मुख्य सामग्रीवर वगळा

धोंड्याईचा गाव - भाग २


धोंड्याईचा गाव - भाग २

      धोंड्याई एका हातानं कोऱ्या चहाचा कप सावरत दुसऱ्या हाताने लांब झुबक्याची नथ सावरत चहा पित होती,चुलीचा धुर सर्व घरात मावत नव्हता,खिडकीच्या तावदानातून बाहेर पडणार धूर मला मी बसलेल्या पारावरून दिसु लागला होता...

आतापर्यंत सांजचा देऊळातला हरिपाठ झाला अन् मंदिरातील माझ्या आज्याच्या वयातील म्हातारी लोकं आपापल्या घराला जाण्या वाटेला लागली होती.गावाला गावपण या शेवटच्या घटका मोजणाऱ्या वडीलबाप  माणसांमुळेच होतं,जाता जाता दगडु आज्यानं मला हटकलं अन् प्रश्न केला,काय लका कधी आलासा शहरावरून...? 
अन् त्याच्या सोबतच्या आज्याला माझी ओळख करून देऊ लागला...

शामराव हा रामा आणाचा मधल्या लेकाचा धाकटा लेक हायसा,कालिजाला जिल्ह्याच्या शहराला अस्तूया,मी त्यांच्याकडे बघतच आदराने मान झुकवत नमस्कार केला अन् तब्येतीची विचारपूस केली,हाल हावाल विचारपू्स झाली अन् दगडु आज्याने मला येतू लका म्हणत काढता पाय घेतला...
एरवी मी नदीच्या किनाऱ्यावर बसून कधीचाच न्याहाळत असलेल्या पाण्याला अन् अलवार शांत वाहणाऱ्या पाण्याला नजरेत सामावून घेत होतो...

चेहऱ्यावर खोटे भाव आणून जगणं मला कधी रुचणार नव्हतं,त्यामुळं माझी झालेली अवस्था खूप वाईट होती पण कुणाला काय सांगणार.गावचा लेक शहराला राहतूया म्हंटल्यावर गावच्या वडील लोकांच्या माझ्याकडून अपेक्षा असणारच ना...

पण सध्याचा चालू असलेला काळ अन् माझ्या मनाची होणारी कोलाहाल मी तरी कुणाला सांगणार होतो,म्हणुन येऊन बसलो होतो या शिवना मायच्या तीरावर तीच एक सोबती अन् तीच सध्या माझी मैत्रीण होती जी मला समजुन घेईल....

धोंड्याई भाकरी करायला लागली होती,भाकरी थापण्याचा आवाज माझ्या कानावर आला तसा मी धोंड्याईच्या घर कम झोपडीकडे निघालो दाराच्या उंबरठ्यावर राहुन आईला आवाज दिला...
अय आजे काय करायली..?
झाली का भाकरी,कोड्यास..?
तितक्यात धोंड्याई दचकून डोक्यावर असलेला पदर सावरत मला म्हणाली कुण बा..? 
माझ्या नातवा सारखा तू पण मी काय वळखीलं नाय बा तुला...
मी म्हंटले:अगं आजे मी झुंबर्या माळणीचा नातू हायसा सूनि आक्‍काचा धाकटा लेवूक...

तितक्यात धोंड्याई बोलली: अरे माझ्या कर्मा माझी नजर अशी हाय बाबा दळभदरी गावच्या लोकासणी ओळखिना.मग कसा हायसा बाळा तू अन् पराच्या दिसाला तुझी माय भेटली होतीसा मला बाजारात,ती बी बोली की धाकटा लेक आला हायसा शहरावरून ...
मी बोलता झालो: हाव गं माय आईनं सांगले मला की,धोंड्याई भेटली हूती म्हणून तुझी तब्येत चांगली नस्तिया आता म्हणून भेटून यायला सांगितलं मायना...
मग आलूया तुला भेटाया...

बरं झालं लका आलासा..! 
आला हायसां तर पिठलं भाकर खावून जा तुझ्या गरीब आजीच्या घरचा...
नगं नगं...आजी मायनं घरला माझी भाकर केली असल उगाच शिळी होईल तुझी विचारपूस झाली यातच माझं पोट भरलं...
धोंड्याई भाकर खात माझ्या संगत गप्पा मारत बसली होती माझ्या रुपात तिला तिचा नातू गवसला होता...

तिला तिच्या नाताची आठवण आली अन् तिच्या डोळा पाणी आले मी बघून न बघितल्या सारखं केलं अन् आईला म्हंटल आई काळजी घे स्वतःची येतुया आता खूप वख्त झाला हायसा पुन्हा झुंबऱ्या माळीन माझ्या नावानं बोंबाटा करल साऱ्या गावात...

धोंड्याई बोलती झाली,बाळा माझा नातू पण तुझ्या इतकाच असतारं पण लहानपणी खंडेरायाच्या गावच्या जत्रंला हारला,तसा गवसला नाय खूप धुंडला पण नाय गाव्हला...
बिच्चारा कुठं असल अन् काय खात असल खंडेरायालाच माहीत अन् आजीने पदराने डोळे पुसत एका ताटलीत पिठलं दिलं अन् बोलती झाली 
झुंबऱ्या माळनीला माझ्या हाताच पिठलं लई आवडत तु बी खा अन् तुझ्या आजीला पण दी अन् सावकाश जारं बाळा...

मी पण तिला येतूया काळजी घे म्हंटले अन् पुढच्या वख्ताला शहरावरून आलो की भेटायला येईल म्हणून निघालो...
मी किती दूरवर जास्तोवर धोंड्याई मला बघत राहिली,दाराच्या उंबठ्यावर बसून अन् डोक्यावरचा पदर सावरत डोळ्यातील नातवाच्या येणाऱ्या आठवणीतले आसवे सावरत,पदरानं पुसत....
Written by,
©®Bharat sonawane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...