मुख्य सामग्रीवर वगळा

उन्हाच्या झळा..!

उन्हाच्या झळा..!

सकाळ सरून दुपार येते,सूर्य आकाशाच्या मध्यावर येतो अन् मग आपसूक पावलं त्या वाटेला लागतात,जिथं माणसाच्या अस्तीत्वाच्या पुसट खुणा आजही जपून ठेवल्या जात आहे.
मानवाचे अस्तित्व म्हणजे आता अस्तित्व नाही का..?

तर अस्तित्व आहे पण काही शतके वर्षांपूर्वी माणूस ज्या अवस्थेत होता ते अस्तित्व आता समुळपने नष्ट झालं आहे बऱ्यापैकी,मग या अश्या त्या नष्ट झालेल्या काळाच्या काही पुसट खुणा दिसल्या की त्याबद्दल जाणून घेण्याच्या ओढीने नकळत ती तांड्या,वस्तीला जाणारी वाट धरली जाते...
जिथं हाती काही लागणारं नाही पण माणूस म्हणून आजवर जगत असल्येल्या,त्या एका समाजाशी नव्याने आपली ओळख होते.जिने आपल्याला आपल्या देशाची पूर्वापार चालत आलेल्या संस्कृतीचे दर्शन घडवले....

उन्हाच्या काहिलीत,लाल मातीच्या फुफाट्यात पावलं तांड्याची वाट जवळ करत असतात.वाळून गेलेलं तन,अधूनमधून रस्त्याने झुकलेल्या बोडक्या बाभळी ज्या उन्हाच्या या ताफ्यात वाळून गेल्या अन् काट्यानिशी झडू लागल्या.उन्हाच्या झळांनी बोडक्या बाभळीला लगडलेली पिवळी धम्मक फुलं भर रस्त्यावर सडा पडल्यागत चहूकडे उडत आहे,आसमंतात कोऱ्यालख्ख उन्हाचा टोचणारा,बोचणारा स्पर्श,वाढलेल्या केसांच्या डोक्यातून घरंगळत येणारा घामाचा थेंब अन् रूतणारा पायाला मुरमाड जमिनीतला खडा,तरिही पावलं चालत रहातात....

दूरवर कुडाची,लाल मातीची शेणानं लिपलेली घरं दिसु लागतात अन्  काळजात तिथे वास्तव्यास असणाऱ्या लोकांना जाणुन घेण्यासाठी घरघर सुरू होते....
गल्ली,बोळात उडणारा उन्हाच्या झळाईतला पालापाचोळा,गव्हाचा निवडुन उरलेला कांडा नालीत टाकुण दिल्यानं तो ओला होवुन डोक्याला भंणभंण करायला लावणारा आंबट वास,त्याच्यात भर म्हणून की काय कुरडईसाठी ओला दळून चिक काढुन ठेवलेल्या कोंड्याचा वास,त्यावर घोंगावणार्या माश्या....

तांड्याच्या वस्तीला आलं की या दिवसात या सर्व गोष्टींची सवय करून घ्यावी लागते,कारण उन्हाळी हंगाम म्हणजे हीच कामं सुरू झालेली असतात,मुळात गावात टोळीला घेऊन ऊस तोडणीसाठी हिवाळ्यात जाणाऱ्या मजुरांची ही परतीची वेळ...

माणसांवाचून शांत झालेला तांडा पुन्हा एकदा माणसांच्या गलबलीत अन् त्यांच्या भाषेत होणाऱ्या संवादांनी जिवंत असल्याचा भास करून देतो. तांड्यात,वस्तीला,पाड्यात या दिवसांत मेहनतीची कामे संपलेली असतात अन् आराम करण्याचा मोसम सुरू झालेला असतो हो पण सोबतच हाताला काम असलं की मग ते करायचं,ते सोडायचं नाही.
कारण आज काम आहे उद्या नाही या तत्त्वावर जगणारी ही लोकं....

आज शहराला नोकरीसाठी नोकरी लागून सेटलही तितकीच झालेली अन् अठरा विश्व दारिद्र्य असल्यामुळे कसोटीच्या संसाराला हातभार लावत आपली पूर्वापार चालत असणारी संस्कृती जपत जगणारी सुद्धा तितकीच ही लोकं आहेत.कितीही श्रीमंत झाला आपल्यातला माणूस तरीही,जमिनीवर राहून दर सणाला आपल्या माणसात सण साजरा करणारा हा समाज (खरंतर समाज ही संकल्पना मला मंजूर नाही,पण हे किती जणांना रूचेल हे कळायला पर्याय नाही.यावेळी इतकंच म्हणेल,आपल्या देशात पूर्वापार चालत असलेली संस्कृती तिचे जतन,जपवणूक करणारा हा एक समूह जो संपूर्ण देशभरात आढळतो.).

उन्हाळ्याचे दिवस काम नसल्यामुळे दुपारच्या या वेळेला कुणी झाडाखाली,कुणी ओट्यावर कुणी खाटीवर निजलेलं असते,कुणी दळण दळत आहे,कुणी धूनेभांडी करत आहे, कुणी काय,कुणी काय...
आपण फक्त बघत राहायचं,कारण शहराला राहून हे क्षण अनुभवता येत नाही ते इथे येऊन अनुभवयाला सुद्धा आपण तितकं पाईक असावं लागतं, नाहीतर आपल्याला हे उगाच नकोसे वाटणारे वाटेल....

Written by,
Bharat Sonawane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...