मुख्य सामग्रीवर वगळा

गाव अन् गावची लोकं..!

गाव अन् गावची लोकं
भरर दुपारची वेळ होती उन्हं डोक्यावर आलेली,घामाचे ओघळ घरंगळत पाठीच्या लवणातून मोहम्मदचाच्या शरीराला चिटकलेल्या सदर्याला समीप होवून एखाद्या वाऱ्याच्या झोकाने सुकून सदर्यावर पांढऱ्या बुंदक्यातून ओघळणाऱ्या ओघळासारखे दिसून येत होते...
नदी ओलांडून मोहम्मदचाच्या आपल्या बकर्या घेऊन नदीच्या थडीथडीने,तापलेल्या वाळूत टाचावर वाळूत आपले पाय रोवत,एका हाताने उपरण्याने चेहऱ्यावरील घाम पुसत चालला होता....

मी पांदीच्या रस्त्यानं असलेल्या लक्ष्मीआईच्या देऊळात बसलो होतो,दूरवर स्मशानात तुळसाआईचं जळतं मडं जळत होतं.उंच उंच आकाशात जाळाचे लोळ दिसत होते,नदीच्या कडेला तुळसाआईचे वापरलेले नववार लुगडे अन् जरीच्या खणाच्या शिवलेल्या चोळीचे गाठुडे तिच्या नातवाने पाण्यात सोडायच्या हिशोबान ठेवले होते,तुळसाआईचा जावयाने त्याला ते गाठुडे पाण्यात टाकण्यास नकार देऊन काठावर ते ठेवायला सांगितले.वस्तीवरचे कुणी गरीब घटकाभरच्या वख्तानं येईल अन् ते गाठुडं घेऊन जाईल हे तुळसाआईच्या जावयाला ठाव होतं...

आकाशात उंच उंच आसमंतांशी एकरूप होणारे आगीचे लोळ अन् त्या आगीच्या पल्याड दिसणारा मोहम्मदचाच्या बकर्या हाकरीत चालला होता,त्याचे ते हाकरन्याचे बोल माझ्या कानापर्यंत येत होते...
ओ... आरे ओ..! उदर कहाॅं खपरीरे रांड..!
इदर ईत्ता घास छोडके उदर कहाॅं जारी,
छर छर अय केवढी..!
माॅका साला इकतो इत्तीसारी धूप अन् ये क्या बिचारी बुड्डी का आज इंत्काल हो गया,या मेरे आल्ल्हा बहोत बुरा हो गया रे..!

मी कधी त्या जळत्या तुळसाआईच्या प्रेताकडे बघत होतो तर कधी दूर हाकेच्या अंतरावर असलेल्या मोहम्मद चाच्याकडे.त्याच्या बकऱ्या म्हणजे साऱ्या गावाच्या बांड बकऱ्या होत्या असं सारे गाव त्याला म्हणायचं.म्हणून त्याला शेताच्या रानाला कुणी बकऱ्या चरूंन द्यायचं नाही,तो बकर्याकडे लक्ष देत नाही असं सारा गांव म्हणायचा.
पहाट झाली की आठच्या वख्ताला गावातले रोजंदारीवर जगणारे लोकं आपली खपुडी घेऊन मोहम्मद चाच्याच्या बकर्याच्या वखरात घेऊन यायचे,मग मोहम्मदचाच्या महिन्यानं त्या बकऱ्या राखुळी करता राखायला घ्यायचा...

गाव धड गाडीवर चालू द्यायचा नाही अन् धड पायी चालू द्यायचा नाही...! ही गावची रित त्याला माहित होती,म्हणून तो बकऱ्या राखुळी करून आपले जीवन सुखाने जगत होता.आज वारलेल्या तुळसाआईची एक पाठसुद्धा मोहम्मद चाच्याकडे राखुळीला होती,म्हणून तो मनोमन बोलत,त्याला वाईट वाटलं अन तो तिच्याबद्दल रस्त्यानं बर्तळत चालला होता....

दुपारचे ऊन,तुळसाआईच्या प्रेताचे जळते मडे,आसमंतात एकरूप होणारी   आगीचे लोळ,बकऱ्यांचा आवाज,लाल मातीतून चालता चालतांना,बकऱ्यांच्या खुरातून उडणारी लाल माती,बकऱ्या पांदिने पुढे गेल्या की मुताच्या ओघळाचा पांदीने येणारा इसाडा वास,बंद झालेलं देऊळ अन् देवीच्या महुर ठेवलेलं काल परवाचं खोबरं कुरतडत असतांना येणारा उंदराचा आवाज....

मोहम्मद चाच्याचे माझ्या दिशेनं येणं,दूरवरूनच मी त्यांच्या नजरेत नजर न घालता माझ्या विश्वात रममान असल्याचं दाखवणं. त्यांनी हटकवत मला विचारणं,इधर कहा हिंडरा रे..?
मी अडखळत उत्तर देणं..! 
कुछ नही चाच्या ओ आयेलता आपने गाव मी तुळसाआईका जनाजे के संग..!
इतक्यात काय व्हावं कडाडकन आवाज व्हावा जसं कुणाच्या डोक्याची कवटी फुटावी अन् मी वेड्यागत मोहम्मद चाच्याच्या डोळ्यांमध्ये बघावं,काहीतरी झालं आहे पण मला न सांगता त्यांनी उसने अवसान घेऊन तिथून निघावं अन् मला म्हणावं जा घरकु जा..!

क्रमशः

Written by,
Bharat Sonwane

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...