मुख्य सामग्रीवर वगळा

रातराणीचे फुल..!

रातराणीचे फुल..!

पहाटेची कोवळी उन्हं अंगावर घेत विंडोग्रीलच्या पडद्याशी माझे अन् उन्हाचे खेळ चालू होते,मी ही सावलीशी खेळत बसलो होतो.खिडकीत असलेला रातराणीचा वेल बहरलेला आहे,त्याची रात्रीच उमललेली फुलं पहाटे सकाळीच सुखून पायाशी लोळण घेत चहूकडे सर्वदूर घरात पसरलेली आहे.

रात्रभराचा त्यांचा घरात असलेला सुगंध अन् पहाटेला अंगणात फुललेला प्राजक्त अन् त्याचा सुगंध हा खेळ मला माझ्या लेकीचा घरात ये-जा करत सर्व घरात घिरट्या घालत दुडू दुडू फिरणाऱ्या तिच्या पावलांच्या खेळाप्रमाणे भासतो..!

तशी ती आज गेल्या पावली खूप दिवसांनी तिच्या आजोळी पुन्हा येऊन गेली,पोलकं अन् केसांचा एक जिठ्ठु घालणारी लेक आता खूप मोठी भासायला लागली आहे.मामाच्या सवयी तीन वर्षांच्या लेकीला आता कळायला लागल्या आहे,त्यामुळं मामाने तिला तिच्या कलाने घ्यायला हवं तर ही तीन वर्षांची लेक आता तिच्या कलाने मामाला समजावते,लाड करून घेते..!
तिच्या आई इतकीच किंवा किंचित जास्तीच समजदार निघाली असे भास होतात हल्ली तिच्या वागण्या बोलण्यातून..!

गेल्या पावली आज पुन्हा आजोळी आली आजीच्या अंगणात असलेल्या तुळशी वृंदावनाला घिरट्या घालू लागली तिच्या घुंगरांच्या पैंजनांचा आवाज रातराणीच्या सुगंधाप्रमाणे दरवळत माझ्यापर्यंत आला अन् लेक आली कळलं तसं तिला अलगद उचलून घेतलं अन् आता तिला मामाच्या कड्यावर आकाश ठेंगणं झालं होतं,आकाश अंगण एक झालं होतं,आकाशाशी ती गोष्टी करू लागली होती..!

एरवी सर्व घरात जिथली वस्तू तिथं अन् सर्व कसं नियमबद्ध असल्यासारखं असतं पण आज लेक आली अन् लंका झालेल्या घराचं गोकुळ करून गेली,लहान मुलं असावी प्रत्येक घरात ती याचसाठी.पैंजण घातलेले तीचे गोड पाय आज सर्व घरात छून-छून करत घिरट्या घालत होते मी न्याहाळत होतो तिला,कधीतरी मामाला बघून पडवीत लपून मामाला शोधायला बोलावणं तर कधी मामाच्या मागून येऊन डोळ्यांना नाजूक हातांनी बंद करत मी कोण आहे म्हणून प्रश्न करणं..!
हे सुख अनुभवायला लेक हवी असते..!

सांज झाली अन् परतीच्या वाटा खुणावू लागल्या,उद्याचे व्यवहार खुणावू लागले.तिचाही नको जायला म्हणुन चेहरा हिरमुसला अन् मला तर तिनं नको जाणं हवं होतं पण लेकीचे माहेरपण हे काही दिवसांचे तिला या वाटा काही घटकांसाठी खुल्या होतात अन् काही घटकांसाठी पुन्हा परतीच्या प्रवासाला निघायला म्हणून खुल्या होवून खुणावू लागतात,उद्याचे कामे मग डोळ्यांना दिसू लागतात..!

दिवसभर सगळ्या घरात बागडून सांजेच्यावेळी झोपाळ्यावर झोपलेली लेक नको असतांना मग उठवावी लागते,तिला हवा असणारा मामाच्या हातांचा गंद-पावडर,टिकली होते,मामाच्या हाताने तिचे कुरळे केस फणीने विंचरून होतात,शिट्यांची बुटं पायात घातली जातात अन् परंतु दिवसभर सर्व घरात फिरून-फिरून पैंजनातील घुंगरू अस्ताला जाणाऱ्या सुर्याच्या कलेप्रमाणे निपचित शांत होतात..!

लेक पुन्हा आईच्या कड्यावर झोपी जाते,गंद पावडर केलेली लेक यावेळी विश्वातील सर्वात गोड लेकरू भासत असते.मी हातात बॅग घेऊन दारापर्यंत येतो पुन्हा झोपी गेलेली लेक,तिची आई सासरची वाट जवळ करायला म्हणून निघून जाते..!

आता अंगणात पडलेला प्राजक्तांच्या फुलांचा सडा सुखून गेलेला असतो,तितकाच जितका लेक गेल्यामुळे माझा चेहरा सुखलेला असतो.मी येरझऱ्या घालत असतो विंडोग्रीलच्या खोलीत अस्वस्थ वाटू लागत असतं,सूर्यही अस्ताला गेलेला असतो अन् रातराणीच्या फुलांचा सुगंध आता चहूकडे पसरलेला असतो..!

जसजशी रात्र सरत असते तसतशी रातराणीच्या फुलांची कळी खुलत असते अन् मी चिमणीच्या उजेडात सावलीशी खेळ करत भिंतीवर आलेल्या माझ्या प्रतिबिंबात माझ्या लेकीचा हात जो डोळ्यांवर असतो तो शोधत असतो..!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...