मुख्य सामग्रीवर वगळा

पिंगळा..!

पिंगळा..!


आपल्या महाराष्ट्राला अनेक कलांचा वारसा लाभला आहे.काळानुरूप पिढीजात अश्या अनेक कलांना संबंधित पिढीतल्या कलाकारांनी जपवले आणि अश्या अनेक लोककला आजवर जिवंत आहे; काही काळाच्या ओघात लुप्त होत चालल्या आहे..!

हे महाराष्ट्राला लाभलेलं मौल्यवान ऐश्वर्य आहे,हे जपल्या जावं त्याबद्दल लिखित स्वरूपात दस्तावेज उपलब्ध असावे म्हणून हा लेख.आज आपण अश्याच एक लुप्त होण्याच्या कगारावर असलेल्या लोककलावंत अन् लोककलेबद्दल जाणून घेऊया...!

ग्रामीण महाराष्ट्रात मनोरंजन आणि प्रबोधनासाठी या कलांचा जन्म झाला असला तरीही आजकाल शहरातही त्यातील काही कलाकार मंडळींचा वावर असतो.प्रबोधनापासून ते मनोरंजनापर्यंत प्रत्येक पातळीवर समाजमनास आकार देण्याचा प्रामाणिक प्रयत्न लोककलाकार करीत असतात.

पण नव्या पिढीला या कलांची जाण नाही की त्याविषयी आपुलकीही नाही असे अलीकडे दिसून येते; किंवा असेही न म्हणता त्यांचं या लोककलेच्या सादरीकरणावर अवलंबून राहून त्यांचा पोटापाण्याचा प्रश्न सुटत नसल्याने त्यांनी नवीन मार्ग स्वीकारले असं म्हणायला हरकत नाही..!

पहाटेच्या वेळी दारोदार फिरून देवाच्या नावाने भिक्षा स्वीकारून आपला उदरनिर्वाह करणारे असे अनेक कलाकार आहेत अन् पहाटेच्या वेळी गावागावात आपल्या कलेच्या माध्यमातून जनसामान्य प्रबोधन करण्याचे काम हे कलाकार करत असतात..!

त्यात पिंगळा,वासुदेव,बहुरूपी वेश धारण करून आपली कलाकारी दाखवणारे कलाकार आले.यातील वासुदेव,बहुरूपी यांच्याबद्दल आपण बऱ्यापैकी जाणून आहोत.परंतु आजच्या पिढीला "पिंगळा" या लोक कलाकाराबद्दल फारसे माहीत नाही तर चला जाणून घेऊया पिंगळाबद्दल..!

आई,आज्जीच्या बालपणीच्या आठवणी त्यांच्या तोंडून ऐकल्या की आपल्याला या पिंगळ्याचा प्रवास उलगडतो.तोच जो वर्षानुवर्ष बदलत आला आहे..!

काल आईशी बालपणीच्या आठवणींना घेऊन बोलत असताना पिंगळ्याचा विषय निघाला अन् आईच्या बालपणी पिंगळा कसा असायचा तो कोणते गीतं म्हणायचा हे सगळं आईनं सांगितले.

आईचं बालपण एका खेडेगावातील,त्यामुळं तिच्या लहानपणी तिला जितकं या पिंगळाबद्दल आकर्षण होतं तितकेच आज मला आहे.

आई सांगत होती की पिंगळा हे प्रकरण खूप भारी होतं रात्री सारा गाव निपचित शांत झोपलेला असायचा तेव्हा हा पिंगळा रात्रीच्या साडेतीन चारच्या सुमारास त्यांच्या त्या विशिष्ट वेशभूषेत गावाच्या मधोमध असलेल्या पिंपळाच्या झाडावर चढून एका हातात ल्यांप घेऊन अन् एका हातात कुडमुडी (छोटा डमरू) घेऊन त्याच्या तालावर गाणी म्हणायचा.जी की माणसांच्या भवितव्याबद्दल काहीतरी विधान करत असत मग उजेडले की गावातल्या बायका,म्हाताऱ्या त्याला शिधा,भिक्षा वाढून देत असत.

माझ्या आयुष्यात मी पिंगळा बघितला तेव्हा कदाचित मी दहा - अकरा वर्षांचा होतो,ऐन हिवाळ्याच्या कडाक्याच्या थंडीच्या दिवसात तो आमच्या वस्तीला यायचा आजही तो तसाच नजरेसमोर येतो ...!

डमरुचा विशिष्ट प्रकारे आवाज करत पारंपरिक वेषात पहाटे सुयोर्दयाच्या वेळेपूर्वी अंधारातच हातात कंदील घेऊन त्याच्या उजेडात फिरत पारंपरिक गाणी,अभंग म्हणत जाणारा पिंगळा आता दुर्मिळ होत चालला आहे..!

