मुख्य सामग्रीवर वगळा

शाळेच्या आठवणी..!

शाळेच्या आठवणी..!

ऐन पावसाळ्याचे दिवस भरात असायचे नदी,नाले,धरणं तुडुंब भरुन वाहत असत अन् घरा सभोवतालचा सर्व परिसर हिरवाईने नटलेला असायचा.घराच्या जवळच छोटी-छोटी तीन धरणे,दोन खदानी असल्यामुळे पावसाळ्याच्या आठवणी आजवर तितक्याच ताज्यातवान आहे जितके ते दिवस होते..!

इतकं सर्व निसर्ग सौंदर्य अनुभवायला असल्यानं कधीतरी अश्या भर पावसात शाळेत जायचं म्हणजे जीवावर यायचं.परंतू शाळेत जायच्या वाटेनं नाल्यातून अनेक कसरती करत एकमेकांचा हातात-हात घेऊन त्या पाण्यात घट्ट पाय रोवून चालण्यात जे थ्रील वाटायचं त्यासाठी का होईना शाळेची वाट आम्ही जवळ करायचो..!

मोठ्या नाल्यातून वाहणारे पाणी,नाल्यात येणारं झऱ्याच्या रुपात डोंगर टेकड्या अन् परिसरातील पाणी,सतत चालू असलेला पाऊस त्यामुळं सटकत्या झालेल्या वाटा अन् त्यावरून अजून सटकत आपटत,पडत चालायचं..!

नव्याने पाऊस सुरू झाला की तळ्याच्या कडेला दिसणारी,सतत ओरडत राहणारी पिवळी बेंडकं,दूरवरून पाण्याच्या प्रवाहात वाहून येणाऱ्या मासोळ्या,मांगुर मासा,खेकडा,छोटी छोटी साप बघायची म्हणून नदी नाले हुडकत फिरणं.अश्या असंख्य आठवणी,ज्याबद्दल कितीही लिहले तरी कमी पडेल..!

पावसाळ्यातील शाळा विषयीसुद्धा स्मृती पटलावर अश्याच अनेक आठवणी कोरलेल्या आहेत.पहाटे साडेसहा वाजता शाळेच्या वाटेला लागायचं,भर पावसात नाले पार करून शाळेत जायचं.वर्गाबाहेर अस्तव्यस्त झालेल्या चपलांच्या रांगा,बाहेर वाळू घातलेल्या अनेक मुलांच्या रंगीबिरंगी छत्र्या.अशी छत्री आपल्या वाट्याला कधी आली नाही,म्हणून अनेकदा वाटलं एखादी गायब करावी पण शाळेची शिस्त त्यामुळे हा फक्त विचार राहिला..!

वर्गात दरवाज्याला वाळू घातलेले रेनकोट,दप्तर ओले होवून फक्त कोरडी राहिलेली पाठ अन् या सगळ्यात मग आपली रोजची ठरलेली जागा तिथं आपलं बसून राहणं.एकतर मी उंच त्यात ती जांभळ्या रंगाची हाफ चड्डी त्यामुळे वाटणारी लाज..!

पत्राची शाळा असल्याने भर पावसात सर शिकवायचे नाही.मग मुलं ज्याची त्याची उद्योग करत बसायची,खोड्या गप्पा,कुणी नवीन पुस्तके आणली असेल तर त्यातील चित्र बघत बसायची..!

मी शेवटून तिसरा बसायचो.पाऊस पडत असला की वर्गाची गळणारी पत्रे मग जिथं कुठं पत्र गळत असेल तिथे खाली अंथरलेली बसायची पट्टी गोळा करून टाकून द्यायची,ते पडणारं पाणी तिच्यावर पडत रहायचं..!

प्रत्येकाचा शाळेत एक आवडता आठवणींचा कोपरा असतो,तसा माझा त्याच म्हणजे दुसरीच्या वर्गातील तो आवडता कोपरा.आमचा दुसरीचा वर्ग म्हणजे मला नेहमीच तात्पुरता आसरा म्हणून असलेला वर्ग वाटला..!

