मुख्य सामग्रीवर वगळा

Industrial सुट्टी..!

Industrial सुट्टी..!

कालची सेकंड शिफ्ट करून फ्लॅटवर आलो अन् उद्या सुट्टी म्हणून उद्याच्या दिवस आराम याच कल्पनेत कंपनीतून सेक्युरिटी गार्डने चेकआऊट केलं अन् मी बाहेर पडलो.
जोडीदार मागेच होता, गाय छाप खाणारा आहे तो. शिफ्ट सुटली की मग बाथरूममध्ये जाऊन त्याची गाय छाप बुटाच्या आत घालतो, अन् मग सेक्युरिटी गार्डच्या चेकींग कॅबिनकडे तो वळतो. साधारण वर्षभरापासून माझा रूम पार्टनर आणि इथे कंपनीतही सोबती आहे.

दोन वेळा हजार-हजार रुपये फाईन भरून आणि पुढे गाय छाप जवळ सापडली तर कंपनीतून काढून टाकीन. या सुपरवायझरच्या धमकीलाही तो जुमानत नाही आणि बिनधास्त गाय छाप कंपनीच्या आत घेऊन येतो. त्याची ती तलफ आणि त्याचं ते गाय छाप लपवण्याचं कौशल्य बघितलं की, असं वाटतं इतकं डोकं त्याने कंपनीत वापरले असते तर नक्कीच सुपरवायझर झाला असता. आणि मग सगळ्या गाय छाप खाणाऱ्या पोरांना मोकाट सूट त्याने दिली असती.

असो मी बाहेर पडलो गेटच्या बाहेर तिसऱ्या शिफ्टसाठी मुलं कुडकुडत बाहेर कंपनीच्या गेटवर उभी होती. काही पाच-सहाजण नवखेच होते अन् कंपनीत काम भेटन या आशेनं ते आज दिवसभरातून तिसऱ्यांदा फर्स्ट,सेकंड आणि आता थर्ड शिफ्टमध्ये काम भेटेल म्हणून गेटवर उभे होते.

कंत्राटी पद्धतीने काम करायला आलेली ही मुलं बहुदा खेड्यापाड्यातील. रूम घेऊन नव्यानं त्यांनी संसार थाटलेला असतो त्यांचा एकट्याचा. कित्येक स्वप्न पाहून शहरे जवळ केली असतात, कित्येक सुपरवायझरचे पाय धरून काम मिळवलं असतं.

जेमतेम शिक्षण, अनुभव नाही त्यामुळे त्यांना लवकर कुणी कामावर घेत नाही. तेव्हा अश्या मुलांची पहिल्या महिनाभर वाईट अवस्था असते. कधीतर पार्ले बिस्कीट पुड्यावर दिवस काढणारे मित्र मी बघितले स्वतःही अनुभवले. यांचं स्ट्रगल वाईट्ट आहे. हे सर्व जवळून अनुभवले, बघितले असल्यानं वाईट वाटते या मुलांसाठी. त्या मुलांना आज काम भेटल की नाही हे बघण्यासाठी मी गेटवर दहा-पाच मिनिट थांबलो.

रोजची तिघं पोरं कामावर आलेली नव्हती मग त्यातली तीन पोरं सुपरवायझरने आत घेतली. कंपनीत आज त्यांचा काम करण्याचा पहिला दिवस असावा म्हणून ती खुशीत गेटच्या आत कार्ड दाखवून चेक इन करून आत गेले.
तिघे-चौघे रूमवर जाऊन तरी काय करणार म्हणून कंपनीच्या बाजूला असलेल्या आडवाटेला रात्री साडेबारा वाजता शेकोटी करून शेकत बसले.

आजही माझ्या मित्राची गाय छाप सेक्युरीटी गार्डकडून धरल्या गेली नाही आणि उद्या सुट्टी याचा त्याला काय मोप आनंद झाला म्हणून तो रस्त्यानं उड्या मारतच चालत होता. मी माझ्याच कंपनीच्या वॉल कंपाऊंडच्या भिंतीना खेटून चालत होतो, आत मशिनरी पुन्हा चालू झाल्या होत्या.

फॉर्कक्लीपचा धडकी भरणारा हॉर्न पुन्हा एकदा कंपनीत निनादत होता. प्यालेट धडाधड एकावर एक आदळत होती अन् कंपनीचं प्रॉडक्ट प्रॉडक्शन काढणे चालू झाले होते. कंपनीच्या आवारात असलेल्या उंचउंच चिमण्या अन् त्यातून निघणारा धूर काळोखात अजूनच औद्योगिक वसाहतीमध्ये काळोख निर्माण करत होता.

मधूनच कंपनीतील अॅबुलंन्स मोठ्याने आवाज करीत कंपनीच्या आवारात घुमत होती. विपरीत काही झालं असावं कंपनीत,त्या खबरा कधीच कंपनीच्या बाहेर येत नाही, तिथेच दाबल्या जातात.

असो हे सगळं दृश्य बघून मला माझे जुने दिवस आठवतात.
सीव्ही घेऊन मी औद्योगिक वसाहतीच्या प्रत्येक कंपनीच्या गेटवर भटकंती केली. कुठे माझी बारीक अंगकाठी बघून तर कधी मी खूप शिकलो आहे अन् शिक्षण बघता मला कंत्राटी कामगार म्हणून कामावर घेता येत नाही म्हणून गेटवरून कारणे देऊन मागारी पाठवण्यात आलं.
त्यामुळं हा कंपनीत काम करायला लागायचे म्हंटले की करावा लागणारा संघर्ष वाईट आहे.

साडेबारा वाजता फ्लॅटवर येऊन कॉटवर जे पडलो थकव्याने आपसुकच डोळे मिटले, पहाटे मित्राच्या हाकेसरशी जाग आली. अंघोळ वगैरे आवरून कामगार चौकात येऊन बसलो. माझ्यासारख्या असंख्य कामगारांच्या व्यथा इथे ऐकायला भेटतात, म्हणून इथे रोज येणं होतंच. 

पाचात सात कटिंग चहा होतात सिगारेट पिणारे आपला अंदाज दाखवत त्यांचे झुरके सोडवत चहा घेत राहतात. माझ्यासारखे चहाच्या टपरीतला पेपर शोधून तो वाचत बसतात. 

रविवार असला की सगळं कसं निवांत निवांत असतं. कुणी कंत्राटी कामगार पहाटेच देशी पिऊन चौकाच्या एकांगाला असलेल्या गल्लीत लोळत पडलेला असतो.

अश्यावेळी जे काही तो बोलतो ते सगळं वास्तव अन् त्याची करूण कहाणी सांगणारं असतं. बारा साडेबारा वाजले की पावलं मेसकडे वळतात, आज रविवार नॉनव्हेज मस्त चोपून हानायचे अन् फ्लॅटवर येऊन कॉटवर पडून रहायचं.
कुणी वाचत राहतं, कुणी आराम करते तर कुणी काय तर कुणी काय मी हे असं लिहत बसतो..!

Written by
Bharat Sonwane .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...