पिंगळा महाद्वारीं, बोली बोलतो देखा.
चिंबळी-
पिंगळा महाद्वारीं । बोली बोलतो देखा । 
शकुन सांगतों तुम्हां हा एक ऐका ।। 
डुग डुग ऐका डुग डुग ऐका ।।

भविष्यात डोकावण्याचे वेगवेगळे मार्ग,पद्धती या माणसाच्या भौतिक विकासाबरोबर बदलत गेल्या. इंटरनेटवर ज्योतिषाचे दुकान मांडून बसलेले ज्योतिषी आणि पोपटवाला ज्योतिषी एकाच शहरात बघायला मिळतात.मार्ग कुठले का असेना,मुक्कामाचे ठिकाण तर एकच आहे ना..!

भविष्यात काय वाढून ठेवलंय..? लोकसाहित्य,कला,संस्कृती यात त्याच्या पाऊलखुणा उमटलेल्या दिसतात. पिंगळा हा लोककला प्रकारही भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा. पूर्वी अनेक लोक भविष्य पाहण्यासाठी पिंगळ्याचा आधार घेत असत.

वासुदेव,वाघ्या,नंदीबैलवाला,बहुरुपी,यांच्याच मालिकेतला हा पिंगळा.गळ्यात कवड्याची माळ,देवाचा टाक (चांदीच्या पत्र्यात कोरलेला छोटा देवाच्या चित्राचा ठसा), तबक, त्यात छोटी तसबीर,गळ्यात एक छोटी झोळी,धोतर किंवा हल्ली लेंगा असा हा पिंगळा सकाळी सकाळी एखाद्या घरात जाउन काही तरी बोलतो आणि ते खरं होतं..! त्याच्या जीभेवर म्हणे काळा तीळ असतो.अशी लोकांची त्यांच्याबद्दल असलेली धारणा..!

एखाद्या घराच्या अंगणात जाउन तो त्या घरातल्या माणसांच्या भवितव्याबद्दल काहीतरी विधान करतो. त्याने काहीबाही अभद्र बोलू नये म्हणून घरातील वयस्कर स्त्रिया त्याला भरघोस शिधा,धान्य आणि पैसे देतात. मग तो खूश होऊन आशिर्वादपर वक्तव्य करतो.लोक त्याच्या पाया पडतात; म्हणजे त्याच्या गळ्यातल्या देवाच्या पाया पडतात.एखाद्या घरात कुणी फारशी दाद दिली नाही तर देव वाईट करेल अशी भीती घालतो...!

रामप्रहरी असे शिव्याशाप कोण पदरी पाडेल..? त्यामुळे काहीतरी झोळीत पाडूनच तो पुढे जातो.रामप्रहर संपला की पिंगळा निष्प्रभ होतो.तो त्याच्या दैनंदिन उपेक्षित जीवनात गुरफटून जातो.वर्षाचे ८ महिने महाराष्ट्रभर पायपीट करायची, भिक्षा मागून जगायचे हा त्यांचा दिनक्रम.उरलेले ४ महिने गावाकडे जायचे,शेतात काम करायचे,मोलमजुरी करायची,मिळेल त्यात गुजराण करायची हा शिरस्ता..!

पिंगुळ ही तसा नामशेष झालेली लोककला.आजच्या तरुण पिढीला तर माहीत नसलेला प्रकार. ग्रामीण भागात सूर्य उगवण्याच्या आत कामाला सुरवात होते. त्यामुळे पिंगळ्याला दान मिळते.शिवकाळात या पिंगळ्याने मोठी भूमिका बजावल्याचे इतिहास सांगतो.स्वातंत्र्यपूर्व काळात हेरगिरीचे काम पिंगळ्याने केले.

शत्रुच्या गटात काय चालले आहे याची बितंबातमी शिवाजी राजांपर्यंत पोहचविण्याचे काम यांनी केले.त्यामुळे या कलेला राजाश्रय होता. पहाटे दोन वाजता उठायचे तीनपर्यंत प्रात:विधी उरकायचा. डमरू आणि कंदील घेऊन निघायचे गावात. सूर्य उगवेपर्यंत भिक्षा मागायची. सूर्य उगवल्यानंतर पुन्हा आपल्या तळावर जायचे, हा त्यांचा दिनक्रम...!

या भिक्षेत त्यांना कोणी शिधा देतात तर कुणी रोख पैसे.त्याच्या बदल्यात ते त्यांच्या पिढ्यांचा उद्धार करतात.मुले शिकल्याने या व्यवसायात तरूण पिढी येत नाही.काळाच्या ओघात ही लोककला नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.शाश्वत इन्कम नसल्याने या व्यवसायात कोणी येत नाही.लोकांचे भविष्य सांगतांना आपले भविष्य अंधारात असूनही पिढ्यानपिढ्या चालत आलेली लोककला सांभाळत धन्यता मानणारे पिंगळा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड