मुख्य सामग्रीवर वगळा

बोलके शहर..!

बोलके शहर..!


शहरातली दुपार अंगावर येते,भर दुपारच्या काहीलीच्या उन्हात मी चालत राहतो,एअरपोर्टजवळ असलेल्या गल्ली बोळातून,सोसायटीच्या अनोळखी रस्त्यांवरून जेव्हा एअरपोर्टच्या समोर असलेल्या महामार्गावर जेव्हा येतो तेव्हा आयुष्याला घेऊन मी अधिकच विचार करायला लागतो..!

रस्त्यानं चालत असताना एकीकडे दहा-पंधरा आलिशान गाड्यांचा ताफा जवळून जातो,त्यांचे वाजणारे सायरन कुण्या बड्या नेत्याची त्या पंधरा गाड्यांच्यामध्ये कुठली एक असावी.
मी महामार्गावर चालत असतो,एअरपोर्ट समोर रस्त्यावर असलेल्या स्पीड ब्रेकर जवळ गाड्या स्लो होतात अन् माझ्याही पावलांची चालण्याची गती मंदावते,सर्व गाड्या एका पोटोपाट एअरपोर्टच्या गेटवरील वॉचमन त्यांना हजेरी देतो अन् एका पाठोपाठ सगळ्या गाड्या आत जातात,कर्कश्य वाजणारे सायरन शांत होतात..!

पुन्हा सर्व पूर्ववत होते अन् वाहणारा रस्ता पुन्हा वाहू लागतो,आयुष्याला घेऊन मी करत असलेले विचार पुन्हा सुरू होतात.रस्त्यांच्या पल्ल्याड रस्त्याला खेटून असलेल्या झोपड्या त्यांच्यात फुलेला गरिबांचा संसार गेली वर्षानुवर्ष मी बघत आहे.कित्येकदा तिथं पोहचले की पावले थबकतात पण शहरात राहायला आलो तसं मी यांत्रिक उपकरण असल्यासारखा घड्याळाच्या काट्यावर चालू लागलो आहे.त्यामुळे कित्येकदा ठरवूनही वेळेअभावी इथे थांबणे होत नाही,त्यांचा तो संसार डोळ्यात भरून त्यांच्या व्यथा मला माझ्या करता येत नाही..!

मग असच कधीतरी शनिवारी,रविवारी सुट्टीच्या दिवशी त्या रस्त्यालगत चौथऱ्यावर जावून बसतो,न्याहाळत त्यांचं आयुष्य.कुणी भर उन्हात झोपडीमध्ये विसावलेल असतं तर कुणी भाकर खात असतं तर लहानगे मातीशी खेळत असतात तर कुणी झाडांच्या कलमा विकत असते तर कुणी शिवाजी महाराज,बाबासाहेब आंबेडकर यांचे असलेले छोटे-छोटे पुतळे विकत असतो,कुणी अलीकडे गरिबांचा घरातले फ्रिज म्हणजेच मडके(माट) विकत असतो कुणी लहान मुलांना हवे असलेले बाहुले विकत असतो तर कुणी काय तर कुणी काय..!

एक दिवस त्या पुतळे विकणाऱ्यांना सहज विचारलं भाई ये जो पुतले तूम बेचते हो वह इंसान को पहचांनते हो,कौन है यह..!
त्यानं त्यांचं नाव सांगितले हात लावून त्या पुतळ्यांना,सगळीच बरोबर होती पुढे त्याला म्हंटले उन्होंने क्या किया कुछ बता सकते हो..!
त्यानं पुढे उत्तर दिले मै तो कुछ सिखा नही हू तुम्हारे जैसा..!
इतना मालूंम है,यह बहोत बडे पुरुष है उन्होने बहोत कुछ अपने देश,समाज केलिये किया है,जिससे हम सब उनपर गर्व करते हैं..!

पुढे जे वाक्य तो बोलला ते गर्व करण्यासारखे होते की,

और आज भी लोग ईन महान लोगोंके पुतले खरीदके हमारे रोजीरोटी का इंतजाम करते हैं तो वह आज भी जीवित है..!

अजुन पुढे तो खूप बोलला पण इतकचं उत्तर मलाही हवं होतं अन् मग मी गप्पांचा ओघ सावरत पुढे निघालो..!

शहरं बोलत असतात पण त्यांना बोलके करणारे आपण असायला हवं.त्यांच्या बोलण्याची भाषा आपल्याला उमगली की आपसूकच असे माणसं आपल्याला पावलोपावली भेटत असतात.मग प्रत्येक त्या आपल्या डोळ्यांच्यासमोर चालणाऱ्या माणसाला आपण न्याहाळत,त्यांच्या अंतरंगात आपण डोकावून बघत असतो..!

मी चालत असतो इतक्यात पुन्हा Ambulanceचा आवाज कानी पडतो पुन्हा वर्तमान काही काळासाठी थांबते,कुणाचा जन्म झालेला असतो किंवा कुणी सोडून गेलेला असतो.

कंपनीत जाणारी हडकुळी पोरं दिसली की त्यांच्या चेहऱ्यावर असलेला तणाव आपल्याशी बोलू लागतो,असंख्य प्रश्नांची उत्तरे आपण त्यांना पडलेल्या प्रश्नांना देऊ शकत असतो पण इथे संवाद खुंटलेले असतात.कुणी बाई लोटगाडीवर नारळपाणी विकत असते कुणाच्या जन्म-मरणाचा ती इथेच सौदा करत असते.कारण तिचंही एक आखेलेलं आयुष्य असतं,कुणी वडापावच्या गाडीवर बसून वडापाव खात असते आजचा दिवस ढकलला यांचा आनंद पण उद्याच्या दिवसाची चिंता त्याच्या चेहऱ्यावर असते..!

दारू पिऊन खंगलेले शरीर घेऊन रोडाच्या बाजूला असलेल्या चौथऱ्यावर एका अंगाला तो इसम पडलेला असतो,माशांचा त्याच्या सभोवताली घोंगवणारा आवाज त्याचे भविष्य त्याला दाखवत असतो..!
इतक्या वेळात दोन-तीन रिक्षावाले तरी मला विचारून जात असतात साहेब सिडको बसस्टँड,सेंट्रल बसस्टँड मी नकारार्थी मान हलवत,त्याला आपल्या नाही म्हणण्याचे किती वाईट वाटत असेल याचा विचार करत असतो..!

पुढे समोरच असलेल्या कंपनीतून सुटणारी फर्स्ट शिपची मुलं घरी जायचं या आनंदाने घराकडे निघतात जशी त्यांची पहिली-दुसरीची शाळा सुटली असावी इतका आनंद त्यांच्या चेहऱ्यावर असतो,आजची हजेरी लागलेली असते..!

एक दुसऱ्या शिपमधील मुलगा त्यांच्या सोबतच आज कामांवर नाही घेतले म्हणून पावले मोजत पुन्हा-पुन्हा कंपनीच्या गेटकडे मागे वळून बघत बघत पुढे चालत असतो.आजचा रात्रीच्या जेवणाचा हिशोब लावत असतो,पाकीटात किती पैसे उरले ते बघत असतो,चालत असतो चालत असतो..!

मी घंटाभरच्या या दृष्याला बघत बघत एका टपरीवजा झोपडीच्या दुकानात घोट-घोट चहा नरद्याच्या खाली उतरवत असतो,समोर असलेला McDonald च्या आवारात असलेला तो जोकर मला चहा प्यायला इकडे ये म्हणून खुणावत असतो..!
मी माझी नजर स्वतःपासून चुकवत गरम चहा नरडीच्या खाली नेऊन सोडवत असतो..!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...