मुख्य सामग्रीवर वगळा

पितळखोरा लेणी भ्रमंती..!

पितळखोरा लेणी भ्रमंती..!


बौद्ध पौर्णिमाला पितळखोरा लेणी भ्रमंतीस निघालो की आपसुकच मन एका वेगळ्या विश्वात घेऊन जात असते,काय हवं आहे..?,कश्यासाठी आलोय..? 
या प्रश्नांना मग उत्तरं नसतात पण सर्व बघुन जेव्हा परतीच्या वाटेला लागतो तेव्हा मात्र एका प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असतं की,येथुन पुन्हा आपल्या परतीच्या मार्गाला जाण्यासाठी सोबतीला काय घेऊन जायचं आहे..?

गेली काही दिवस म्हणा किंवा आता वर्षच म्हंटले तरी चालेल पितळखोरा लेणीला भेट दिलेली नाहीये अन् त्यामुळे मनाची होणारी चिडचिड सहज लक्षात येत आहे.
तर चला आज माझ्या प्रिय पितळखोरा लेणी भ्रमंतीबद्दल लिहण्याचा हा छोटासा प्रयत्न...

भ्रमंती करणे हा माझा विकपॉईंट आहे,म्हणजे असं मनसोक्त भटकायला मला सोबतीला मित्र असायलाच हवे असे नाही,एकटेही मी मनाला वाटले तेव्हा भटकायला बाहेर पडतो,कधीतरी मित्र असतात ते सर्व माझ्या सारखेच भटके अतरंगी आहेत.मग काय बऱ्यापैकी आमचं जुळून येतं,पण जसंजसं मोठं होत गेलो तसे कामाच्या व्यापात जो तो आपापल्या कामात व्यस्त झाला अन् मग हे एकट्याने फिरण्याचं वेडंखुळ डोक्यात भरले....

तर भटकंती सुरू झालेली असते काळ्या,भुरक्या खडकांच्या रानात पावलं चालत राहतात,दूरदूर उन्हाची झळई तुटतांना नजरेस पडत असते.जवळपास बकऱ्या वळणाऱ्या गुरखांचा शिळ फुंकण्याचा आवाज कानी पडत असतो ,दूरवर नांगरणीची कामं बैलांच्या साह्याने चालू असतात,बैलांवर पहाडी आवाजात ओरडणार्या शेतकऱ्यांचा आवाज दूर माझ्यापर्यंत हवेत विरत-विरत आलेला असतो...

पावले भटकत असतात मिळेल त्या दिशेनं,एका त्या लेणीच्या पायथ्याशी जाणाऱ्या मार्गाला,लेणी जवळजवळ गाठली की मग पुरातत्व खात्याच्या कमानी उभारल्या आहेत तिथं काही घटकाभर विश्रांती घेत आजूबाजूला असलेल्या झोपड्यांना न्याहाळत बसायचे...भर उन्हातान्हात गरम तापलेल्या लाल मातीत खेळणाऱ्या अर्ध्याअंगी उघड्या असलेल्या लेकरांना बघत आपल्या भूतकाळात रमून जायचं,अन् आपण मोठे झालो याची प्रचिती मग येऊ लागते पण सोबतीला अजूनही या मुलांसारखे मातीत रमणारे,खेळणारे,बागडणारे लहानगे आहोत याचीही जाणीव होत असते...
कितीवेळ त्यांच्याशी गप्पा मारून,खेळून झालं,की झोपडीत असलेल्या बापडीकडून तांब्याभर पाणी मागुन घटाघट नरड्याच्या खाली आणुन सोडलं की गार-गार वाटतं,मग झळाया तोडणाऱ्या उन्हात गारवा अनुभवयाला येतो.
सोबत शिशित पाणी घेऊन मग निघतो मार्गाला...
पुरातत्व खात्याच्या कमानिशी आलं की गार्ड बाबाला रामराम घालायचा,नाव नोंद करायचं,सुख दुःखाच्या चार गोष्टी सांगायच्या शिशितले घोटभर पाणी त्याला प्यायला द्यायचं अन् निघायचं मार्गाला.

रस्त्यात लेहंगा घातलेली करवंद विकणारी आजीबाई दिसते मस्त चेहऱ्यावर,हातावर गोंधलेली ती आजीबाई जगातली सर्वात सुंदर स्त्री त्यावेळी भासत असते.दोन रुपयाला एक कप असं दोन कप करवंद घेऊन पिंपळाच्या पानाचे डवणे करून घेतली की दहाची नोट तिच्या हातात देऊन,येतुया याडी म्हणुन निघावे तिनं वापीस पैश्यासाठी बोलावं नाकारत तिथून निघावे....

