मुख्य सामग्रीवर वगळा

शाळेच्या आठवणी..!

शाळेच्या आठवणी..!

ऐन पावसाळ्याचे दिवस भरात असायचे नदी,नाले,धरणं तुडुंब भरुन वाहत असत अन् घरा सभोवतालचा सर्व परिसर हिरवाईने नटलेला असायचा.घराच्या जवळच छोटी-छोटी तीन धरणे,दोन खदानी असल्यामुळे पावसाळ्याच्या आठवणी आजवर तितक्याच ताज्यातवान आहे जितके ते दिवस होते..!

इतकं सर्व निसर्ग सौंदर्य अनुभवायला असल्यानं कधीतरी अश्या भर पावसात शाळेत जायचं म्हणजे जीवावर यायचं.परंतू शाळेत जायच्या वाटेनं नाल्यातून अनेक कसरती करत एकमेकांचा हातात-हात घेऊन त्या पाण्यात घट्ट पाय रोवून चालण्यात जे थ्रील वाटायचं त्यासाठी का होईना शाळेची वाट आम्ही जवळ करायचो..!

मोठ्या नाल्यातून वाहणारे पाणी,नाल्यात येणारं झऱ्याच्या रुपात डोंगर टेकड्या अन् परिसरातील पाणी,सतत चालू असलेला पाऊस त्यामुळं सटकत्या झालेल्या वाटा अन् त्यावरून अजून सटकत आपटत,पडत चालायचं..!

नव्याने पाऊस सुरू झाला की तळ्याच्या कडेला दिसणारी,सतत ओरडत राहणारी पिवळी बेंडकं,दूरवरून पाण्याच्या प्रवाहात वाहून येणाऱ्या मासोळ्या,मांगुर मासा,खेकडा,छोटी छोटी साप बघायची म्हणून नदी नाले हुडकत फिरणं.अश्या असंख्य आठवणी,ज्याबद्दल कितीही लिहले तरी कमी पडेल..!

पावसाळ्यातील शाळा विषयीसुद्धा स्मृती पटलावर अश्याच अनेक आठवणी कोरलेल्या आहेत.पहाटे साडेसहा वाजता शाळेच्या वाटेला लागायचं,भर पावसात नाले पार करून शाळेत जायचं.वर्गाबाहेर अस्तव्यस्त झालेल्या चपलांच्या रांगा,बाहेर वाळू घातलेल्या अनेक मुलांच्या रंगीबिरंगी छत्र्या.अशी छत्री आपल्या वाट्याला कधी आली नाही,म्हणून अनेकदा वाटलं एखादी गायब करावी पण शाळेची शिस्त त्यामुळे हा फक्त विचार राहिला..!

वर्गात दरवाज्याला वाळू घातलेले रेनकोट,दप्तर ओले होवून फक्त कोरडी राहिलेली पाठ अन् या सगळ्यात मग आपली रोजची ठरलेली जागा तिथं आपलं बसून राहणं.एकतर मी उंच त्यात ती जांभळ्या रंगाची हाफ चड्डी त्यामुळे वाटणारी लाज..!

पत्राची शाळा असल्याने भर पावसात सर शिकवायचे नाही.मग मुलं ज्याची त्याची उद्योग करत बसायची,खोड्या गप्पा,कुणी नवीन पुस्तके आणली असेल तर त्यातील चित्र बघत बसायची..!

मी शेवटून तिसरा बसायचो.पाऊस पडत असला की वर्गाची गळणारी पत्रे मग जिथं कुठं पत्र गळत असेल तिथे खाली अंथरलेली बसायची पट्टी गोळा करून टाकून द्यायची,ते पडणारं पाणी तिच्यावर पडत रहायचं..!

प्रत्येकाचा शाळेत एक आवडता आठवणींचा कोपरा असतो,तसा माझा त्याच म्हणजे दुसरीच्या वर्गातील तो आवडता कोपरा.आमचा दुसरीचा वर्ग म्हणजे मला नेहमीच तात्पुरता आसरा म्हणून असलेला वर्ग वाटला..!

