मुख्य सामग्रीवर वगळा

गाव अन् गावची लोकं..!

गाव अन् गावची लोकं
भरर दुपारची वेळ होती उन्हं डोक्यावर आलेली,घामाचे ओघळ घरंगळत पाठीच्या लवणातून मोहम्मदचाच्या शरीराला चिटकलेल्या सदर्याला समीप होवून एखाद्या वाऱ्याच्या झोकाने सुकून सदर्यावर पांढऱ्या बुंदक्यातून ओघळणाऱ्या ओघळासारखे दिसून येत होते...
नदी ओलांडून मोहम्मदचाच्या आपल्या बकर्या घेऊन नदीच्या थडीथडीने,तापलेल्या वाळूत टाचावर वाळूत आपले पाय रोवत,एका हाताने उपरण्याने चेहऱ्यावरील घाम पुसत चालला होता....

मी पांदीच्या रस्त्यानं असलेल्या लक्ष्मीआईच्या देऊळात बसलो होतो,दूरवर स्मशानात तुळसाआईचं जळतं मडं जळत होतं.उंच उंच आकाशात जाळाचे लोळ दिसत होते,नदीच्या कडेला तुळसाआईचे वापरलेले नववार लुगडे अन् जरीच्या खणाच्या शिवलेल्या चोळीचे गाठुडे तिच्या नातवाने पाण्यात सोडायच्या हिशोबान ठेवले होते,तुळसाआईचा जावयाने त्याला ते गाठुडे पाण्यात टाकण्यास नकार देऊन काठावर ते ठेवायला सांगितले.वस्तीवरचे कुणी गरीब घटकाभरच्या वख्तानं येईल अन् ते गाठुडं घेऊन जाईल हे तुळसाआईच्या जावयाला ठाव होतं...

आकाशात उंच उंच आसमंतांशी एकरूप होणारे आगीचे लोळ अन् त्या आगीच्या पल्याड दिसणारा मोहम्मदचाच्या बकर्या हाकरीत चालला होता,त्याचे ते हाकरन्याचे बोल माझ्या कानापर्यंत येत होते...
ओ... आरे ओ..! उदर कहाॅं खपरीरे रांड..!
इदर ईत्ता घास छोडके उदर कहाॅं जारी,
छर छर अय केवढी..!
माॅका साला इकतो इत्तीसारी धूप अन् ये क्या बिचारी बुड्डी का आज इंत्काल हो गया,या मेरे आल्ल्हा बहोत बुरा हो गया रे..!

मी कधी त्या जळत्या तुळसाआईच्या प्रेताकडे बघत होतो तर कधी दूर हाकेच्या अंतरावर असलेल्या मोहम्मद चाच्याकडे.त्याच्या बकऱ्या म्हणजे साऱ्या गावाच्या बांड बकऱ्या होत्या असं सारे गाव त्याला म्हणायचं.म्हणून त्याला शेताच्या रानाला कुणी बकऱ्या चरूंन द्यायचं नाही,तो बकर्याकडे लक्ष देत नाही असं सारा गांव म्हणायचा.
पहाट झाली की आठच्या वख्ताला गावातले रोजंदारीवर जगणारे लोकं आपली खपुडी घेऊन मोहम्मद चाच्याच्या बकर्याच्या वखरात घेऊन यायचे,मग मोहम्मदचाच्या महिन्यानं त्या बकऱ्या राखुळी करता राखायला घ्यायचा...

गाव धड गाडीवर चालू द्यायचा नाही अन् धड पायी चालू द्यायचा नाही...! ही गावची रित त्याला माहित होती,म्हणून तो बकऱ्या राखुळी करून आपले जीवन सुखाने जगत होता.आज वारलेल्या तुळसाआईची एक पाठसुद्धा मोहम्मद चाच्याकडे राखुळीला होती,म्हणून तो मनोमन बोलत,त्याला वाईट वाटलं अन तो तिच्याबद्दल रस्त्यानं बर्तळत चालला होता....

दुपारचे ऊन,तुळसाआईच्या प्रेताचे जळते मडे,आसमंतात एकरूप होणारी   आगीचे लोळ,बकऱ्यांचा आवाज,लाल मातीतून चालता चालतांना,बकऱ्यांच्या खुरातून उडणारी लाल माती,बकऱ्या पांदिने पुढे गेल्या की मुताच्या ओघळाचा पांदीने येणारा इसाडा वास,बंद झालेलं देऊळ अन् देवीच्या महुर ठेवलेलं काल परवाचं खोबरं कुरतडत असतांना येणारा उंदराचा आवाज....

मोहम्मद चाच्याचे माझ्या दिशेनं येणं,दूरवरूनच मी त्यांच्या नजरेत नजर न घालता माझ्या विश्वात रममान असल्याचं दाखवणं. त्यांनी हटकवत मला विचारणं,इधर कहा हिंडरा रे..?
मी अडखळत उत्तर देणं..! 
कुछ नही चाच्या ओ आयेलता आपने गाव मी तुळसाआईका जनाजे के संग..!
इतक्यात काय व्हावं कडाडकन आवाज व्हावा जसं कुणाच्या डोक्याची कवटी फुटावी अन् मी वेड्यागत मोहम्मद चाच्याच्या डोळ्यांमध्ये बघावं,काहीतरी झालं आहे पण मला न सांगता त्यांनी उसने अवसान घेऊन तिथून निघावं अन् मला म्हणावं जा घरकु जा..!

क्रमशः

Written by,
Bharat Sonwane

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...