मुख्य सामग्रीवर वगळा

पिंगळा..!

पिंगळा..!


आपल्या महाराष्ट्राला अनेक कलांचा वारसा लाभला आहे.काळानुरूप पिढीजात अश्या अनेक कलांना संबंधित पिढीतल्या कलाकारांनी जपवले आणि अश्या अनेक लोककला आजवर जिवंत आहे; काही काळाच्या ओघात लुप्त होत चालल्या आहे..!

हे महाराष्ट्राला लाभलेलं मौल्यवान ऐश्वर्य आहे,हे जपल्या जावं त्याबद्दल लिखित स्वरूपात दस्तावेज उपलब्ध असावे म्हणून हा लेख.आज आपण अश्याच एक लुप्त होण्याच्या कगारावर असलेल्या लोककलावंत अन् लोककलेबद्दल जाणून घेऊया...!

ग्रामीण महाराष्ट्रात मनोरंजन आणि प्रबोधनासाठी या कलांचा जन्म झाला असला तरीही आजकाल शहरातही त्यातील काही कलाकार मंडळींचा वावर असतो.प्रबोधनापासून ते मनोरंजनापर्यंत प्रत्येक पातळीवर समाजमनास आकार देण्याचा प्रामाणिक प्रयत्न लोककलाकार करीत असतात.

पण नव्या पिढीला या कलांची जाण नाही की त्याविषयी आपुलकीही नाही असे अलीकडे दिसून येते; किंवा असेही न म्हणता त्यांचं या लोककलेच्या सादरीकरणावर अवलंबून राहून त्यांचा पोटापाण्याचा प्रश्न सुटत नसल्याने त्यांनी नवीन मार्ग स्वीकारले असं म्हणायला हरकत नाही..!

पहाटेच्या वेळी दारोदार फिरून देवाच्या नावाने भिक्षा स्वीकारून आपला उदरनिर्वाह करणारे असे अनेक कलाकार आहेत अन् पहाटेच्या वेळी गावागावात आपल्या कलेच्या माध्यमातून जनसामान्य प्रबोधन करण्याचे काम हे कलाकार करत असतात..!

त्यात पिंगळा,वासुदेव,बहुरूपी वेश धारण करून आपली कलाकारी दाखवणारे कलाकार आले.यातील वासुदेव,बहुरूपी यांच्याबद्दल आपण बऱ्यापैकी जाणून आहोत.परंतु आजच्या पिढीला "पिंगळा" या लोक कलाकाराबद्दल फारसे माहीत नाही तर चला जाणून घेऊया पिंगळाबद्दल..!

आई,आज्जीच्या बालपणीच्या आठवणी त्यांच्या तोंडून ऐकल्या की आपल्याला या पिंगळ्याचा प्रवास उलगडतो.तोच जो वर्षानुवर्ष बदलत आला आहे..!

काल आईशी बालपणीच्या आठवणींना घेऊन बोलत असताना पिंगळ्याचा विषय निघाला अन् आईच्या बालपणी पिंगळा कसा असायचा तो कोणते गीतं म्हणायचा हे सगळं आईनं सांगितले.

आईचं बालपण एका खेडेगावातील,त्यामुळं तिच्या लहानपणी तिला जितकं या पिंगळाबद्दल आकर्षण होतं तितकेच आज मला आहे.

आई सांगत होती की पिंगळा हे प्रकरण खूप भारी होतं रात्री सारा गाव निपचित शांत झोपलेला असायचा तेव्हा हा पिंगळा रात्रीच्या साडेतीन चारच्या सुमारास त्यांच्या त्या विशिष्ट वेशभूषेत गावाच्या मधोमध असलेल्या पिंपळाच्या झाडावर चढून एका हातात ल्यांप घेऊन अन् एका हातात कुडमुडी (छोटा डमरू) घेऊन त्याच्या तालावर गाणी म्हणायचा.जी की माणसांच्या भवितव्याबद्दल काहीतरी विधान करत असत मग उजेडले की गावातल्या बायका,म्हाताऱ्या त्याला शिधा,भिक्षा वाढून देत असत.

माझ्या आयुष्यात मी पिंगळा बघितला तेव्हा कदाचित मी दहा - अकरा वर्षांचा होतो,ऐन हिवाळ्याच्या कडाक्याच्या थंडीच्या दिवसात तो आमच्या वस्तीला यायचा आजही तो तसाच नजरेसमोर येतो ...!

डमरुचा विशिष्ट प्रकारे आवाज करत पारंपरिक वेषात पहाटे सुयोर्दयाच्या वेळेपूर्वी अंधारातच हातात कंदील घेऊन त्याच्या उजेडात फिरत पारंपरिक गाणी,अभंग म्हणत जाणारा पिंगळा आता दुर्मिळ होत चालला आहे..!