उंच उंच दिसणारी सागाची झाडे अन् यात असलेली लेणीकडे जाणारी कोरलेली दगडी पायऱ्याची वाट चालत रहावे,चालता-चालता सावलीच्या आश्रयाला बसून घ्यावं.काहीवेळ बसले की,डोक्यात सागाच्या पानाची टोपी करून घालायची अन् कातळात कोरलेल्या लेनीला दूरवरून बघत राहावं,इतक्या जवळ येऊनही आता तिला भेटायला जावसे वाटत नाही.

तिचं काही शतके जुनं ते रूप पायऱ्यांवर बसूनच न्याहाळत राहावं असं वाटायला लागतं,मग मनाची तयारी करून निघायचं लोखंडी पुलावरून बघत राहायचं मग उंचावरून कोसळणारा मुसळधार धबधब्याला पोहायला येत नसल्याने मनाची होणारी कोलाहल पण झालेल्या दुर्घटना आठवत पुढं निघावे...

आता मन थाऱ्यावर नसते,लेणीच्या पायथ्याला गेलं की मग इतकी सुंदर लेणी त्याकाळी अशी अधुरी कोरणे सोडुन का गेली असतील ती लोकं हा प्रश्न पडतो...
सोबतीला मन परिवर्तन होवुन एकाकी खुप हळवं झालेलं असते मग कातळात कोरलेल्या प्रत्येक कलाकृतीला स्पर्शुन,नजरेत भरून घेत असतो अन् मग उगाच पुरातत्व खात्याचा कुणी जाणकार असल्यासारखे स्वतःला प्रश्न करू लागतो अन् स्वतःच त्याची उत्तरेही देऊ लागतो...

बौद्ध पौर्णिमेला लावलेल्या मेणबत्या थिजून गेलेल्या असतात,त्यांच्या सानिध्यात ही लेणी अनुभवताना एक वेगळेपण अनुभवयाला येतं,एखाद-दुसरी मेणबत्ती विजू की मिणमिनू करत असते,तिच्या उजेडात शांतमय असलेली ध्यानस्थ रुपातली बौद्धाची मूर्ती कितीवेळ बघत राहावी.आपणही काहीवेळ डोळे बंद करून हे सर्व अनुभवत बसून राहायचं,मनाला मिळणारी शांतता,एकांत यासाठीच हा इथे येण्याचा कायमचा हट्टहास असतो...

एक एक करून बरच काही नजरेत सामावले जातं,स्पर्शाची भाषा करत भिंतीवरील चित्रांशी गप्पा मारल्या जातात कितीवेळ शांत बसून स्वतःच्या मनाशी गप्पा मारत बसलो की मग लेणी समोरच्या नदीरुपी नाल्यातून खाली यावं,पाण्यातून सावरत दगडांवर तोल सावरत उड्या मारत मारत समोरच्या कोरीव लेणीकडे निघावे... आठवण म्हणुन काही फोटो कॅमेऱ्यात कैद करावे,काही माहिती लिखित स्वरूपात डायरीत कैद करावी अन् ती बंद करून मग ती बॅगमध्ये ठेऊन द्यायची अन् सर्व जगाला विसरून,रोजच्या घडामोडीला विसरून फक्त अन् फक्त कातळात कोरलेल्या या लेणीला बघत राहावं...

एक तास जातो,दोन तास जातात अन् घराची ओढ लागते अन् पावले घराच्या मार्गाने निघू लागतात...
मनाला भेटलेली काही तासांची शांतता घेऊन पुढील काही दिवस जगाशी स्पर्धा करायला आपण मोकळे झालेलो असतो,कोरलेल्या पायऱ्यांनी वरती चालत आले की मग चहूकडे नजर फिरते,करवंद विकणारी ती आजीबाईसुद्धा तिच्या घराला जाण्या तिच्या मार्गाला लागलेली असते....

अस्ताला जाणारा सूर्य लेणीच्या साक्षीने बघावा आणि मग घराच्या वाटा जवळ करायला लागावं,पुन्हा काही दिवस एकांताला दूर करत या स्पर्धेच्या जगात स्वतःचा बळी देण्यासाठी....

Written by,
Bharat Sonawane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