मुख्य सामग्रीवर वगळा

विचाराने दाटून आलेली सायंकाळ...


अलीकडे सांजवेळी जेव्हा सुर्य अस्ताला जात असतो...अन मी वेशीच्या पल्याड असलेल्या पिंपळाच्या झाडाला चहुबाजुंनी बांधलेल्या ओट्यावर बसलेलो,चहुकडं असलेली ती सर्व मोकळीक.
दुपारची झोप अजुन डोळ्यात तरळत आहे,हातपाय धूवुन पारावर बसायला आलोय. डोळ्यांच्या पापण्यांची अन बुबुळांची झुकण्यासाठीची तडजोड जाणवत आहे...

जसंजसं समोर सर्व दृश्य दिसतंय मन अस्वस्थ होत
आहे,या अस्वस्थ होण्याला कारण माहीत नाही. कदाचित शांत असणारा परिसर,गरम झळ्यांतुन अलवार संथ वाहणाऱ्या वाऱ्याकडे होणारा वाऱ्याचाच प्रवास...

पिंपळाची पानं स्वच्छ,हिरवीगार दिसताय. लाॅकडाऊनमुळे न झालेलं प्रदुषण आणी टवटवीत झालेली झाडं,वेली,पानं,फुल सुंदरच मांणसाच काय होईल माहिती नाही,पण निसर्गाला लाॅकडाऊन मानवला आहे. सर्व सुंदर वाटत आहे,स्वच्छ निर्मळ वाहणारे वारे झोके घेताय अन् मनाशीच आठवणींचे गुज गात आहे. पण...पण कितीही टाळले तरी डोळ्यांना दिसणारी अस्वस्थता टाळता येणारी नाहीये...

मंदिराचे दरवाजे गेले दोन महीने बंदच आहे,कदाचित ती आता पुन्हा पाण्याचे संकट उभे राहिले की,मंदिरातील देव पाण्यात बुडविण्यासाठीच काही काळ उघडी केली जातील असे वाटत आहे...मंदिराच्या लाकडी दरवाज्याला धुळीचा थर जमा झाला आहे,देवाला लाॅकडाऊन असल्यासारखे त्याच्याकडे कुणी फिरकत नाही. सांजवेळी लागणारा दिवा गेली दोन महिने लागतच नाहीये,अश्यावेळी दिव्यातून अधुरी राहिलेली वात घेऊन जाणारा उंदीरही हल्ली दिव्यापाशी दिसत नाही. नारळ फोडायचा दगड भुरका पडला आहे,वळवाच्या पावसाने त्या दगडावर पावसाचे पडलेले ओघळ संकेत देऊन जातात की,अजून संकट टळले नाहीये...

मंदिर बंद आहे,शाळा बंद आहे,शेजारीच असलेली अंगणवाडी कधीतरी उघडी दिसते. शेवटचा अंगणवाडीतील भात कधी शिजला माहीत नाही... अन् लहानग्या पोराला रिकाम्या पोटासाठी सरकारचा तांदूळ,सुगडी,वाटाणा,कधी वाटप झाला हे ही आठवत नाहीये...

एक मात्र हालचाल होत असते नदीच्या थडीला,पाणी आटले आहे. रोज वाळूचे ट्रॅक्टर भरून चालले आहे,शिस्तीत काम चालतं इथे काही भांडण नाही की काही नाही.याने सुद्धा एक फायदा झाला आहे की,पावसाळ्यात स्मशान भूमीकडे जाणारा रस्ता चांगला पक्का झाला आहे वाळूंचे ट्रॅक्टरं वाहून वाहून...

स्मशानभूमी... तिचे काय चालणार आहे ती घरातल्या चुली सारखी चालूच आहे,जशी चुलीतली आग विझत नाही तशीच स्मशान भूमीतली आग विझत नाही...एक मात्र झालं आहे मेल्या माणसां बरोबर फक्त स्मशानभूमी बघायला येणाऱ्या बघ्यांची गर्दी हल्ली होत नाही.
नदीतले पाणी मयत माणसाला पाजायला भेटत नाही,नदी दुरपर्यंत आटली आहे.म्हणून घरूनच एक पाण्याचा जार हो जार,क्यान नाही ती कधीच काळाच्या आड गेली तो घरूनच भरून आणावा लागतो...

सर्व अस्वस्थ आहे,कधी ही वेळ निघून जाईल सांगता येत नाही. रस्त्यांनी अनवाणी चालणारे भुकेले चेहरे दिसतात तेव्हा काहीच करता येत नाही,हतबल आहोत आम्ही बस बाकी काहीच नाही....

Written by,

Bharat Sonwane...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...