मुख्य सामग्रीवर वगळा

औद्योगिक वसाहती अन् बरच काही..!

औद्योगिक वसाहती अन् बरच काही..!

सायंकाळ झाली की अस्ताला जाणाऱ्या सूर्याबरोबर माझं नॉर्मल आयुष्य मला अजूनच गुंतागुंतीचं वाटू लागतं. मग मी काळोखाला जवळ करत भटकत राहतो खाचखळगे असलेल्या आडवाटांना. शहरे ओळखीची झाली, काही अंशी शहरातील माणसंही ओळखीची झाली.

पण मला का कुणास ठाउक यातील कुणालाच जवळ करावंस वाटलं नाही,का.? हे गणित न उलगडणारे होते. शहरातील माणसं अन् त्यांच यंत्रवत असणं किंवा तसं आयुष्य जगणं मला नेहमीच जिव्हारी लागणारं होतं. पण पैसा माणसाला अक्कल शिकवतो अन् मग मी ही या यंत्रवत आयुष्याचा बळी पडलो.

होत काही नाही,
बस सेकंड शिफ्ट करून फ्लॅटवर आलं की, येताना औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या यंत्रांची घरघर अंगावर येते. आयुष्याला कंटाळलेले अन् गावाकडे पर्याय नाही म्हणून शहरात आलेल्या तरुणांचे रातदिवस अनवाणी पायांनी चालून, सेफ्टी शूजच्या पावलांनी गुळगुळीत झालेले रस्ते जवळची वाटू लागतात.

ऐन तारुण्यात लग्न जुळेना म्हणून गावच्या बक्कळ पोरांनी शहरं जवळ केली, पोरींच्या बापांनी पोरांची ही चालही ओळखली आणि पोरांचे जुळता जुळेना. 
मग अश्यात अनेकजन दारूच्या आहारी गेली, अनेकजण रात्रंदिवस १२-१६ तास ओव्हर टाईम काम करून छातीची खपाटी दिसेपर्यंत काम करत राहिली. काहींनी वेगळाच मार्ग अवलंबला. 

त्या वाटेला आजवर जाणं आलं नाही. पोरांनी वसाहतीच्या दोन कोस दूर असलेल्या विशेष भागात जाऊन आपली शरीराची भूक भागवली. पहाटेच फर्स्ट शिफ्टला जातांना पोरांनी तीच निरोधं रस्त्याच्या कुपाटीला फेकून दिली. येणारी-जाणारी प्रत्येक स्त्री,प्रत्येक पुरुष ती न्याहाळत राहिली. 

बेक्कार आयुष्य काय असावं यापेक्षा. १२-१६ तास ओव्हरटाईम काम करून छातीची खपाटी झालेली ही पोरं बघितली की, त्यांचं हे असं रोजचं थोडं-थोडं मरणं बघून आयुष्याला घेऊन आपण किती सिरियस विचार करतो हे कळून येतं. 

माझ्या वयाची पोरं याच मार्गाला जाऊन ऐन पंचविशीत अर्ध आयुष्य जगून बसली. जी नाही ती अजमावून, जी नाही ती संगत करून बसली. आम्हाला अजूनही "नामदेव ढसाळ" यांचा "गोलपिठा" अंगावर येतो.

संवेदनशील माणसांचं असच असावं असं हल्ली वाटू लागलं आहे, आणि हेच बरं असंही वाटून गेलं. कारण दोन-चार सालापूर्वी भर वसाहतीत भोसकून दिलेल्या मुलाला बघितलं. तेव्हा माणसं कुठल्या थराला जातील याचा अंदाज येऊन गेला.
अन् मी अंतर राखूनच राहू लागलो या शहराच्या लोकांपासून, नाईलाज म्हणून आलेल्या गावच्या या तरण्या पोरांपासून.

असो चौथ्या मजल्यावरील फ्लॅटमधून शहर न्याहाळत असलो की जवळच असलेल्या एअरपोर्ट मधून जाणाऱ्या विमानाला हात लावासा वाटतो. त्याच्या आत बसावं वाटतं पण नशीब कुठलं आपलं, असो माणसच बसतात त्याच्यात पण तीही शहराकडची म्हणून तेही हल्ली नकोसं वाटतं. त्याची चमकणारी लाईट दूरपर्यंत जास्तोवर बघत रहायला डोळ्यांना आवडतं हल्ली.

काल मेसवाल्या ताई फुरसतीत असल्यानं बोलल्या दादा तुमची कथा वाचली कालची दैनिकात आलेली. गरिबीची, गरीब लोकांची कळ हाय तुम्हाला. तीला काय सांगणार होतो तिचं-माझं रोजचं आयुष्य, आयुष्यात येणं-जाणं करणारे क्षण त्या कथेतून मांडले होते.

तिनं त्या खुशीत दोन गुलाबजाम ताटात शिल्लक दिले अन् डोळ्यावर आलेली बट सावरली. हे सगळं माझ्या दैनिकात आलेल्या कथेसाठी नव्हतंच हे तेव्हाच कळून चुकलं. आता काय बोलायचं होतं, एकतर मेस या महिन्याच्या शेवटच्या दिवसाला सुटणार होती. नाहीतर माझं मेसवर जेवायला येणं बंद होणार होतं. 

तिची चूकी काही नव्हती, तिचाही दादला कंपनीत कंत्राटी पद्धतीने काम करणारा कामगार होता. अन् मेसवर जेवायला येणारी बहुतांश मुलंही तीच दोन कोसावर जाऊन आपली शरीराची भूक भागवून घेणारी होती.
तिचाही गैरसमज झाला असावा, की मीही त्यातला असेल ; पण मला लोकांच्या या कथा जवळच्या वाटतात म्हणून मी तिथे जात राहिलो. अन् एक दिवस नकळत थांबून घेतलं.
अजून बरच काही..!

Written by,
Bharat Sonwane .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...