कारण त्या वर्गात अनेकदा बदल झाले मी जेव्हा दुसरीला होतो तेव्हा तो आमचा वर्ग होता नंतर,शाळेत श्यामची आई चित्रपट दाखवायचा असला की त्या वर्गात दाखवायला लागले.त्या वर्गात बऱ्यापैकी अंधार राहत असल्याने कदाचित सिनेमा थिएटरची फिलिंग तिथं तो चित्रपट बघत असतांना येत असावी असा शिक्षकांचा अंदाज असावा.पुढे ती रुम अडगळीची खोली झाली नंतर,शाळेत खिचडी शिजवायला म्हणून त्या खोलीचा वापर खिचडी मामा करायला लागले.अशी अनेक स्थित्यंतर त्या खोलीने बघितले..!

माझ्या खेरीज मला नाही वाटत कुणाला तो वर्ग आवडला असावा,माझी दहावी झाली शाळा मागे पडली अन् आता कित्येक वर्षांनी जावून बघतो तर मोठी ईमारत तिथं उभारली आहे,ते लिंबाचे झाडसुद्धा तोडून टाकले आहे..!

त्या वर्गात मी शेवटच्या मागे बसणाऱ्या मित्रांच्या समवेत रहायचो,मागची मुलं अन् पुढची मुलं यांची दोन विश्व असल्याचा भास मला त्या वर्गात व्हायचा.त्यात भरीस भर म्हणून माझं एक वेगळं विश्व होतं अन् जास्तीत जास्त वेळ मी माझ्या विश्वात रममाण असायचो..!

पाऊस पडत असला की वर्गाची पत्र वाजत रहायची,सर शिकवायचे नाही.मुलं गोंगाट करत रहायची जो मला आवडायचा नाही,मग मी त्या लांबचलांब असलेल्या वर्गात शेवटच्या भिंतीजवळ जावून बसायचो.

तिला एक मोठी जाळीदार खिडकी होती,जी सतत उघडी असायची.तिच्या पल्याड एक मोठ्ठी रुंद बोळ तिच्यात जाई,जुई,गुलाब,मोगरा यांची फुलं,वेली,झाडी होती जी त्या खिडकीच्या आधारे आमच्या वर्गाच्या पत्रावर गेलेली होती..!

खिडकीच्या अन् माझ्यामध्ये एक अडसर होता तुटलेली असंख्य लाकडी बाकडे तिथं ठेवलेली होती.त्याच्यावर उन्हाळ्यात पेपर झाले की आपली जी जुनी पुस्तके शाळेत जमा करायची असतात ती सर्व व्यवस्थित बांधून ठेवलेली असायची..!

मला त्या पुस्तकांचा काही एक फायदा नव्हता,कारण मी नवीन इयत्तेत गेलो की माझी पुस्तके बदल व्हायची,हे नाटक दहावी पर्यंत सुरू होतं.त्यामुळे जुनी पुस्तकं कधीच वाट्याला आली नाही अन् नवीन बऱ्याचदा पैश्या अभावी घेता आलीच नाही..!

मी त्या जुन्या पुस्तकांचे गट्टे खोलून त्यातील अनेक पुस्तकं वाचत राहायचो,बघत राहायचो.अश्मयुगीन इतिहास खूप आवडता असल्यानं तो वाचत रहायचो..!

नुकताच पाऊस पडून गेला की वर्गात पत्राला आधार म्हणून असलेल्या गुळगुळीत लाकडांना गाल लावून त्याचा गारवा अनुभवत बसायचो.बाहेरची फुलं बघत बसायचो,त्यांचा माझ्यापर्यंत येणारा दरवळ घेत बसायचो जो आजवर तसाच आठवणींसोबत डोक्यात आहे..!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड