Love She He ..!
सायंकाळचे एक पान डायरीतले विस्कळीत झालेले..!
सायंकाळची वेळ अलीकडे फारच व्यस्थतेच्या अन् मनाला मनाशी काही गोष्टींची ठरवून जी खूनगाठ बांधली आहे ती आधिक घट्ट व्हावी म्हणून त्या संबंधी विचार करण्यात निघून जाते.
निसर्गाने निर्माण केलेली शिशिराची पानगळ बऱ्याच दिवसांपूर्वी थांबली आहे.परंतु सायंकाळी फिरायला ज्या मैदानावर जातो,तिथं मात्र मोठ्या प्रमाणात झाडांची झालेली पानगळ दिसून येते.मग आयुष्याला घेऊन असलेला वाईट भूतकाळ आठवतो..!
लवकरच मान्सून वारे पाऊसाला घेऊन आपल्या प्रदेशात येतील अन् मग हा काही क्षणांचा मनात असलेला,आयुष्यात असलेला दुष्काळ संपेल..!
असो..!
सायंकाळ हल्ली माणसांच्या गर्दीतही शांत-शांत हवी-हवीशी वाटते.अलीकडे १६०० मीटरची प्रॅक्टिस करतांना जीवाची खूपच दमछाक होते.मोजल्या ७ मिनिटात ते पूर्ण होत आहे,पण अजुन आयुष्यात अन् करीयरच्या बाबतीत खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे त्यामुळं हे ७ मिनिटांच अंतर वजा कसे होईल यासाठी विचार करत असतो..!
ट्रॅकवर पळत असतांना पहिला राऊंड सहज पूर्ण होतो,दुसराही थोडीफार दमछाक करत पूर्ण होवून जातो पण तिसऱ्या राऊंडला मात्र हातपाय जड पडतात,पाय जमिनीवरून वर व्हायला नकोसे म्हणतात पण आयुष्याला सुख हवं आहे.
म्हणून तो ही राऊंड पूर्ण होवून चौथा राऊंडही पूर्ण केला जातो..!
एरवी चेहऱ्यावरून घाम निथळत असतो,टीशर्ट घामाने चिंब भिजलेला असतो.रात्रंदिवस ही मेहनत असणार आहे,नशिबात असेल तर क्षितिज गवसेल.नाहीतर नकार,पात्र न ठरणे या गोष्टींची शरीराला अन् मनालाही सवय झालीच आहेच.हे सर्व आता इतकं अंगवळणी पडलं आहे की,आता दुःख होत नाही पण पुन्हा तितक्याच ताकदीने उभा राहतो पहिल्यापेक्षा..!
ट्रॅकवर जेव्हा थकवा संपुष्टात येण्यासाठी चालत असतो,तेव्हा जवळपास सगळीच माणसे न्याहाळत असतो.कुणाचं ध्येय काय तर कुणाचं काय,कुणाच्या मनात काय चालू आहे हे इथ खूप सहज कळून जातं.माझ्या मनात काय चालू आहे,याचं गणित मात्र सुटत नाही..!
कालच शहरातील नव्यानं पीएसआय झालेला ज्येष्ठ मित्र भेटला,पहिले तर काय बोलावं कळत नव्हतं. १६०० मीटर मारत असतांना हा विचार मनात चालूच होता,एरवी तो ही थकून पायी चालत राऊंड मारत होता.१२व्या मिनिटाला त्याच्याशी बोलून छान वाटले,मिनिटाभराच्या या बोलण्याने छान वाटले.
आता रोज भेट होत राहील पण या मिनिटाभराच्या भेटीचे अप्रूप त्या रोजच्या भेटीला राहणार नाही.एकीकडे स्वप्न सत्यात उतरले आहे अन् एकीकडे त्यासाठी मेहनत घेणं चालू आहे..!
प्रॅक्टिस झाली अन् सायंकाळचा गार वारा अनुभवत झाडांच्या मध्यस्थी असलेल्या बाकड्यावर बसून काही प्रश्न उत्तरे सोडवत बसलो.सोळाव्या मिनिटाला आठवण आली,ठरल्याप्रमाणे डायरेक्ट कॉल केला.
माझे दुःख तिचे अन् तिचे दुःख माझे त्यामुळे दोघांत शेअरिंग अन् एकमेकांची काळजी घेणं होतं.दहा मिनिटांच्या बोलण्यानं दोघांना एकमेकांचा आधार वाटतो अन् मग फोन ठेवला जातो पुढे कित्येक दिवस न बोलण्यासाठी..!
त्यामुळं नेहमीच असं वाटत आलं आहे की काही गोष्टी आपल्या सोबत आयुष्यभर असायला हव्या,ज्यांच्यामुळे आपल्याला आयुष्यात एक आधार असल्याची जाणीव वेळोवेळी होत असते.आपला परिवार तर नेहमी सोबत असतोच..!
निसर्ग,मित्र,त्याच्या जगण्यातून आपल्याला काहीतरी शिकायला भेटेल असा मार्गदर्शक अन् नशीब जोरावर असलेच तर आपली दुःख जीला तिची वाटावी अशी मैत्रीण सोबतीला असावी.भविष्यात जेव्हा आपलं पुस्तक येईल तेव्हा पहिली प्रत मी विकत घेईल म्हणणारी मैत्रीण आपल्या स्वतःपेक्षा जास्त ती आपल्याला ओळखत असते हे खरं..!
हे सर्व भेटलं की आयुष्य सुंदर आहे,फक्त या सर्वांना घेऊन वेळेचे गणितं आपल्याला जुळवता आली पाहिजे बस इतकंच..!
Written by,
Bharat Sonwane.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा