मुख्य सामग्रीवर वगळा

वाभळेवाडी भाग-२

वाभळेवाडी  भाग-२

सांज केव्हाच सरली होती,सूर्य कधीच अस्ताला गेला होता ;अन् आता मावळतीच्या बरोबर एका अंगाला चंद्र आपलं दर्शन वाभळेवाडीच्या लोकांस्नी देऊ लागला होता.

नदीच्या थडीला पाण्याचा जोर वाढला होता,नदीच्या वाहत्या पाण्याचा आवाज,नदी थडीला असलेल्या पिवळ्या बेंडक्यांचा आवाज रामा कुंडूर,जगण्या,तलाठी आण्णा यांच्या बसल्या लिंबाच्या पारा पहूरतक येत होता.नदीच्या अंगाला काळाकुट्ट अंधार माजला होता..!

याला भरीस भर की काय म्हणून समशानातील कुत्री त्या काल गावच्या जुन्या पिढीतल्या नव्वदीच्या पाटलीनबाईंच्या जळत्या मड्या मोहरं उंचं आवाजात इवळू लागली होती.नदीच्या दुसऱ्या अंगाला झाडांवर काजवे चमकू लागली होती,व्होलगे मोठ्यानं आवाज करत ओरडू लागली होती,गावच्या जवळ असलेल्या डोंगर रानातून कोल्हे एक सुरात मोठ्यानं कोल्हेकुई हानीत बरतळल्यागत,इवळल्यागत ओरडत होती..!

रातीचे दहा कधी सरले अन् सारा गाव बरसदीचे दिस असल्यानं कधी पहुडला हे लिंबाच्या पारावर गप्पा झोडीत बसलेल्या रामा कुंडूर,जगण्या अन् नव्यानं शिकावू तलाठी म्हणून आलेल्या संतू आण्णा तलाठी यांना कळलेच नाही..!

संतू आण्णा पारावरच आपली कागदपत्राची,आफिस कामाची कागदं असलेली सुटकेस उश्याला घेऊन अन् कपड्याच्या पिशीची वळकटी करून चालून-चालून पिंडय्रा अन् खालपर्यंत पाय दुखायला लागल्यामुळे ती तळपायाच्या खाली घेऊन रामा कुंडूर अन् जगण्याच्या गप्पा ऐकत पहुडला होता.तिशीचे आसपास असलेला संतू आण्णा तलाठी गावच्या गप्पामध्ये रमून गेला होता..!

रामा कुंडूर एक बाजूला टरमळे ठेवून उख्खड बसून बिड्या फुकीत त्याचा धूर वरती काळीकुट्ट पळती ढगाड बघत त्या दिशेनं सोडीत बसून गप्पा झोडीत होता.जगण्या लिंब पाराच्या खाली उख्खड बसून त्यांच्या गप्पाच्या तालावर तंबाखू मळीत होता,तंबाखू मळून झाली तसं तो संतू आण्णाकडे बघत म्हंटला,

ओ सरकारी जावई घेताय का व्ह आयतावयता मळून दिलेला तंबाखुचा विडा..! 
अन् ; संतू आण्णानं झोपल्या जागीच हात लांबवत तो विडा एक चुटकीत पकडला अन् ओठा खाली टाईट दाबून धरत बसल्या जागीच एका हाताच्या डोपरावर एका अंगाला होत सडकीवर जोरात पीक हानली..!

मग गावच्या गप्पा सुरू झाल्या,तिशीच्या संतू अाण्णा मावळजे ते संतू आण्णा तलाठी इथ पर्यंतचा प्रवास संतू आण्णा रामा अन् जगण्याला सांगू लागले.गावची बारबापी लोकं कोण,कोण सरकारी कामात दखलंदाजी करतो,गावचा सरपंच कसा आहे तो कसा त्याच्या कारभारणी पुढं बैल होवून वागतो हे सगळं जगण्या अ्न रामा एकमेकांना बघत सांगू लागले..!

गावची शाळा,शाळामास्तर,जुना तलाठी,आठ दिवसाला येणारा ग्रामसेवक.ग्राम पंचायतीची इमारत पावसाळ्यात गळतीला लागल्यामुळे झोल्या आईच्या पडघरात तात्पुरती उभी केलेली ग्रामपंचायत हाफीस.गावाच्या एकांगाला असलेलं तलाठी हाफीस..!

जुन्या तलाठीशी गावच्या लोकांनी घातलेली हुज्जत अन् गावच्या काही बांड तरुणांनी रात्री जावून तलाठी हाफीसचा अर्धा तोडून टाकलेला दरवाजा या साऱ्या हकीकती दोघं संतू आण्णाला सांगू लागले होते..!

क्रमशः

भाग एक वाचण्यासाठी खालील माझ्या ब्लॉगला भेट द्या..!

http://bharatsonwane.blogspot.com/2022/07/blog-post_56.html

Written by,
Bharat Sonwane

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...