोटी बहीण,हातात पिशवी अन् आम्ही दोघं भाऊ पांदीने चालत चालत शेतापासून रिक्षा स्टँडपर्यंत दोन अडीच किमी दूर असलेल्या वाटेनं पायी पायी चालत यायचो..!

आलो की इथे कितीवेळ रिक्षा भरेपर्यंत बसून राहायचो,येणारे-जाणारे लोकं न्याहाळत रहायचे.
तेव्हा आमचे कुठले पैसे घ्यायचे रिक्षावाले आम्ही फुकटच बसायचो त्या रिक्षामध्ये.फक्त आईचे तितके पैसे घेत..!

शेतात नेहमीचं येणं असायचं म्हणून सगळे रिक्षावाले,कमांडर जीभवाले तेव्हा ओळखीचे झालेले.त्यामुळे अंधार पडला तरी घरी व्यवस्थित आणून सोडायचे,सकाळी रस्त्यावर आमची वाट बघत बसायचे.आता त्यांच्यातले कुणीच दिसत नाही किंवा त्यांची रिक्षा,जीभही नाही दिसत..!

नंतर शाळा,कॉलेज या व्यापात आमचे गाव दूर झाले ते आजवर.अलिकडे कित्येक दिवस शेताच्या गावाजवळ असलेल्या गावाला नोकरी करत होतो पण तेही सोडले अन् गेले तीन वर्ष गावाशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटला तो तुटलाच.काही कामानिमित्त आले की तितकेच येणं होतं गावाला आता फार असे नाही..!
मी बसलेलो होतो बसल्या ठिकाणी हे सर्व आठवत होते,उन्हाचे सीट काही येत नव्हते.रिक्षा काही धकत नव्हती पण माझे चालू होते आपलं निरीक्षण करणे..!

उद्या १४ एप्रिल महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती.गावच्या रिक्षा स्टँडसमोर साहेबांचा उभ्या अवस्थेत असलेला पूर्णाकृती पुतळा गावात बांधलेला आहे.गावच्या वेशीवरच हा पुतळा असल्यानं गावात जायचं म्हणजे साहेबांच्या या पुतळ्यास वंदन करून जाणे होते..!

संविधानाचे पुस्तक हाती,सुटाबुटात असलेल्या माझ्या साहेबांचा हा उभ्या स्थितीत असलेला हा पुर्णाकृती पुतळा,गावची शान आहे.गावाला खूप मोठा इतिहास आहे पण गावातले लोकं तो विसरून गेली असावी अशी जाणीव अलिकडे नित्याने होत असते..!

"जय भीम" हा नारा सर्वप्रथम कुठे दिला असेल तो आमच्या गावालगत असलेल्या "मक्रणपूर" या गावात.१९३८ साली "औरंगाबाद" जिल्ह्यातील "कन्नड" तालुक्यातील "मक्रणपूर" या गावी "भाऊसाहेब मोरे" या आंबेडकर चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी एक सभा भरवली होती..!

या सभेत स्वतः डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा उपस्थित होते.त्या सभेत "भाऊसाहेब मोरे" यांनी सांगितले की यापुढे आपण एकमेकांना अभिवादन करत असतांना "जय भीम" म्हणत जावू अन् तेव्हापासून "जय भीम" हा नारा देश-विदेशात दिला जातो..!

उद्या साहेबांची जयंती त्यामुळे रिक्षा स्टँडसमोर असलेला या साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला रंगरंगोटी करणे चालू होते.निळा ध्वज बदलून नवीन लावण्यात आलेला होता,सभोवतालच्या प्रांगणात रंगरंगोटी करणे चालू आहे..!

भर दुपारच्या तळपत्या उन्हात हे सर्व खूप मनापासून ती तरुण माझ्या वयातली मुले करत होती,मी हे सर्व न्याहाळत होतो. अन् जुन्या आठवणीत रममाण होवून हे सर्व आठवत होतो..!

मला आठवते लहानपणी लवकर रिक्षा लागली नाही की भर उन्हात सावलीच्या आश्रयाला म्हणून साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या पायाशी सावलीत बसून राहायचो,कधीतरी झोपूनही जायचो..!

गाव दूर केला,शहर जवळ केला.गावाच्या फक्त आठवणी राहिल्या अन् आता शहर ओळखीचे झाले.परंतु साहेबांचे तेव्हा मनावर बिंबवलेले विचार मात्र आजही मनावर तितकेच राज्य करत आहेत.हे सर्व खूप सुंदर आहे..!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...