कारण त्या वर्गात अनेकदा बदल झाले मी जेव्हा दुसरीला होतो तेव्हा तो आमचा वर्ग होता नंतर,शाळेत श्यामची आई चित्रपट दाखवायचा असला की त्या वर्गात दाखवायला लागले.त्या वर्गात बऱ्यापैकी अंधार राहत असल्याने कदाचित सिनेमा थिएटरची फिलिंग तिथं तो चित्रपट बघत असतांना येत असावी असा शिक्षकांचा अंदाज असावा.पुढे ती रुम अडगळीची खोली झाली नंतर,शाळेत खिचडी शिजवायला म्हणून त्या खोलीचा वापर खिचडी मामा करायला लागले.अशी अनेक स्थित्यंतर त्या खोलीने बघितले..!

माझ्या खेरीज मला नाही वाटत कुणाला तो वर्ग आवडला असावा,माझी दहावी झाली शाळा मागे पडली अन् आता कित्येक वर्षांनी जावून बघतो तर मोठी ईमारत तिथं उभारली आहे,ते लिंबाचे झाडसुद्धा तोडून टाकले आहे..!

त्या वर्गात मी शेवटच्या मागे बसणाऱ्या मित्रांच्या समवेत रहायचो,मागची मुलं अन् पुढची मुलं यांची दोन विश्व असल्याचा भास मला त्या वर्गात व्हायचा.त्यात भरीस भर म्हणून माझं एक वेगळं विश्व होतं अन् जास्तीत जास्त वेळ मी माझ्या विश्वात रममाण असायचो..!

पाऊस पडत असला की वर्गाची पत्र वाजत रहायची,सर शिकवायचे नाही.मुलं गोंगाट करत रहायची जो मला आवडायचा नाही,मग मी त्या लांबचलांब असलेल्या वर्गात शेवटच्या भिंतीजवळ जावून बसायचो.

तिला एक मोठी जाळीदार खिडकी होती,जी सतत उघडी असायची.तिच्या पल्याड एक मोठ्ठी रुंद बोळ तिच्यात जाई,जुई,गुलाब,मोगरा यांची फुलं,वेली,झाडी होती जी त्या खिडकीच्या आधारे आमच्या वर्गाच्या पत्रावर गेलेली होती..!

खिडकीच्या अन् माझ्यामध्ये एक अडसर होता तुटलेली असंख्य लाकडी बाकडे तिथं ठेवलेली होती.त्याच्यावर उन्हाळ्यात पेपर झाले की आपली जी जुनी पुस्तके शाळेत जमा करायची असतात ती सर्व व्यवस्थित बांधून ठेवलेली असायची..!

मला त्या पुस्तकांचा काही एक फायदा नव्हता,कारण मी नवीन इयत्तेत गेलो की माझी पुस्तके बदल व्हायची,हे नाटक दहावी पर्यंत सुरू होतं.त्यामुळे जुनी पुस्तकं कधीच वाट्याला आली नाही अन् नवीन बऱ्याचदा पैश्या अभावी घेता आलीच नाही..!

मी त्या जुन्या पुस्तकांचे गट्टे खोलून त्यातील अनेक पुस्तकं वाचत राहायचो,बघत राहायचो.अश्मयुगीन इतिहास खूप आवडता असल्यानं तो वाचत रहायचो..!

नुकताच पाऊस पडून गेला की वर्गात पत्राला आधार म्हणून असलेल्या गुळगुळीत लाकडांना गाल लावून त्याचा गारवा अनुभवत बसायचो.बाहेरची फुलं बघत बसायचो,त्यांचा माझ्यापर्यंत येणारा दरवळ घेत बसायचो जो आजवर तसाच आठवणींसोबत डोक्यात आहे..!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...