पिंगळा महाद्वारीं, बोली बोलतो देखा.
चिंबळी-
पिंगळा महाद्वारीं । बोली बोलतो देखा । 
शकुन सांगतों तुम्हां हा एक ऐका ।। 
डुग डुग ऐका डुग डुग ऐका ।।

भविष्यात डोकावण्याचे वेगवेगळे मार्ग,पद्धती या माणसाच्या भौतिक विकासाबरोबर बदलत गेल्या. इंटरनेटवर ज्योतिषाचे दुकान मांडून बसलेले ज्योतिषी आणि पोपटवाला ज्योतिषी एकाच शहरात बघायला मिळतात.मार्ग कुठले का असेना,मुक्कामाचे ठिकाण तर एकच आहे ना..!

भविष्यात काय वाढून ठेवलंय..? लोकसाहित्य,कला,संस्कृती यात त्याच्या पाऊलखुणा उमटलेल्या दिसतात. पिंगळा हा लोककला प्रकारही भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा. पूर्वी अनेक लोक भविष्य पाहण्यासाठी पिंगळ्याचा आधार घेत असत.

वासुदेव,वाघ्या,नंदीबैलवाला,बहुरुपी,यांच्याच मालिकेतला हा पिंगळा.गळ्यात कवड्याची माळ,देवाचा टाक (चांदीच्या पत्र्यात कोरलेला छोटा देवाच्या चित्राचा ठसा), तबक, त्यात छोटी तसबीर,गळ्यात एक छोटी झोळी,धोतर किंवा हल्ली लेंगा असा हा पिंगळा सकाळी सकाळी एखाद्या घरात जाउन काही तरी बोलतो आणि ते खरं होतं..! त्याच्या जीभेवर म्हणे काळा तीळ असतो.अशी लोकांची त्यांच्याबद्दल असलेली धारणा..!

एखाद्या घराच्या अंगणात जाउन तो त्या घरातल्या माणसांच्या भवितव्याबद्दल काहीतरी विधान करतो. त्याने काहीबाही अभद्र बोलू नये म्हणून घरातील वयस्कर स्त्रिया त्याला भरघोस शिधा,धान्य आणि पैसे देतात. मग तो खूश होऊन आशिर्वादपर वक्तव्य करतो.लोक त्याच्या पाया पडतात; म्हणजे त्याच्या गळ्यातल्या देवाच्या पाया पडतात.एखाद्या घरात कुणी फारशी दाद दिली नाही तर देव वाईट करेल अशी भीती घालतो...!

रामप्रहरी असे शिव्याशाप कोण पदरी पाडेल..? त्यामुळे काहीतरी झोळीत पाडूनच तो पुढे जातो.रामप्रहर संपला की पिंगळा निष्प्रभ होतो.तो त्याच्या दैनंदिन उपेक्षित जीवनात गुरफटून जातो.वर्षाचे ८ महिने महाराष्ट्रभर पायपीट करायची, भिक्षा मागून जगायचे हा त्यांचा दिनक्रम.उरलेले ४ महिने गावाकडे जायचे,शेतात काम करायचे,मोलमजुरी करायची,मिळेल त्यात गुजराण करायची हा शिरस्ता..!

पिंगुळ ही तसा नामशेष झालेली लोककला.आजच्या तरुण पिढीला तर माहीत नसलेला प्रकार. ग्रामीण भागात सूर्य उगवण्याच्या आत कामाला सुरवात होते. त्यामुळे पिंगळ्याला दान मिळते.शिवकाळात या पिंगळ्याने मोठी भूमिका बजावल्याचे इतिहास सांगतो.स्वातंत्र्यपूर्व काळात हेरगिरीचे काम पिंगळ्याने केले.

शत्रुच्या गटात काय चालले आहे याची बितंबातमी शिवाजी राजांपर्यंत पोहचविण्याचे काम यांनी केले.त्यामुळे या कलेला राजाश्रय होता. पहाटे दोन वाजता उठायचे तीनपर्यंत प्रात:विधी उरकायचा. डमरू आणि कंदील घेऊन निघायचे गावात. सूर्य उगवेपर्यंत भिक्षा मागायची. सूर्य उगवल्यानंतर पुन्हा आपल्या तळावर जायचे, हा त्यांचा दिनक्रम...!

या भिक्षेत त्यांना कोणी शिधा देतात तर कुणी रोख पैसे.त्याच्या बदल्यात ते त्यांच्या पिढ्यांचा उद्धार करतात.मुले शिकल्याने या व्यवसायात तरूण पिढी येत नाही.काळाच्या ओघात ही लोककला नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.शाश्वत इन्कम नसल्याने या व्यवसायात कोणी येत नाही.लोकांचे भविष्य सांगतांना आपले भविष्य अंधारात असूनही पिढ्यानपिढ्या चालत आलेली लोककला सांभाळत धन्यता मानणारे पिंगळा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...