मुख्य सामग्रीवर वगळा

गावाकडचा कोरॉना

काय तो रोग आलाया म्हणे करुणा...कोरोणा म्हण ओ हौशे...
आपल्याला कसला हुतो आहे बाई रोग अन् राग....
आपल्याकडे बघून आपल्याला होणार बी नाय त्यो....आपल्याच पोटाची खळगी भराया काम नाय इथं कुठं सफरचंद आणायला पैसा घालू रोग बोलून लक्षे....

बोलणं ऐकून मी थांबलो,तालुक्याच्या गावाला माझं राहणीमान माझ्या डोळ्यासमोरून गेलं.इथे हे काय चालू आहे हा प्रश्न पडला....

चालत चालत शिवनामायच्या किनारी येऊन थांबलो,गावात पाऊस येवो म्हणुन जसं महादेवाच्य मंदिरात पाणी भरून,मंदिर बंद करून ठेवता तसे कडी कुलूप लावून सर्व मंदिर बंद करून,देवाला राखण एक पोलिस ठेवला होता....

चालत चालत नदी पुलावर गेलो,माझ्या वयातल्या दोन-तीन तरण्या नवीन लग्न झालेल्या सूना धूने धोपटीत माहेरच्या गोष्टी करत होत्या...
मी थांबलो अन् त्यांच्या जवळ जाऊन गप्पा ऐकत बसलो,"काय वो दिर साहेब कुठं फीरायले इकडं ?"वहिनीचा आवाज कानी आला,कुणी येतंय का काय भेटायला माझ्या दिराला असं बोलून त्या हसायला लागल्या...

नाय वो वहिनी बघायलो,गावचे हाल-हवाल आमच्या सारख्या शहरी माणसाला कोण यतंया भेटायला इथं,मग भटकायलो एकटा एकटा... बरं हायसा जास्त फिरु नका दुपारच्याला घरला या जेवायला वहिनी बोलती झाली....

अन् मी निघालो माझ्या आवडत्या जागेकडे जायला,रस्त्यानं सर्व हिरवेगार झाडे झुडपे दिसत होती.नदीच्या काठावर असलेले बेसरमं बेसुमार वाढली आहे,शिवनामायीचे संथ वाहणारे पाणी काळजाचा ठाव घेत होते...

हिरवीगार वनराई संपली अन् बोडक्या झाडांची वाट सुरू झाली,लाल मती हवेत उडून डोळ्यांना स्पर्श करायची अन् डोळे चुर चुर करत मी चालत होतो.दूरवर असलेलं धरण मला खुणावू लागलं, बोलावू लागलं खुप दिवस झाले त्या धरण पाळेवर विसावा घेतला नव्हता....

पाऊले त्याच दिशेने चालत होती अन् नकळत आज अनपेक्षित त्या बकऱ्या चारणाऱ्या रामा बाबांचे दर्शन झाले.त्याच्या त्या चार-पाच बकऱ्या अन् तो फिरत होते कोरड्या झालेल्या धरणात हिरव गवत बकर्या चरत होत्या.तो अधून मधून शिळ घालत त्यांना आवाज देत त्यांच्या रेडूवर चालणाऱ्या गाण्याशी ठेका धरत होता....

आता मी धरण पाळेवर येऊन बसलो अन् रामा बाबा जवळ जवळ येत होते.तसं धरणात अजून दोन वर्ष पुरल इतकं पाणी आहे,पण माणसंच जगली नाहीतर या पाण्याचा असून काय फायदा ? एक प्रश्न पडून गेला या पाण्यात जर तो विषाणू आला अन् पाण्यामार्फत साऱ्या शहरा,गावात तो पसरला मग काय होईल ?

तितक्यात रामा बाबांनी आवाज दिला काय सरकार आज कुठं वाट चुकला....मी माझ्यातल्या शास्त्रज्ञाला सावरत बोलो,काय नाय आलो तुम्हाला भेटायला. तुम्हाला नाय का एकवीस दिवस सुट्टी रामा बाबा मी बोलो,रामा बाबा बोलता झाला....

अरे आम्हाला कसली सुट्टी,या बकऱ्या आहेत तोवर नाही सुट्टी.अशे किती रोग आले अन् गेले काय नाय झालं आम्हाला,हो रं बाबा सगळ खरं आहे तुझं पण तरी घरी थांबायचं बाबा...

नायरे जमत मी थांबलो तर माझ्या या विठू अन् माऊलीला कोण चारा देईल,त्यांची पोट नाही भरली तर माझं कसं पोट भरल.... हे ऐकताच मी अवाक झालो अन् खरच हे सर्व शक्य आहे का ? असे मनात येऊन गेलं...

तितक्यात रामा बाबा बोलला हे बघ लेका,जितकं माझ्या कडून होतं ते मी करतो,काल तालुक्याच्या गावाला गेलो तिकडून हा रुमाल आणला आहे....तोंडाला बांधून घेत असतो अन् उपरनं डोक्याला ऊन लागत नाय मग मला.

मी म्हणलो रामा बाबा तू हुशार आहे यार....तू इतकं तरी करतो,आमच्या शहरात लोकांना सुट्ट्या देऊन लोकं रस्त्यांन उघड्या तोंडानं हिंडायली.... रामा बाबा बोलता झाला शहरातली लोक बाबा ती,मोठी लोक त्यांना कसला होतो रोग अन् कसला काय अन् तो रेडूवर गाणे ऐकत पुढे निघून गेला....

मी ही विचार करत करत न्याहाळत बसलो त्या विस्तीर्ण धरणाला व त्या दोन माणसांना एक शहरी अन् एक माझा लाडका माझा गावातल्या माझ्या माणसाला....

Bharat Sonwane....

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...